Saturday, August 1, 2020

‘व्हिजन’वास!

सांप्रतकाळात करोनामुळे सारे काही ‘लाॅकडाऊन’ झालेले असल्याने दूरचित्रवाणीवरील मनोरंजन वाहिन्यांची मोठीच पंचाईत झाली असून अंतर’भान राखणे जरुरीचे झाल्यापासून चोखंदळ प्रेक्षकांना पाहता येतील अशा नवनव्या मनोरंजनाची निर्मितीही जवळपास ठप्प झाली आहे. अशा वेळी घरबसल्या मनोरंजनाचे माध्यम म्हणून अशा वाहिन्यांकडे पाहणाऱ्या प्रेक्षकांची निराशा होऊ नये व छोट्या पडद्यावरील मनोरंजन विश्वाच्या आकुंचनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढता यावी या स्पर्धात्मक साहजिक संधीचा लाभ उठविण्याचा विचार करून टेलिव्हिजनवरील वृत्तवाहिन्यांनी आपापल्या प्रसारणात बदल करण्यास सुरुवात करावी हे काळानुरूपच ठरते. मनोरंजन आणि माहिती यांचा मिलाफ असे वृत्तवाहिन्यांच्या कार्यक्रमांचे स्वरूप असावे अशी माहितीची आंस असलेल्या प्रेक्षकांचाही अपेक्षा असली तरी सध्या घरबसलेपणाच्या काळात मनोरंजन ही प्राधान्याची गरज आहे हे काही वृत्तवाहिन्यांनी बरोबर ओळखले आहे. तथापि, आपण मनोरंजन करीत नसून माहितीलाच प्राधान्य देतो असा आभास निर्माण करणे हे वृत्तवाहिन्यांच्या संपादकरूपी नेपथ्यकाराचे खरे कौशल्य असते. यामुळे होते असे, की, अशा वाहिन्यांना दोन्ही प्रकारांतील प्रेक्षक मिळतात. ज्यांना मनोरंजन म्हणून अशा कार्यक्रमांकडे पाहावयाचे असते, ते त्या निखळ दृष्टिकोनातून कार्यक्रम पाहतातच, पण जे माहितीसाठी आसुसलेले असतात, ते मात्र, मनोरजनातून माहिती मिळेलच या अपेक्षेने अखेरपर्यंत असे कार्यक्रम पाहतात.
मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे एक बरे असते. त्यातून काहीही मनोरंजनात्मक मिळाले नाही तर त्याचा प्रेक्षक निराश होत नाही. ‘टाईमपास झाला’ असा विचार करून रिकामा वेळ कसातरी घालविल्याच्या समाधानात पुढच्या कार्यक्रमाकडे वळतो. ज्यांना माहिती हवी असते, ते मात्र अनेकदा निराश होऊन, पुढच्या कार्यक्रमात तरी माहिती मिळेल या अपेक्षेने टीव्हीसमोर बसतात. ही एक प्रकारे निराशा पचविण्याची कसोटीच असली तरी माहिती मिळविण्याची आसक्ती एवढी प्रबळ असते, की त्यापुढे ते नाराश्यदेखील कस्पटासमान ठरते.
प्रेक्षकांची हीच मानसिकता नेमकी ओळखून सध्याच्या काळात ज्यांची गरज आहे असे कार्यक्रम आखणे हे एक प्रकारे ‘व्हिजन’ असते. वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रम पाहताना थोडे खोलात जाऊन प्रत्येक कार्यक्रमाचे विश्लेषण केले, तर या ‘व्हिजन’ मागील ‘दृष्टी’ अंधुकपणे दिसू शकते.
मनोरंजन वाहिन्यांची जागा वृत्तवाहिन्या व्यापतील अशी शंका आधीपासूनच माध्यविश्वात व्यक्त होत होती, आता ती वास्तवात येऊ लागली आहे.
कारण, एकूणातच, माध्यमविश्व हे ‘व्हिजनरी’ असावेच लागते!

No comments:

Post a Comment