Tuesday, June 30, 2020

कचरा आणि बातमी...

तब्बल सदतीस मिनिटांनंतर त्याने कानाला अडकवलेला इयरफोन काढला, आणि एक मोकळा श्वास घेतला. अशी काही असाईनमेंट असली, की त्याला जाम टेन्शन यायचं. त्यातही लंबचवडी भाषणं ऐकून त्यातून बातमी शोधायची, म्हणजे तर वार्षिक परीक्षेतला गणिताचा पेपर असल्यासारखी छाती धडधडायला लागायची. आजही तसंच झालं. राज्याच्या परिस्थितीवर साहेब आज जनतेशी संवाद साधणार आहेत, त्यावरून छानशी बातमी करा, असा आदेश त्याला व्हॉटसअप ग्रुपवर आला, आणि रस्त्यावरून चालत असतानाच तो थबकला. रस्त्याच्या पलीकडे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा साचला होता. त्यावर माशा घोंघावत होत्या. थोडी दुर्गंधीही सुटली होती. पण त्याचं त्याकडे लक्षच नव्हतं. बसस्टॉपवरच्या बाकड्यावर बसून त्याने मोबाईलमधून साहेबांच्या भाषणाची लिंक उघडली, आणि इयरफोनमधून तो परिचित आवाज त्याच्या कानात घुमला. पुढची सदतीस मिनिटे तो मन लावून भाषण ऐकतच होता. नेहमीचेच शब्द, तीच वाक्यं, तोच विनवणीचा स्वर, तीच कौतुकाची झालर, सारे काही आपण याआधी कितीतरी वेळा ऐकलंय, असं त्याला सारखं वाटत होतं. तरीही संपूर्ण भाषण एकाग्रतेने ऐकून त्यानेही मनातल्या मनात जयहिंद वगैरे म्हटलं, आणि मोबाईल बंद करून खिशात ठेवला...
मग मात्र, त्याला घाम फुटला. एवढ्या लांबलचक भाषणातली बातमी आपल्याला शोधायची आहे, हे त्याला आठवलं. शिवाय, छानशी बातमी करा, असा आदेश होता, हेही आठवलं, आणि त्याच्या घशाला कोरड पडली. या भाषणात नेमकी बातमी काय, त्यात छानसं काय आणि ते कसं शोधायचं, हा प्रश्न त्याला पडला. क्षणभर मन भिरभिरलं... पुन्हा एकदा ते भाषण ऐकून पाहावं, असंही त्याला वाटलं, आणि त्याने मोबाईल काढला. सुरू केला, आणि इयरफोन कानाला लावला... पुन्हा तेच, नेहमीचेच, सवयीचे शब्द कानावर पडले. आता त्याला फक्त ते भाषण ऐकू येत होते. आसपास कुठेही त्याचे लक्ष नव्हते. रस्त्यावरून तुरळक वाहने येजा करत होती. एखाददुसरा माणूसही त्याच्याकडे विचित्रपणे पाहात पुढे जात होता. साध्या माणसांसाठी बसेस बंद असताना हा बसस्टॉपवर कशाला ताटकळतोय, असा भाव त्या नजरेत उमटायचा. पण त्याचे त्याकडे लक्ष नव्हते. त्याचे कान भाषणावर खिळले होते.
पुढची सदतीस मिनिटे गेली, आणि त्याने मोबाईल बंद केला. इयरफोन गुंडाळला, आणि खिशात ठेवून तो पुन्हा विचार करू लागला. यातून नेमकी छानशी बातमी कशी काढायची, हेच त्याला सुचत नव्हते. मुळात, या भाषणात बातमी तरी काय होती, असा प्रश्न त्याला पडला होता.
त्याने अस्वस्थपणे इकडेतिकडे पाहिले, आणि त्याची नजर समोरच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे वळली. फाटके कपडे घातलेला, पाठीवर गोणपाटाची पिशवी लटकावलेला, विझलेल्या डोळ्यांचा एक माणूस हातातल्या लोखंडी सळीने कचरा इकडेतिकडे करत होता. त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून काहीतरी शोधत होता.
आपणही कचरावेचकच आहोत, असा विचार त्या क्षणी मनात येऊन तो स्वतःशीच खिन्नपणे हसला. आता त्याचे संपूर्ण लक्ष त्या कचरा वेचणाऱ्या माणसावर खिळले होते. बातमीचा थोडासा विसरही पडला होता.
अचानक कचरा उपसणाऱ्या त्या माणसाच्या विझलेल्या डोळ्यात एक चमक उमटली. त्याला ती लांबूनही स्पष्ट दिसली. कचऱ्याच्या ढिगाऱ्यातल्या त्या माणसाने हातातली लोखंडी सळी बाजूला ठेवली, आणि तो खाली वाकला. त्या कचऱ्यातून त्याने काहीतरी वेचलेच होते. ती विकून काहीतरी किंमत मिळेल, याचा त्याला आनंद झाला होता. त्याने ती वस्तू हातात घेतली. उलटीसुलटी करून पाहिली. त्यावर हलकेच हात फिरविला, आणि अंगावरच्या मळक्या फाटक्या शर्टाच्या टोकाने पुसून ती साफ केली. त्याच्या डोळ्यात आनंद मावत नव्हता. कुणीतरी कचऱ्यात फेकलेल्या त्या वस्तूला त्याच्या दृष्टीने किमत होती. कचरा वेचण्याच्या आजच्या कष्टाचे चीज झाले, असा विचार त्याच्या मनात उमटला होता.
याला तो स्पष्ट वाचता आला होता.
तो स्वतःशीच हसला, आणि कचरा वेचणाऱ्या त्या माणसाचे त्याने मनोमन आभार मानले. कचऱ्यातूनही काहीतरी कामाचे हाती लागते, हा मोलाचा संदेश त्याला ऐन मोक्याच्या क्षणी मिळाला होता.
दुसऱ्याच क्षणाला त्याने मोबाईल काढला, आणि बातमी लिहायला घेतली. सदतीस मिनिटांच्या भाषणातील पंधरावीस वाक्ये रंगवून रंगवून लिहून काढली, आणि त्याला छानसा मथळा देऊन त्याने व्हॉटसअपवरूनच ती बॉसच्या नंबरवर धाडली.
कचऱ्यातून किंमती काहीतरी वेचण्याच्या शिक्षणाचे चीज झाले, असे त्याला वाटले, आणि त्याची पावले पुढे पडू लागली...

Sunday, June 28, 2020

कळ्या जपण्याचा काळ...


जगाच्या पाठीवरील दक्षिण आशियाच्या एका कोपऱ्यातील मालदीव नावाच्या एका लहानशा बेटावरची ही एक विरोधाभासी कहाणी आहे. १९८० पासूनच्या गेल्या चार दशकांत या देशाने विकासाचे सारे मापदंड झपाट्याने आपल्या खिशात घातले. ८० च्या दशकात हा देश जगातील सर्वात दरिद्री देश म्हणून ओळखला जात होता. आज पर्यटन व्यवसायाच्या जोरावर या देशाने आपल्या कपाळावरील दारिद्र्यरेषा जवळपास पुसून मध्यमवर्गीय उत्पन्नगटातील देश म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. येथील नागरिकांचे सरासरी आयुर्मान ४७ वर्षांवरून ७७ वर्षांपर्यंत वाढले आहे. तब्बल ९६ टक्के मुले प्राथमिक शिक्षणाच्या पटावर नोंदली गेली आहेत, आणि ९६ टक्के मुलांना इंग्रजी या जागतिक भाषेची ओळख झाली आहे... गेल्या २० वर्षांत माता मृत्युदराचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

पण या यशाला एक काळोखी बाजूदेखील आहे. या देशातील हजारबालके अजूनही दारिद्र्याच्या खाईत खितपत पडलेली आहेत, आणि सुमारे ७५ टक्के सुशिक्षित युवक बेरोजगारीचे जिणे जगताहेत. पाचपैकी एक मूल कमजोर आहे, तर साठ टक्के मुलींना शाळकरी वयातच लैंगिक शोषणाची शिकार व्हावे लागले आहे. हिंसाचारी टोळकी ही या देशाची मोठी डोकेदुखी बनली आहे. देशाच्य राजधानीतच, किशोरवयीन मुलांच्या वीस ते ३० टोळ्या हिंसक कारवायांमध्ये गुंतलेल्या आहेत. प्रत्येक टोळीमध्ये किमान ५० ते कमाल ४०० मुले आहेत. त्यामुळे, उच्च माध्यमिक शिक्षणाच्या टप्प्यात प्रवेश करणाऱ्यांची संख्या मात्र जेमतेम ४५ टक्क्यांपर्यंतच आहे. २२ टक्के मुलांना स्थूलपणाच्या विकाराचा विळखा आहे, तर १५ ते २५ वयोगटातील ५० टक्के मुले अंमली पदार्थांच्या आहारी गेली आहेत....
मुलांचे आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षितता या तीन बाबींना प्राधन्य देऊन गेल्या काही दशकांत धोरण आखणी करणाऱ्या मालदीवमध्ये दिसणाऱ्या विकासाच्या परिणामांच्या या दोन बाजू हे जगभराचे प्रातिनिधिक चित्र आहे. मालदीवचे उदाहरण अशासाठी, की या देशाने कमीत कमी काळात परिवर्तनाचा एक टप्पा गाठला असला तरी त्याची दुसरी बाजू फार कौतुकास्पद दिसत नाही. जगात अनेक देशांत हीच परिस्थिती आहे. असे जेव्हा होते, तेव्हा त्याच्या दुष्परिणामांची पहिली शिकार बालकेच असतात. संकट किंवा असाधारण परिस्थितीचा पहिला फटका संरक्षणासाठी मोठ्यांवर अवलंबून असलेल्यांनाच बसतो, हे सार्वत्रिक सत्य आहे. म्हणजे, अशा स्थितीत बालकांनाच वेगवेगळ्या हिंसाचाराची शिकार ठरविले जाते. 
संयुक्त राष्ट्रसंघाच्या बालकल्याण निधी (युनिसेफ), जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि संयुक्त राष्ट्रसंघाची शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (युनेस्को) यांनी एकत्रितपणे बालकांवरील हिंसाचारास आळा घालण्याबाबतच्या पाहणीचा जागतिक अहवाल नुकताच प्रसिध्द केला. या अहवालातील वास्तव माणुसकीच्या संवेदनांना सुन्न करणारे आहे. जगभरातील निम्मी, म्हणजे सुमारे एक अब्ज बालके वर्षाकाठी शारीरिक, मानसिक व लैंगिक हिंसाचाराची शिकार ठरतात, असे चिंताजनक वास्तव या अहवालाने सामोरे आणले आहे. जखमा, अपंगत्व किंवा मृत्यूपासून बालकांचे संरक्षण करण्याबाबत ठोस धोरण आखण्यातील जगभरातील उदासीनतेमुळे, भावी पिढीच्या भविष्यावरच या अहवालातील वास्तवाने काळी रेघ उमटविली आहे. जगभरातील सुमारे ८८ टक्के देशांमध्ये बालकांच्या संरक्षणासाठी ठोस कायदे अस्तित्वात आहेत. पण त्यापैकी निम्म्या देशांत या कायद्यांची परिणामकारक अंमलबजावणीच होत नाही, असे या पाहणीच्या निमित्ताने उघडकीस आले. 
बालहत्येच्या आणखी एका भीषण वास्तवावर या अहवालाने बोट ठेवले आहे. २०१७ मध्ये जगभरात १८ वर्षांखालील ४० हजार मुलांची हत्या झाली. हे प्रकार पुढे सातत्याने वाढतच चालले आहेत, असे हा अहवाल म्हणतो. 
कोविडच्या महामारीच्या काळात तर मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. शाळाबंदी, संचारबंदी आणि टाळेबंदीमुळे तर, अत्याचारींचे आणि मानसिक विकृतांचे चांगलेच फावले असून मुले त्यांच्या तावडीत सापडणे सोपे झाले आहे. त्यामुळे या काळात मुलांच्या सुरक्षिततेकडे सतर्कतेने लक्ष ठेवले पाहिजे. स्वयंसेवी संस्था, संघटना आणि समाजसेवींनी या कामी पुढाकार घेतला पाहिजे, असे युनिसेफने सुचविले आहे. याच काळात ऑनलाईन द्वेषमूलकतेचे प्रमाणही वाढीस लागले आहे. मानसिक हिंसाचाराची ही सुरुवात असली, तरी मुलांना या भीतीने ग्रासण्यास सुरुवात झाली असून त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. आज घरात स्वतःस बंद करून घेतलेल्या मुलांन या भयामुळे उद्या घराबाहेर पडणे, शाळेत जाणेही असुरक्षित वाटू लागेल, अशी शंका बालकांच्या सुरक्षिततेविषयी अभ्यास करणाऱ्या या गटास वाटते. त्यामुळे, भविष्यात जेव्हा शाळा नियमित सुरु होतील, तेव्हा तेथील वातावरण अधिक सुरक्षित असेल याची हमी मुलांना मिळण्याची गरज आहे. सध्या ऑनलाईन शिक्षणपद्धती विकसिक होऊ पाहात आहे, ही चांगली बाब असली, तरी ऑनलाईन संपर्कातूनच मानसिक अत्याचारांचे प्रकारही वाढीस लागले आहेत. लैंगिक आणि विकृत वर्तणूकीचे प्रमाणही वाढत आहे, आणि असे प्रकार म्हणजे मानसिक हिंसाचारच आहेत. घरात कोंडून घेतल्यामुळे मुलांचे मोकळेपणाचे वर्तुळच आकसले आहे. पालकांसोबत राहूनही, सगळेच आपापल्या कामात व्यग्र असल्याने, त्यांच्या मोकळेपणात मुलांसाठी मिळणारा वेळ प्रत्यक्षात मात्र कमी झाला आहे. मित्र, नातेवाईक किंवा समव्यवसायींचा थेट संपर्क तुटल्यामुळे मानसिक आधार काहीसे कमकुवत होत चालले आहेत, आणि त्यातून मुलांना सावरणे व पुन्हा त्यांच्या रुळलेल्या जीवनशैलीत आणणे हे पुढील काळाचे मोठे आव्हान असेल, 
अशा आव्हानात्मक काळात समाज आणि सरकारांना मोठी जबाबदार भूमिका वठवावी लागणार आहे. त्याकरिता व्यापक विचारमंथनाची आणि संभाव्य समस्यांची उत्तरे आत्ताच शोधण्याची गरज आहे. तसे झाले नाही, तर मानसिक किंवा शारीरिक हिंसाचाराच्या वाढत्या प्रकारांत भविष्यातील एका पिढीची मोठी हानी होण्याची भीती आहे. ते टाळायचे असेल, तर, करोनाच्या महामारीनंतरचे असे एक नवे जग आपल्याला उभे करावे लागेल, जेथे मुलांचे विश्व आश्वस्त आणि भयमुक्त असेल. केवळ भतिक विकासाची साधने मानसिक विकृतीला आळा घालू शकत नाहीत, भविष्यात मानसिक विकासाची मोठी गरज भासणार आहे. टाळेबंदी आणि संचारबंदीमुळे मानसिक विकासास आलेल्या मर्यादांची दरी बुजविणे हे आता काळाने माणसासमोर ठेवलेले आव्हान आहे. जागतिक आरोग्य संघटनेने योग्य वेळी हा प्रश्न ऐरणीवर आणून जगाला जागे केले आहे.  

Thursday, June 25, 2020

डे-वन : मफलर ते मास्क

-


 आज पुन्हा, ४५ वर्षांनंतर, याच दिवशी, त्याच दिवसाचा एक वेगळाच अंश अनुभवायला मिळतोय. सकाळी जाग आली, तेव्हा तो दिवस आठवला. योगायोगाने नव्हे. अगदी जाणीवपूर्वक. ४५ वर्षांपूर्वी, २६ जूनला... मी साखरप्याच्या घरी, सोप्यात, राजांगणातला पावसाचा धबधबा अनुभवत अंथरुणात लोळत होतो. नुकतं उजाडू लागलं होतं. मस्त, कुंद हवा होती. पावसाळ्याच्या दिवसात साखरप्याच्या घरात असणं हे त्या वेळी माझ्या सुखाच्या कल्पनांतलं परमोच्च सुख होतं. बाहेर कोसळणारा पाऊस, अगदी बसल्या जागी, आमच्या चौसौपी घराच्या मधल्या अंगणात- राजांगणात- एकवटून कोसळायचा, आणि छपराच्या चारही कोपऱ्यांच्या पन्हळीतून अक्षरशः धबाधबा ऊतू जायचा... त्याला एक मस्त लय असायची. अजूनही असते, पण ते दिवस वेगळे होते. कारण, ते अनुभवण्याची मजा त्या वयात अधिक होती. पुढे अनेक पावसाळे पाहिल्यावर, त्यातलं ते वेगळेपणही सवयीचं होतं. म्हणून, प्रत्येक पावसाळ्याचं नवेपण असलं, तरी काही वेगळे पावसाळे मनावर शिंपडतच राहातात. तर, त्या दिवशी तो असाच कोसळत होता, आणि मी अंथरुणावर, डोळे मिटून, त्याचा नाद कानात साठवत पडून होतो. तितक्यात ओटीवरून एक ओळखीच्या आवाजातली हाक आली. मी लाजून ताडकन अंथरुणातून उठलो. कारण, इतक्या उशिरापर्यंत कुणी लोळत पडतो का, असं विचारायचे आणि त्यावर उत्तर न देता, शरम वाटायचे ते दिवसच होते...
बाहेर रमाकांत पाटील होते. आमच्या तालुक्याचे प्रचारक. ठेवणीतल्या, कौटुंबिक आवाजात त्यांनी मला हाक मारली, आणि मी ताजातवाना असल्यासारखा चेहरा करून ओटीवर गेलो.
‘आवरा... आपल्याला निघायचंय. लगेच. वेळ काढू नको.’ उगीचच इकडेतिकडे पाहात दबक्या आवाजात ते म्हणाले, आणि मी बिचकलो.
कुठे निघायचंय, कशाला जायचंय, काहीच कळलं नव्हतं. तरीही कपडे पिशवीत भरले, आणि मागीलदारीच्या चुलीवरच्या कोनाड्यातली शेणीची राखुंडी दातावर खसाखसा घासून चारपाच चुळा भरून मी पुन्हा ओटीवर आलो. मामीने दिलेला चहा आम्ही दोघांनी घेतला. दरम्यान पाटील आणि मामाचं काहीतरी बोलणं झालं होतं.
मग मी पिशवी काखोटीला मारली, आणि पाटलांसोबत बाहेर पडलो. मामाने पाठीवर थोपटून निरोप दिला.
गावाबाहेर तिठ्यावर आलो, तेव्हाही पाऊस भरुभुरत होता. एक ट्रक देवरूख रोडकडे वळला. पाटलांनी हात दाखविला. कुणीतरी अनोळखी ड्रायव्हर होता. त्याने ट्रक थांबविला, आणि आम्ही केबिनमध्ये चढलो. ट्रक देवरूखच्या दिशेने निघाला. तासाभरानंतर मार्लेश्वर तिठ्यावर पाटलांनी ट्रकवाल्याला खूण केली, आणि आम्ही उतरलो. देवरूखहून चंदू तिठ्यावर येऊन थांबलेलाच होता. त्याच्या पाठीवर एक गोणपाटाची मोठी पिशवी, आणि कपडे बांधलेली एक लहान पिशवी होती. काही न बोलता आम्ही मार्लेश्वरच्या दिशेने चालू लागलो.
पाचसहा मैल चालल्यावर पाटलांनी तोंड उघडलं.
‘आणीबाणी लागू झालीय. आपल्यातल्या काही लोकांना पकडणारेत. वॉरंट निघालीयेत. जेलमध्ये सडण्यापेक्षा, लपून जाऊ. भूमिगत होऊ, आणि काहीतरी करू. जेलमध्ये किती दिवस राहावं लागेल, तिथे काय हाल होतील, काहीच कळत नाही. त्यापेक्षा भटकू. कुठेतरी लपून आसरा घेऊ. आपल्या माणसांनी तशी व्यवस्था केलीय’...
आम्ही मान डोलावली, आणि चालू लागलो. चंदूच्या पाठीवरचं गोणपाटाच्या पिशवीतलं ओझं आलटून पालटून पाठीवर घेत निघालो. मार्लेश्वरला पोहोचलो, तेव्हा दुपार वगैरे झाली होती. तेव्हा तिथे आजच्याएवढी वर्दळ नव्हती. संपूर्ण एकान्त. दाट जंगल, आणि आसपास माणसाचा वावरही नाही.
एका मोठ्या दगडाच्या मागे आम्ही सामान लपवलं, आणि एका लहानशा ओहोळाखाली बसून मनसोक्त आंघोळ केली. कपडे बदलले आणि चंदूने बांधून आणलेल्या भाजीभाकरीवर ताव मारला. थोड्या वेळाने गोणपाटाची पिशवी उघडली, आणि माझे डोळे विस्फारले. आत सायक्लोस्टायलिंग मशीनचे मॉडेल होते. हाताने बनविलेले. स्क्रीन प्रिंटिंगसाठी बनवतात, तसे. दोन लाकडी चौकटी बिजागराने जोडलेल्या. एकावर पाट, आणि एकावर जाळी... एक हाताने फिरवायचा रॉड... शाईच्या ट्यूब, कागदांचा गठ्ठा...
चंदू माझ्याकडे बघून नुसतंच हसला. शाळेतून या वस्तू गुपचूप उचलून आणल्या होत्या.
आणीबाणीविरोधातील पत्रके तयार करून गावोगाव त्याचे वितरण करायचे, असं काम आपल्याकडे असेल. पाटील म्हणाले. पण तोवर आणीबाणी म्हणजे काय, त्याचा आपल्याशी संबंध काय, वगैरे काहीच माहीत नव्हतं. तेव्हा आजच्यासारखं मोबाईल, इंटरनेट नव्हतं, आणि आम्ही तर, ‘तेव्हाच्या कव्हरेज एरिया’च्याही पुरते बाहेर...
मग, नुसतंच, ‘आणीबाणी मुर्दाबाद’ असा मजकूर मोठ्या अक्षरात स्टेन्सिल करून स्क्रीनवर चिकटवला, आणि भराभरा पाचपन्नास प्रती काढून झाल्या... पुन्हा सगळं सामान गोणपाटाच्या पिशवीत भरून, पिशवी काखोटीला मारून आम्ही तिथून निघालो.
जाम मजा वाटत होती. काहीतरी वेगळं, थ्रिलींग आहे, हे जाणवत होतं.
पायथ्याच्या गावात आलो, आणि आसपास कुणी नाही याची खात्री करून घेत दोनचार पत्रकं शाळेच्या खिडकीतून आत टाकली...
पुन्हा गुपचूप चालू लागलो. देवरूखच्या दिशेने... पण गावात थांबायचं नव्हतं. एखादा ट्रक पकडायचा, आणि गावाला वळसा घालून पुढे जायचं, हे ठरलं होतं. पाटलांनी सगळा कार्यक्रम व्यवस्थित आखला होता.
रात्र झाली तेव्हा आम्ही धामणीच्या पुढे कुठेतरी उतरलो होतो. पुन्हा पिशव्या पाठीवर घेतल्या, आणि पलीकडे दिसणाऱ्या दाट डोंगराच्या दिशेने चालू लागलो.
दोन घाट्या ओलांडल्यावर झाडीत लपलेलं एक मोठं कौलारू घर दिसू लागलं. आम्हाला तिथेच जायचं होतं. पाटलांनी आमच्यासाठी त्या घराची निवड केली होती. गुप्त जागा. इथे आम्ही आमचं काम सुरू करणार होतो. कुणालाच आमचा सुगावा लागणार नव्हता.
घरात पोहोचलो, तेव्हा ते वयोवृद्ध गृहस्थ आमची वाटच पाहात झोपाळ्यावर बसले होते. पिशव्या पडवीच्या रेज्याला रेलून ठेवून आम्ही समोर खुर्च्यांवर बसलो. जुजबी चौकशा झाल्या, आणि थोड्या वेळाने जेवण तयार असल्याचा निरोप आला. मागीलदारी विहीरीजवळ त्यांनी आपल्या हाताने आमच्या हातापायावर पाणी घातले, ताजेतवाने होऊन आम्ही केळीच्या पानावर जेवायला बसलो. कुळथाचं खमंग पिठलं, आणि वाफाळलेला भात... डावीकडे झणझणीत लसणाची चटणी... अक्षरशः ताव मारला. तोवर नावं वगैरे सांगून झाली होती. माझं नाव ऐकताच त्यांनी- त्यांना आप्पा असे म्हणत- डोळे किंचित बारीक केले, आणि विचारलं, ‘म्हणजे तुमची जात कोणती?’
 मी सटपटलो. आपण सांगितलेल्या आडनावाची जात कोणती हे मलाही माहीत नव्हतं...
‘ नाही, तीच.. आम्ही गुजर’... आप्पांनी मान हलविली, आणि जेवण आटोपल्यावर खुणेनंच मला माझं पान उचलायला सांगितलं. मागोमाग मागीलदारी आले.
‘टाका तुमचं पान म्हशीच्या पुढ्यात’... ते म्हणाले. मी ओळखलं.
आपल्या आडनावामुळे आता इथलं वास्तव्य असंच असणार, मला जाणवलं. मी पान लांबूनच म्हशीच्या पुढ्यात टाकलं, आणि पाथरीजवळ आलो. आप्पांनी त्यांच्या हाताने माझ्या हातावर पाणी घातलं. हातपाय धुवून पुन्हा आम्ही आत आलो, आणि त्यांनी मागच्या पडवीजवळची एक खोली उघडून आम्हाला दिली. ‘इथे तुम्ही राहायचं. बाहेर पडायचं नाही. दिवसा कुणालाही कळता नये’... त्यांनी कडक आवाजात सूचना केल्या, आणि आम्ही तिघे मान हलवून खोलीत गेलो. आतून कडी लावली, आणि गोणपाटाची पिशवी उघडून पुन्हा मशीन जोडलं.
येतायेता पाटलांनी झोपाळ्यावरचं वर्तमानपत्र काखोटीला मारलं होतं. खोलीत गुपचूप वाचन झालं, आणि आणीबाणीचा अर्थ उलगडू लागला... लपून काम करणंच गरजेचं होतं, हे लक्षात आलं. आमचा निर्धार झालाच होता.
‘उद्यापासून आपलं काम सुरू झालं पाहिजे.’ पाटील म्हणाले...
... दुसरा दिवस उजाडण्याआधी आम्ही कामाला लागलो होतो. आणीबाणीच्या विरोधातील घोषणा तयार झाल्या होत्या. मी वेगळ्या अक्षरात त्या स्टेन्सिलवर उतरविल्या, आणि प्रती काढण्यास सुरुवात झाली. शंभर प्रतींचा एक गठ्ठा... तीनचार गठ्ठे दुपारी जेवणाआधी तयार झाले होते.
मग दुपारी पुन्हा आप्पांसोबत, जेवण आटोपलं. या पंक्तीत माझं आणि पाटलांचं पान थोडं बाजूलाच होतं. पण पानात पडणारं अन्न मात्र, सारखंच होतं. त्या काळातल्या वयोवृद्धांची मानसिकता आम्हाला ओळखीची होती.  काहीच वाटलं नाही. तो काळच तसा होता.
जेवणं आटोपल्यावर पुन्हा खोलीत जाऊन आम्ही आडवे झालो. काही वेळातच डाराडूर...
चार साडेचार वाजले असतील. बाहेरून आप्पा कडी वाजवत होते. ‘आहो जोग, गुजर, उठा’... आम्हाला ऐकू येत होतं. पण ते आपल्याला कुठे उठवतायत, असं वाटून आम्ही उठलोच नाही.
आडनावं आम्हालाही नवीनच होती ना...
अखेर आप्पा वैतागले... ‘आणि म्हणे, कामं करणार’... असं काहीतरी बडबडले, आणि आम्ही ताडकन उठलो. बाहेर आलो. झोपाळ्यावर आप्पा बसले, आणि आम्ही समोरच्या खुर्च्यांत बसलो.
चहा झाला. मी माझा कप विसळून मागच्या पडवीत एका बाजूला उलटा घालून ठेवला. चंदूचा कप आपल्यासोबत घेऊन आप्पांनी झोपाळ्याजवळ ठेवला.
संध्याकाळ उलटू लागली, आणि पाटलांनी खुणावलं. आम्ही बाहेर पडलो. एका पिशवीत ते गठ्ठे होते.
गोवा रोडवर येईपर्यंत काळोख झाला होता. आम्ही चालू लागलो. तोंडाला मफलर गुंडाळून संगमेश्वर स्टँडवर आलो, आणि मुंबईकडे जाणाऱ्या दोनचार गाड्यांमध्ये गुपचूप कंडक्टरच्या डोक्यावरल्या कॅरियरमध्ये एकएक गठ्ठा टाकून पसार झालो.
आपण काय केलंय हे दुसऱ्या दिवशी आम्हाला समजलं.
चिपळुणात गदारोळ झाला होता. एस्टी गाड्यांमध्ये कुणीतरी आणीबाणीविरोधी पत्रकं टाकल्याची वार्ता तोवर सगळीकडे पसरली होती. आता काय होणार, याची कुजबूज सुरू झाली होती.
आम्हाला हे कळलं, आणि मजा वाटली.
अज्ञातवासातले दिवस सुरू झाले होते. घरी बहुधा निरोप पोहोचला होता. आता दिवसभर आप्पांच्या घरात मागल्या पडवीशेजारच्या बंद खोलीत पत्रकं सायक्लोस्टाईल करायची, गठ्ठे बांधायचे, आणि रात्री संगमेश्वर, कधी चिपळूण गाठून एस्टीत टाकून यायचं, एवढंच काम आम्हाला होतं. आम्हाला ते आवडलंही होतं.
काही दिवस आप्पांच्या घरी राहिल्यावर बाहेरची कुजबूज वाढली होती. कुणीतरी आसपासचीच माणसं हे करतायत, असा संशय पसरू लागला होता. अशातच, आम्ही त्या भागात नवखे असल्याने, स्टँडवरच्या काही नजरा उगीचच संशयाने पाहातायत असा भास आम्हालाही होऊ लागला होता. तोंडाला मफलर वगैरे बांधला तर आणखीनच संशय वाढणार होता.
मग मुक्काम हलवावा असं ठरलं, आणि आम्ही एका भल्या पहाटे, उजाडण्याआधी बाहेर पडलो. आप्पांच्या पायाला हात लावून नमस्कार केला, आणि मी म्हणालो, ‘आप्पा, माझं नाव गुजर नाही... मी गुणे’...
आप्पा एकदम गहिवरले. माझ्या पाठीवर मायेनं हात फिरवला, आणि त्यांनी तोंड भरून आशीर्वाद दिला.
‘यशस्वी भव!’
… आम्ही पुढच्या मुक्कामासाठी त्या जंगलातल्या एकांतातून बाहेर पडलो.

(चित्र सौजन्य- लोकसत्ता)

भाषेचे जगणे-मरणे...

एका ज्येष्ठ पत्रकार मित्राची अचूक मराठी’वरील एक नोंद वाचली आणि त्यांची तळमळ अस्वस्थ करून गेली. मराठीच्या चिंधड्या उडविण्याची स्पर्धा स्वजनांकडूनच सुरू असून माध्यमे- विशेषत: चित्रवाणी माध्यमे- त्या स्पर्धेत हिरीरिने उतरलेली दिसतात.
त्या नोंदीमुळे मग एक स्वगत -चिंतन- होऊन गेले. सहज वाटलं, हा तर अपरिहार्य बदलाचा प्रभाव आहे.
बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. हे एकदा मान्य केले की आपोआपच बदल स्वीकारायची मानसिकता तयार होते. आणि आपण कसे बदलत गेलो तेही लक्षातदेखील येत नाही. फार पूर्वी, सातआठ पिढ्यांपूर्वी आपल्या घरातील पुरुष मंडळीचा पंचा उपरणं पागोटं असा वेश असायचा, बायका लुगडं नेसायच्या. काळाबरोबर बदल होत गेला, आणि पंचाउपरण्याची जागा धोतर सदऱ्याने घेतली. कालांतराने समाजातच सुधारणा होऊ लागली, विकास होऊ लागला, पायी चालण्याऐवजी मोटारी दिसू लागल्या, आणि सदऱ्यावर कोट आला. वहाणांची जागा चप्पल ने घेतली. काळ आणखी बदलला. धोतर कोट सदऱ्याची जागा ‘पॅंट शर्ट’ने घेतली, चप्पलऐवजी ‘बूट’ आले. पुढे ‘सूट’ आला, पायात ‘शूज’ आले, गळ्यात ‘टाय’ आला, डोक्यावर ‘कॅप’ आली. आता ‘ब्लेझर्स’ वगैरे वापरतो...
हा केवळ वेषातला बदल आहे असे वरवर वाटत असले तरी ते तेवढेच नाही.
मराठी भाषा या वेषाबरोबरच कशी बदलत गेली, त्याचं प्रतिबिंबही या बदलातून दिसतं.
भाषेच्या विकासाची प्रक्रिया सुमारे ७० हजार वर्षांपूर्वी सुरु झाली. तेव्हा फक्त वर्तमानकाळाची भाषा होती. पुढे तीस हजार वर्षांनंतर भूतकाळाची भाषा आली. आता आपण भविष्यकाळाच्याही पुढची भाषा बोलत आहोत, म्हणून मराठीचं काय होणार याची कधीकधी चिंता व्यक्त होते.
काही महिन्यांपूर्वी कधीतरी, *पुण्याच्या* एका एफ्. एम्. स्टेशनवर ‘सलग ३० सेकंद मराठीत बोलून दाखवा’ अशी स्पर्धा घेत होते. *पुण्यात*!
कुणीही बोलू शकले नाही, असं मला कळलं!
मराठीत इंग्रजीची मोठी घुसखोरी झाली आहे.
मागे एकदा, १४ सप्टेंबर २०१५ या दिवशी दुपारी बारा-साडेबारा वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर एक भाषण ऐकलं. मराठीतून होतं. ते मी ऐकता ऐकता लिहून घेतलं.
“बाॅडी आणि माईंड यांच्यावर नाॅईज पोल्यूशनचा डायरेक्ट ॲडवर्स इफेक्ट होत असतो. म्हणून लहान मुलांच्या एरियातील नाॅईज पोल्यूशनचे नाॅर्म्स स्ट्रिक्ट असायला हवेत. या सगळ्याचा विचार करून सायन्स रिलेटेड काही गाईडलाईन्स आहेत, ज्या ॲक्ट्व्हिस्टसनी थरो रिसर्च करून चाॅकआऊट केल्या आहेत. रेसिडेन्शियल एरियाला किती नाॅईज एक्स्पोजर असायला हवेत त्याचा सीरियसली विचार करायला हवा. इन शाॅर्ट, नाॅईज पोल्यूशनला लाईटली घेऊन चालणार नाही. कारण ते हेल्थ हजार्ड आहे. इररिव्हर्सिबल हियरिंग  लाॅस झाला नाही तरी बरेचसे ॲडव्हर्स इफेक्टस होऊ शकतात हे सायन्सने सिद्ध केले आहे.”
...नंतर हे मी एका मित्राला ऐकवलं. त्याने खांदे उडवले. तो म्हणाला, इट हॅपन्स! ॲट टाईम्स मराठी वर्ड रिमेम्बर करायला डिफिकल्ट जातं!
भाषाप्रदूषण. मराठी मरणार नाही, पण प्रदूषित होणार.
या पार्श्भूमीवर मला भाषातज्ञ गणेश देवींचं एक वाक्य कायम आठवतं-
“भाषा कधी मरत नसते. ती मारली जाते- भाषा टिकवणे आपल्या हातात नसेल पण ती मारून टाकू नये. कारण भाषा आपण निर्माण केलेल्या नाहीत. त्यामुळे त्या मारण्याचा अधिकार आपल्याला नाही.”
भाषा जगविणे म्हणजे ती भाषा बोलणारे लोक जगविणे. आपण स्वत:ला तसे जगविले तर भाषा मरणार नाही.
फक्त सध्या आपण भाषा मारतो आहोत की समृद्ध करत आहोत याचा विचार करायला हवा. अर्थात आज एकाच भाषेवाचून काही अडत नाही अशी स्थिती असल्याने आपण भाषेच्या अस्मितेची फार चिंता करत नाही.

Wednesday, June 24, 2020

अश्रूंना जेव्हा पाने पुसतात...



कोकण आणि मुंबईच्या माणसांमध्ये एक साम्य आहे. ही माणसं परिस्थितीपुढे हतबल होत नाहीत असं 'नेत'मंडळी अभिमानाने सांगतात. मुंबईसाठी त्यांनी या मानसिकतेला एक नाव दिलंय... मुंबई स्पिरीट! ...कोकणातही हेच स्पिरीट आहे असं ही मंडळी म्हणतात. काहीही झालं, तरी मन खचू द्यायचं नाही. परिस्थितीपुढे गुडघे टेकायचे नाहीत, उलट, आलेल्या परिस्थितीस खंबीरपणे तोंड द्यायचं, आणि नव्या दिवसाला सामोरं जायचं, ही ती मानसिकता! या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या विनाशकारी निसर्ग वादळानंतर कोकणच्या किनारपट्टीवरील कित्येक गावं अक्षरशः होत्याची नव्हती झाली. पुरती उद्ध्वस्त झाली. जंगलं जमीनदोस्त झाली. पिढ्यापिढ्यांनी आपल्या घामाचं शिंपण करून वाढविलेल्या नारळी-पोफळीच्या, आंबे-काजूच्या बागा जमीनदोस्त झाल्या. अंगणाला घनदाट सावली देणारी फणसाची झाडं उन्मळून पडली, आणि उजाडपणामुळे घरंदारं भकास झाली. माणसांच्या मनावर  उदासीनतेचे ओरखडे उठले, आणि कोणत्याही संकटकाळात घडतं, तसंच इथेही घडून गेलं. चारदोन राजकीय नेत्यांनी घाईघाईने कोकणातील किनारी गावांचे दौरे आखले आणि उरकले. संकटग्रस्तांच्या पाठीवर हात फिरवितानाचे, त्यांचे अश्रू पुसतानाचे फोटो काढले, त्याचा गाजावाजा केला, आणि मुंबईला परतल्यावर कोकण स्पिरीटचं कौतुक सुरू झालं...

... एवढं अस्मानी संकट कोसळलं, तरी कोकणवासी डगमगलेला नाही. आत्महत्येचा विचारही त्याच्या मनाला शिवत नाही, आणि सरकारी मदतीसाठी तो कधीच कुणापुढे हातही पसरत नाही. तो रडतकुढत नाही... उभं आयुष्य उद्ध्वस्त होऊनही त्याची उमेद खचलेली नाही, अशा स्तुसिसुमनांचा वर्षाव सुरू झाला, आणि हा साधाभोळा  माणूस, दुःखाचे डोंगराएवढे ओझे डोक्यावर असतानाही, उगीचच भारावून गेला. पुन्हा उभं राहिलं पाहिजे, ही जिद्द त्याच्या कोसळलेल्या मनात जागी होत आहे, हे त्या, फुलं उधळणाऱ्यांनी ओळखलं, आणि कोकणावर निसर्गाने घातलेल्या घाल्याचं संकट विसरून शहरांतले नेहमीचे व्यवहार सुरू झाले.

त्याआधी काही दिवस, पश्चिम बंगालमध्येही वादळाचा जोरदार तडाखा बसला होता. उभ्या देशाने त्याची गंभीर दखल घेतली. त्या संकटग्रस्तांसाठी मदतीचे हजारो हात पुढे आले. माध्यमांनी तर मदत उभी करण्यासाठी मोहिमा चालविल्या. अजूनही एखाद्या राष्ट्रीय वाहिनीवर पश्चिम बंगालच्या उद्ध्वस्त अवस्थेची बेचैन करणारी छायाचित्रे दिसतात. आवाहनांचा सूर आळवला जातो.

आणि कोकणची माणसं कशी खंबीर आहेत, त्यांनी संकटाला कसं धीरानं झेललं आहे, याचे कौतुकसोहळे दुसरीकडे समाजमाध्यमांवर साजरे केले जातात. तसेही, कोकणाची दखल घ्यावी असं कधी कुणाला वाटत नसतंच. हे खरंच आहे, की सामान्य परिस्थितीत कोकणातला माणूस कुणापुढेच हात पसरत नाही. आपल्या समस्यांचे रडगाणे जगासमोर गात नाही, आणि त्याचे भांडवल न करता, एकमेकांच्याच आधाराने पुन्हा उभे राहण्यासाठी धडपडतो.

यावेळीही तसे होईलच. पण मुद्दा तो नाही. एवढ्या भीषण संकटानंतरही, इथल्या व्यथा-वेदनांची गंभीर दखल घेण्याची मानसिकता का नाही, हा मुद्दा आहे. मुंबईतील मराठी माणूस हा मराठी वर्तमानपत्रांचा आधारस्तंभ म्हणावा असा वाचक-आधार आहे. पण पश्चिम बंगालातील वादळाच्या परिस्थीतीस मिळाली एवढीदेखील जागा दुर्दैवाने कोकणातील वादळाला का मिळाली नाही, हा प्रश्न उद्या नक्कीच विचारला जाईल.
स्वतःस लोकशक्ती समजणाऱ्या एका वर्तमानपत्राची दुसरी बाजू या निमित्ताने समोर आली पाहिजे. एखाद्या वर्तमानपत्रास लोकमान्यता कशामुळे मिळते?... उत्तर साधे आहे. जेव्हा ते वर्तमानपत्र आपले आहे, असे लोकांना वाटते, तेव्हा...!  तीन जूनला कोकणात निसर्ग वादळाने अभूतपूर्व हैदोस घालून कोकणच्या निसर्गाचे पुरते तीनतेरा वाजविले. त्यानंतर या लोकशक्तीने त्या बातमीची एक जेमतेम टिकली आपल्या बारा पानांच्या एका बाजूला कागदावर उमटविली. ही भीषण स्थिती संवेदनशीलतेने समाजासमोर मांडावी, समाजाच्या, सरकारच्या संवेदनांना आणि जबाबदाऱ्यांना जागे करावे, अशी जबाबदारी त्या वर्तमानपत्राने पाळली का, हा प्रश्न विचारायलाच हवा. कारण, हा केवळ बातमीला मिळणाऱ्या जागेपुरत्या चर्चेचा मुद्दा नाही, तर मानसिकतेचा मुद्दा आहे. माणसं मेली तरच संकट गंभीर आहे, असे मानण्याची मानसिकता. कोकणाच्या सुदैवाने या संकटातही मोठी जीवितहानी झाली नाही. त्यामुळे संकटाचे गांभीर्य  नजरेआड करावे, ही ती मानसिकता. मृत्युसंख्येनुसार बातम्यांना जागा मिळते, असा सर्वसाधारण समज असतो. तसा वाचकांचाही अनुभव आहे. तिकडे जगाच्या पाठीवर कुठे काही घडले, आणि चारदोन मृत्यू झाले, तरी त्याची बातमी देण्याचा उतावीळपणा या लोकशक्ती म्हणून मिरविणाऱ्यांमध्ये लपून राहिलेला नाही. अधूनमधून दिसणाऱ्या तशा बातम्यांनी ते दाखवून दिले आहे. म्हणून, मृत्यूसंख्येनुसार बातमीचे मूल्य ठरविण्याच्या मानसिकतेचा फटका कोकणच्या संकटकाळात बसला असावा असा संशय येऊ शकतो. ३ जून रोजी या लोकशक्तीच्या मुंबई आवृत्तीत निसर्ग संकट या मथळ्याखाली, या संकटाचा इशारा देणारी एक कोरडी, मुख्य बातमी झाली, आणि बातमी चुकवू नये, या पत्रकारितेच्या मूल्याची जेमतेम जपणूक झाली. ३ जूनला निसर्ग वादळाने कोकण किनारपट्टीवर अक्षरशः हैदोस घातला. कोकणाचे हिरवे सौंदर्य पुरते धुवून टाकले, आणि पुढच्या किमान दोन दशकांचे भविष्यही पुसून टाकले. प्रचंड हानी झाली. अक्षरशः विध्वंस झाला. जिवाच्या आकांताने स्वतःस आणि पाळळेल्या जनावरांस सांभाळत कोकणी माणसाने कसेबसे स्वतःस वाचविले, आणि भकास वर्तमानाकडे निराशेने पाहात त्याने ती अंधारमय रात्र काढली. दुसरा दिवस उजाडला, तेव्हा या विनाशाचे विषण्ण रूप त्याच्यासमोर साकळलेले होते, आणि या लोकशक्तीने, निसर्ग संकट टळले, वगैरे मोघम मथळा देऊन दुसऱ्या दिवशीचे कर्तव्य त्रयस्थपणे पार पाडले. आयुष्ये उद्ध्वस्त करून होत्याचे नव्हते करून सोडणाऱ्या संकटांच्या बातम्यांवर मनाच्या ओलाव्याचे शिंपण केले, तर संकटाबाहेरच्या मनांना माणुसकीचे कोंब फुटतात, असा अनुभव आहे. ही कोरडीठाक बातमी त्या दिवशी ज्यांनी वाचली असेल, त्यांना मात्र, संकट टळले, एवढाच बोध त्यावरून झाला असेल यात शंका नाही. पुण्याच्या कुणा प्रतिनिधीने दिलेली पावसाची एक तांत्रिक बातमी विस्ताराने वापरून या स्वयंघोषित लोकशक्तीने निसर्ग संकटाची बोळवण केली, आणि कोकणातील विध्वंसाची जाणीव वाचकांपर्यंत पोहोचलीच नाही. महाराष्ट्राचे नंदनवन असलेला हा प्रदेश जेव्हा उजाड उजाड होऊन भविष्यभयाच्या भयाण जाणिवेने कोलमडून गेला होता, त्या दरम्यान ही लोकशक्ती अग्रलेखाच्या जागेवरही शिक्षणाचा ऊहापोह करत होती. या भयाण संकटाचे वारेदेखील या पानाला शिवले नव्हते, ही दुःखद वस्तुस्थिती सर्वांसमोर आहे. मुंबई, पनवेल, नवी मुंबई, नेरूळ, वसई, ठाणे या परिसरातील जेमतेम छायाचित्रांनी पान भरून आणि कोकणच्या किनारी गावांतील विध्वसांकडे डोळेझाक करून या वर्तमानपत्राने कोकणवासीयांच्या अश्रूंनाच पाने पुसून टाकली.


निसर्ग वादळामुळे विजेचे जवळपास तीन हजार खांब उन्मळून पडले. वादळाने केवढा परिसर कवेत घेतला असावा, याचा अंदाज येण्यासाठी हा आकडा महत्वाचा आहे. साधारणतः पन्नास ते शंभर मीटरवर एक खांब असतो, असे गृहीत धरले, तर किमान दीडशे किलोमीटरच्या परिसराचा वादळाने विध्वंस केला, हे या आकड्यावरून दिसते. या ठिकाणी पुढचे किमान दोन महिने, ऐन पावसाळ्यात वीजेविना राहावे लागेल हे स्पष्ट आहे. अशा वेळी, अंधारात चाचपडणाऱ्या संकटग्रस्तांना पावलापुरता प्रकाश मिळावा यासाठी काही संवेदनशील मने मदत गोळा करू लागली. काही राजकीय पक्षांनी मदतीचे सामान भरलेले ट्रक संकटग्रस्त कोकणात पाठविण्यासाठी रवाना केले. पण, ती मदत खऱ्या गरजवंतांपर्यंत पोहोचली किंवा नाही, याची दखल मात्र घेतली गेलीच नाही.

प्रत्यक्ष संकटातही कानाडोळा करणाऱ्या आत्ममग्न वर्तमानपत्रांना तर याची गरज वाटणार नाही हे सहाजिकच होते...

हे खरे आहे, की करोना नावाच्या जागतिक संकटाने सर्वांस घेरले आहे. ते संकट सर्वांसमोरच आहे. तसेच, या आपत्तीचा फटका बसलेल्या कोकणवासींसमोरही आहे. उलट, त्यांना करोनासोबत या नव्या आपत्तीचे संकट झेलावे लागणार आहे. राज्य सरकारने रायगड जिल्ह्यातील हानीसाठी तातडीची काही मदत जाहीर केली, अन्य नुकसानग्रस्त भागांवरही संवेदनशीलतेची फुंकर मारल्यासारखे केले, पण निसर्ग वादळाने डोळ्यात गोळा केलेल्या आपत्तीचे अश्रू पुसण्यास ही संवेदनशीलता पासंगालाही पुरणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. नारळी-पोफळी आणि आंबे-काजूंची उद्ध्वस्त झाडे उचलून जागांची साफसफाई करण्याचीही उमेद कोकणातील संकटग्रस्त माणसास राहिलेली नाही. त्याच्या हातात आत्ता तरी ती ताकद उरलेली नाही. कारण तो मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. आपल्या हातांनी वाढविलेले जपलेले एकएक झाड जमीनदोस्त झाल्याच्या वेदना सहन करणे त्याला कठीण जात आहे. आसपास पसरलेले विनाशाचे चित्र विषण्ण करणारे असले, तरी त्या पसाऱ्याकडे अस्वस्थपणे पाहात बसण्यापलीकडे त्याच्या हातात काहीही उरलेले नाही. कारण, कोसळलेली झाडे उचलून पसारा आवरण्याकरितादेखील ही मदत पुरेशी नाही. उन्मळून पडलेल्या झाडांमुळे अक्षरशः हजारो ट्रक भरून गोळा होतील एवढी लाकडे असूनही, कवडीमोलानेही ती उचलण्यास कुणी तयार नसल्याने या भकास पसाऱ्यात कोकणातील संकटग्रस्त माणसे उदासपणे वावरत आहेत. या संकटात होरपळलेल्या एखाद्या माणसाशी संवाद सादला, तर त्याच्या आवाजातूनही अश्रू ओघळतात, असा भास व्हावा... ते जाणण्यासाठी संवेदना असावयास हवी. लोकमान्य समजणाऱ्यांनी तीच खुंटीवर टांगली, आणि या भीषण संकटाची सावलीदेखील आपल्याला शिवणार नाही, याचीच जणू खबरदारी घेतली. असे का झाले असावे हे अनाकलनीय आहे.

किनारी कोकणाचे सौंदर्य पुन्हा प्रस्थापित करण्यास संकटग्रस्त कोकणवासीयांना पुढची किमान पंचवीस वर्षे जिवाचे पाणी करावे लागणार आहे. म्हणजे, एका पिढीचे पूर्ण परिश्रम त्यासाठी त्यांना जमिनीत अक्षरशः गाडावे लागतील. निसर्ग वादळाने किनारपट्टीच्या निसर्गाची हानी केलीच, पण निसर्गामुळेच नुकताच उभारी घेऊ लागलेला पर्यटनाचा व्यवसायही पुरता पुसून टाकला. म्हणजे, शेकडो कुटुंबांच्या चरितार्थाच्या साधनांवरच पाणी फिरविले. कोकणच्या अर्थव्यवस्थेचा सारा कणाच निसर्गावर निर्भर होता. तोच पुरता मोडला आहे. अर्थकारणावर तावातावाने चर्चा करून जगास शहाणपणाचे डोस पाजावेत, एवढे तरी या निमित्ताने लोकशक्ती माध्यमांना  वाटले असते, तरी तो एक मानसिक आधार ठऱला असता. पण ते पुण्य साधण्याची संधीच या माध्यमाने गमावली. मानसिकतेमुळे संकेतांना कसा कळत नकळत हरताळ फासला जातो, त्याचे हे उदाहरण... कोकणावर अन्याय करून ही मानसिकता घोर पापाची धनी ठरली आहे. पश्चात्तापानेदेखील ते पाप पुसले जाणार नाही.

कोकणवासी या मानसिकतेमुळे व्यथित आहेत, एवढे सांगण्यासाठीच हा प्रपंच... बाकी आमचे आम्ही पाहून घेऊ. पुन्हा उभे राहू तेव्हा तुम्ही कुठे असावे हे आम्ही ठरवू. एवढी धमक कोकणवासी नक्की दाखवेल...!

- दिनेश गुणे




Sunday, June 21, 2020

आव्हान अजून पुढेच आहे...

समाजमाध्यमांच्या हातात हात घालून त्यांच्या साथीने माध्यमविश्वातील संचार करण्याची अपरिहार्यता वर्तमानपत्र नावाच्या माध्यमास जाणवू लागली आहे. त्यामुळे समाजमाध्यमाला बेदखल करून आपले अस्तित्व राखण्याचे धाडस यापुढे वर्तमानपत्रे करणार नाहीत.
***

एक काळ असा होता, तेव्हा विश्वासार्ह बातमीसाठी लोक केवळ वर्तमानपत्रांवर विसंबून असत. वर्तमानपत्रात बातमी छापून आली म्हणजे ती शंभर टक्के खरी असलीच पाहिजे असा लोकांचा विश्वासही होता. कारण वर्तमानपत्र हाच तेव्हा बातमीचा एकमेव स्रोत होता. पुढे दूरचित्रवाणी (टेलिव्हिजन) नावाचे एक दृकश्राव्य माध्यम आले, आणि वर्तमानपत्राच्या पर्यायाची चिन्हे निर्माण झाली. पण दूरचित्रवाणीचा जमाना आपल्याकडे दूरदर्शन या नावाने सुरू झाला, तेव्हा ते एकसरकारी माध्यम होते. ठरावीक कार्यक्रम, मनोरंजन, माहिती आणि बातम्या असे विविधांगी स्वरूप असूनही दूरदर्शनच्या साचेबद्धपणामुळे माध्यमक्षेत्रात मध्यभागी असलेल्या वर्तमानपत्राच्या अस्तित्वाविषयी फारशी चिंता वाटण्याचे कारणच नव्हते. एक तर, वर्तमानपत्र हे मुख्यतः बातमीकेंद्रीत माध्यम होते, आणि त्याद्वारे मिळणाऱ्या माहितीचे बऱ्याचदाथेट बातमीशी नाते होते. मनोरंजन हा वर्तमानपत्राचा मुख्य गाभा नव्हता. त्यामुळे, मनोरंजनासाठी दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आणि बातम्या व सामाजिक घडामोडींच्या माहितीसाठी मुद्रित वर्तमानपत्र अशा दोन प्रकारांची आपोआप विभागणी झाली होती. हे दोन प्रकार एकमेकांशी पूरकच ठरतील, त्यांची कार्यशैली परस्परांना मारक ठरणार नाही, अशीच तेव्हाची समजूत असल्याने, दूरचित्रवाणीच्या रूपाने माध्यमक्षेत्राने पहिली क्रांती अनुभवली असली, तरी त्याचे परिणाम या क्षेत्रावर झाले नव्हते. दूरदर्शनवर बातम्या मिळत असत, पण त्यांना सरकारी पठडीबाजपणा होता, आणि लोकांची माहितीची भूक वाढत असल्याने मागणीही वाढत होती. पुढे काही खाजगी व विदेशी वाहिन्यांचा जमाना दूरचित्रवाणीवर अवतरला, आणि बातम्यांचा नवा बाज लोकांना जाणवू लागला. पठडीबाज बातम्यांऐवजी, खाजगी वाहिन्यांवरील माहितीपूर्ण दृकश्राव्य तपशीलाची आवड वाढू लागली, आणि मुद्रित माध्यमांना नव्याआव्हानाची चाहूल लागली. अर्थात हे आव्हान अस्तित्वाचे नव्हते, तर बदलाची अपरिहार्यता लक्षात आणून देणारे होते. माहिती विश्वाचा काळ बदलतो आहे, या जाणिवा जाग्या झाल्या. सहाजिकच, वर्तमानपत्रांना आपला ढाचा बदलण्याची गरज वाटू लागली, आणि बातम्यांसोबत मनोरंजन, माहिती, जागतिक घडामोडींचा परामर्श घेणाऱ्या मजकुराच्या पुरवण्यांना वर्तमानपत्राच्या मुख्य अंकाएवढेच महत्व आले. दूरचित्रवाणीसोबत वर्तमानपत्रांच्या विश्वातही बदलाचे वारे जोर धरू लागले, आणि माहिती क्षेत्राच्या परिवर्तनाचा प्रारंभ झाला. लोकशाहीचा चौथा स्तंभ कात टाकू लागला. एका परीने, मुद्रित माध्यमांच्या बरोबरीने माहिती क्षेत्रात हक्काने वावरू लागलेली दृकश्राव्य माध्यमे हे आव्हान नव्हे, तर पूरक माहितीकेंद्र ठरले. वर्तमानपत्रे आणि दृकश्राव्य माध्यमे हा माध्यमक्षेत्राचा पायाविस्तार ठरला. तरीही, दूरचित्रवाणी आपल्या जागेवर तर वर्तमानपत्रे आपल्या जागेवर अविचल होती. वर्तमानपत्रांची जागा दूरचित्रवाणी माध्यम व्यापून टाकेल अशी भीती तेवढीशी तीव्रपणे या क्षेत्रावर दाटली नव्हती, पण नव्या बदलाची ती नक्की चाहूल होती. 
माध्यमविश्वात संगणकाचा, इंटरनेटचा संचार सुरू झाला आणि मग मात्र, बदलाचे वारे वेगवान झाले. एका क्लिकसरशी जगभरातील माहितीचे भांडार जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणासही सहजपणे उपलब्ध होऊ लागले, आणि आता विश्वासार्हता हीच अस्तित्वाची एकमेव कसोटी राहणार याची जाणीव परंपरागत माध्यमांना झाली. थोडक्यात, संगणकाने, म्हणजे, माहिती महाजालाने मात्र, मुद्रित माध्यमांपुढे अस्तित्वाचे खरे आव्हान उभे केले. परिवर्तनाची सुरूवात इथून झाली. गेल्या सुमारे अडीचशे वर्षांपासून भारतात भक्कम असलेला वर्तमानपत्र नावाच्या माध्यमाचा पाया काहीसा डळमळीत झाला. वर्तमानपत्र हे काळाबरोबर असे काही विकसित होत गेलेले माध्यम होते, की तो प्रवास सर्वसामान्यांनाही अचंबित करणारा होता. पारतंत्र्यात खितपत पडलेल्या समाजात स्वातंत्र्याची जाणीव जागविणे हे सुरुवातीचे वर्तमानपत्राचे ध्येय काळानुरूप बदलणे सहाजिकच होते. काही व्यक्तींच्या ध्यासातून जन्म घेतलेल्या या व्यवसायाने कालांतराने उद्योगाचा दर्जा प्राप्त केला, आणि ते क्षेत्र काही ठराविक उद्योजकांच्या मुठीत गेले. वर्तमानपत्रांची समाजमनावरील पकड आणि त्यातील मजकुराची प्रभावी परिणामकारकता यांमुळे राजकारणी किंवा कोणत्याही घटकावर दबाव किंवा अंकुश राखण्याची ताकद असलेल्या या माध्यमाशी जुळवून घेण्याचे किंवा त्यास उपकृत करून आपल्या कह्यात ठेवण्याचे प्रयत्नही केले गेले, आणि काही वर्तमानपत्रांवर राजकीय रंगदेखील चढले. वर्तमानपत्रे हे प्रचाराचे साधन म्हणून वापरण्याची स्पर्धा सुरू झाली. थोडक्यात, परिवर्तनाचे एकएक पाऊल पुढे पडत असतानाही, वर्तमानपत्राची ताकद आणि विश्वासार्हतादेखील, बऱ्यापैकी अबाधितच होती. त्यामुळे, लोकांना काय वाचायला हवे त्यानुसार मजकूर देण्यापेक्षा, लोकांनी काय वाचायला हवे अशा भूमिका घेत काही वर्तमानपत्रांनी आपला ढाचा आखला. जनमत मुठीत ठेवण्याच्या या शक्तीमुळेच वर्तमानपत्रांची ताकद होती, त्यामुळे सरकारला, राजकारण्यांनाही वर्तमानपत्राचा धाक होता. त्याच वेळी दूरचित्रवाणी क्षेत्रात पूर्णवेळ वृत्तवाहिन्यांचा उदय सुरू झाला, आणि वर्तमानपत्रांच्या या ताकदीची विभागणी स्पष्ट दिसू लागली. बातमी किंवा घडामोडींचे विश्लेषण दुसऱ्या दिवशी समाजापर्यंत पोहोचविणाऱ्या वर्तमानपत्रापेक्षा, ते काही क्षणांतच दृकश्राव्य स्वरूपात पोहोचविणाऱ्या वृत्तवाहिन्यांचे महत्व आपोआपच प्रस्थापित होत गेले. या माध्यमाद्वारे बातमी थेट दिसू लागल्याने त्यांची विश्वासार्हताही वर्तमानपत्राहून अधिक असल्याची लोकांची खात्री झाली, आणि माध्यमविश्वाचा काळ खऱ्या अर्थाने बदलला. आता वर्तमानपत्रांनादेखील, बातमीसाठी दूरचित्रवाणी वाहिन्यांचा मसाला उपयोगी पडू लागला होता. दुसऱ्या दिवशी बातम्या देऊनही त्याचा ताजेपणा टिकविणे किंवा अगोदरच माहीत असलेली बातमी लोकांनी तितक्याच उत्सुकतेने वाचावी असे काहीतरी नवे तंत्र अवलंबिणे ही वर्तमानपत्राची गरज झाली, आणि तेव्हा मात्र, माध्यमविश्वातील नव्या आव्हानांपुढे टिकाव धरणे हा वर्तमानपत्राचा चिंतेचा विषय सुरू झाला... तोवर वाचकही सजग झाला होता. बातमीची सत्यासत्यता पडताळून पाहणे त्याला सहज शक्य झाले होते, आणि त्याला आव्हान देणेही शक्य आहे याची जाणीवदेखील त्याला झाली होती. वर्तमानपत्राबरोबरच, वृत्तवाहिन्यांनाही या बदलाचे परिणाम जाणवू लागले होते, आणि नेमक्या त्याच काळात सोशल मीडिया -समाजमाध्यम- नावाच्या नव्या युगाचा जन्म झाला होता. 
हे माध्यम कल्पनेपेक्षाही अधिक वेगाने विस्तारले, आणि अल्पावधीतच लोकप्रिय होऊन इतके फोफावले, की परंपरागत माध्यमेच नाही, तर माध्यमकर्मी, पत्रकार नावाचा जो एक विशिष्ट वर्ग समाजात होता, त्यालाही अस्तित्वभयाची जाणीव होऊ लागली. त्याच्या जबाबदाऱ्या वाढल्या, आणि बातमीदारी किंवा पत्रकारिता ही केवळ आपली मक्तेदारी आहे, ही तोपर्यंत अबाधित असलेली समजूतही डळमळीत होऊ लागली. हा एक अनपेक्षित असा बदल होता. कारण समाजाचाही माध्यमविश्वात सहज संचार सुरू झाला होता. सुरुवातीला केवळ सोशल नेटवर्किंग या उद्दशाने उदयास आलेली समाजमाध्यमे ही बघता बघता माध्यमविश्वाच्या केंद्रस्थानी जाऊन बसली आहेत. तळहातावरच्या मोबाईलमध्ये झालेली अॅप क्रांती हे त्याचे मुख्य कारण
तरीही, समाजमाध्यमांच्या विश्वासार्हतेवर मान्यतेची शंभर टक्के मोहोर अजूनही उमटलेली नाहीच. फेसबुक, ट्वीटरसारख्या माध्यमांमुळे बातमीचा समाजापर्यंत पोहोचण्याचा वेग इतका वाढला, की त्याची शहानिशा करण्याचे भानही अनेकदा पाळले गेले नाही. आपल्याला कळलेली किंवा आपल्यापर्यंत पोहोचलेली बातमी पहिल्यांदा इतरांपर्यंत पोहोचविण्याच्या घाईने समाजाला पछाडले, आणि फेक न्यूज नावाच्या एका नव्याच त्रासाचा माध्यमक्षेत्रात जन्म झाला. फोर्ब्जने गेल्या वर्षा केलेल्या एका पाहणीनुसार, अमेरिकेतील ४३ टक्के जनता बातम्यांसाठी फेसबुकचा, २१ टक्के लोक यूट्यूबचा, तर १२ टक्के लोक ट्वीटरचा स्रोत म्हणून वापर करू लागले होते. त्यापाठोपाठ समाजमाध्यमांवरील समाजाच्या वावरण्याच्या अभ्यासासही गती आली, आणि समाजमाध्यमे हे बातमीचा स्रोत म्हणून समाजाचे अविभाज्य अंग ठरू पाहात आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. वर्तमानपत्र किंवा वृत्तवाहिन्यांवर बातमी अवतरण्याआधी ती समाजमाध्यमांवर येऊ लागली, आणि जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांपैकी निम्म्याहून अधिक लोक त्याच बातम्यांचे उपयोगकर्ते झाले. त्यातच, एखाद्या बातमीमागची बातमी जाणून घेण्यासाठी इंटरनेटचा वापर वाढला, आणि तोपर्यंत याचसाठी असलेली वर्तमानपत्राची गरजही कमी होऊ लागली. 
अर्थात, समाजमाध्यमांचा समाजमनावर नकळत एक विचित्र प्रभाव सुरू झाला होता. वाचनाची सवय संकुचित होत गेली. बातमीचा गाभा समजावून घेण्यापुरतीच बातमी वाचण्याची सवय वाढू लागली. असे म्हणतात, की समाजमाध्यमांचा वापर वाढू लागल्यापासून, कोणत्याही मजकूरावर १५ सेकंदाहून अधिक वेळ रेंगाळणारा वाचक दुर्मीळच होऊ लागला. वाचण्यापेक्षा, व्हिडियो पाहून बातम्यांचा किंवा घडामोडींचा परामर्ष घेणे त्याला अधिक आवडू लागले. त्यामुळे समाजमाध्यमांची जबाबदारी आता वाढली आहे. वर्तमानपत्राने अनेक दशकांच्या परिश्रमानंतर प्राप्त केलेली विश्वासार्हता मिळविणे हे समाजमाध्यमांसमोरील आव्हान आहे. कारण या माध्यमावर बातमी किंवा मजकुराची (कन्टेन्ट) निर्मिती करणारी प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या त्याच्या भिंती’(वाॅल)ची संपादक’ किंवा बातमीदार असते. त्या व्यक्तीने निर्माण केलेला मजकूर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, त्याला अधिकाधिक लाईक्स किंवा शेअर्स मिळावेत, यासाठी विश्वासार्हता हा निकष त्यालाही पाळावाच लागणार आहे. त्यासाठी, फेक न्यूजला आळा घालणे आणि विशुद्ध माहिती समाजापर्यंत पोहोचविणे हे समाजमाध्यमांसमोरील आव्हान राहणार आहे. सध्या समाजमाध्यमांवर सनसनाटी किंवा वैचित्र्यपूर्ण मजकुराचाच प्रसार अधिक असलेला दिसतो. म्हणजे, विश्वासार्ह मजकुराचा अजूनही तेथे अभावच आहे. कारण, सत्यापेक्षा विपर्यासाचा किंवा खोट्याचा प्रसार अधिक वेगाने होत असतो, असे म्हटले जाते. सत्य उंबरठा ओलांडून घराबाहेर निघेपर्यंत असत्य गावभर हिंडून आलेले असते असे म्हणतात. तोच न्याय समाजमाध्यमांवर दिसतो, आणि लोकांना हे माहीतही आहे. त्यामुळे समाजमाध्यमे हे प्रस्तापित माध्यमांसमोरील आव्हान असले, तरी अस्तित्वाला आव्हान देण्याची ताकद त्यांना अद्याप प्राप्त झालेली नाही. विश्वासार्हता हा त्या ताकदीचा पाया आहे. वर्तमानपत्रांनी याच पायावर स्वतःची उभारणी केली होती. त्याला आव्हान देणारी माध्यमे जोवर स्वतःस सिद्ध करू शकत नाहीत, तोवर वर्तमानपत्रांच्या अस्तित्वाची चिंता नाही. एक मात्र खरे, की, समाजमाध्यमांच्या हातात हात घालून त्यांच्या साथीने माध्यमविश्वातील संचार करण्याची अपरिहार्यता वर्तमानपत्र नावाच्या माध्यमास जाणवू लागली आहे. त्यामुळे समाजमाध्यमाला बेदखल करून आपले अस्तित्व राखण्याचे धाडस यापुढे वर्तमानपत्रे करणार नाहीत. कारण, आजच्या बातमीचा उद्यापर्यंत ताजेपणा टिकण्याचे दिवस आता संपले, याची जाणीव वर्तमानपत्रांना ठेवणे भाग पडणार आहे. समाजमाध्यमांनीच ती किमया करून दाखविली आहे. त्यामुळे, बातमी चुकविणे आता वर्तमानपत्रांना परवडणारे नाही. ती चुकली, तर तळहातावरच्या मोबाईलवर एका बोटासरशी पर्याय देणारे साधन आता लोकांच्या हाती आले आहे. ते मात्र, आव्हान आहे!
(फोटो- प्रतीकात्मक, इंटरनेटवरून)

Thursday, June 18, 2020

श्रीमंत पत्रकारितेचा अखेरचा अंश!

आवाजी पद्धतीने वाजविल्या जाणाऱ्या ब्रेकिंग न्यूजचे आयुष्य किती टिकते, हे सर्वांनाच माहीत आहे. उलट, त्यामुळे बातमीदारी नाट्यमयझाल्याचा सूर सर्वसामान्य वाचकवर्गात सतत उमटत असतो. एखादी बातमी समोर आली, की सर्वात अगोदर त्यावर वाचकाचे प्रश्नचिन्ह उमटते, अशा दुर्दैवी काळातही, रणदिवे यांच्या चारपाच दशकांहूनही जुन्या बातम्या अजूनही गाजावाजा न करता गाजत राहतात, हे त्यांच्या बातमीदारीच्या सच्चाईचे यश आहे. 
***
एखाद्या कोपऱ्यातलादेखील पालापाचोळाही ढिम्म हलणार नाही अशा बातम्या सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज असे  कानठळ्या बसविणाऱ्या ढणढणाटाच्या पार्श्वभूमीवर सांगण्याचा जमाना तेव्हा जन्मालाही आलेला नव्हता. पेड न्यूज हा शब्ददेखील कुणाच्याच कानावर पडलेला नव्हता, आणि वृत्तवाहिन्यांचे तर भविष्यदेखील कुणी वर्तविलेले नव्हते.फूटपाथवरच्या दूधवाल्याकडून दुधाच्या बाटल्या घेऊन येताना सोबत आणलेले वर्तमानपत्र सकाळच्या चहासोबत वाचताना काही सुखाच्या, थोड्या दुःखाच्या आणि तरीही, सगळ्याच आपल्या वाटतील अशा बातम्या वाचण्याची सवय झाल्यामुळे वर्तमानपत्र हा खराखुरा मित्र वाटावा असा तो काळ होता. त्या काळात, दादरसारख्या भागाची भरभराट नुकतीच सुरू झाली होती. गिरगाव, गिरणगावासारख्या भागात दीड खोलीतल्या संसारात बहुसंख्य मराठी वाचक सामावलेला असल्याने वर्तमानपत्राचे पहिले पान झगमगाटी जाहिरातीने व्यापलेले नसायचे, तरीही तो काळ म्हणजे मराठी वर्तमानपत्रसृष्टीच्या श्रीमंतीचा खरा सुवर्णकाळ होता. ज्या काही मोजक्या पत्रकारांनी मराठी पत्रकारितेकडे ही श्रीमंती खेचून आणली होती, त्यामध्ये आघाडीचे नाव होते, दिनू रणदिवे यांचेकोणताही अभिनिवेश न गाजविता, कोणताही ढणढणाट, जाहिरात न करता, पत्रकारितेच्या साऱ्या सच्चाईला जागून संयत आणि संकेतांच्या चौकटीतील बातमीने साऱ्या यंत्रणांना हलवून सोडण्याचे आणि वाचकांना विचार करायला लावण्याचे सामर्थ्य दिनू रणदिवे यांच्या बातमीने मराठी वर्तमानपत्रांच्या दुनियेला बहाल केले, म्हणून ही पत्रकारिता श्रीमंत झाली. 
काळ बदलला, आणि श्रीमंतीचा हा प्रवाह पत्रकारितेकडून पत्रकारांकडे वाहू लागला. आजकाल समाजमाध्यमांमुळे माध्यमविश्वात आलेल्या पारदर्शकपणामुळे, हा बदल सहजपणे समाजास लख्ख दिसू लागलापत्रकारितेला श्रीमंती बहाल करणाऱ्या दिनू रणदिवे यांच्यासारख्या पत्रकाराचे जगणे त्यामध्ये काहीसे झाकोळूनच गेले. पत्रकारितेविषयी जकाल सामान्य माणसाच्या मनात काही शंका रूढ झालेल्या आहेत. अशा काळात, सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी सक्रीय पत्रकारितेतील निवृत्तनंतरही पत्रकाराचा पिंड जिवंत ठेवून उतरत्या वयातही त्यावर सुरकुतीही पडणार नाही याची काळजी घेणाऱ्या दिनू रणदिवेच्या दीड खोलीच्या घराने मात्र, या झगमगाटातदेखील त्यांच्या काळातील पत्रकारितेची श्रीमंती जपली, आणि पत्रकाराच्या श्रीमंतीचा स्पर्शदेखील आपल्या घराला होणार नाही, याची व्रतस्थपणे काटेकोर काळजीदेखील घेतली.
आवाजी पद्धतीने वाजविल्या जाणाऱ्या ब्रेकिंग न्यूजचे आयुष्य किती टिकते, हे सर्वांनाच माहीत आहे. उलट, त्यामुळे बातमीदारी नाट्यमयझाल्याचा सूर सर्वसामान्य वाचकवर्गात सतत उमटत असतो. एखादी बातमी समोर आली, की सर्वात अगोदर त्यावर वाचकाचे प्रश्नचिन्ह उमटते, अशा दुर्दैवी काळातही, रणदिवे यांच्या चारपाच दशकांहूनही जुन्या बातम्या अजूनही गाजावाजा न करता गाजत राहतात, हे त्यांच्या बातमीदारीच्या सच्चाईचे यश आहे. कारण, त्यांची बातमीदारी केवळ नोकरी नव्हती. पत्रकारिता हा पेशा नव्हे, तर बांधीलकी आहे, या विचाराशी ठाम राहून, सामान्य माणसाचे प्रश्न हा बातमीदारीचा कणा मानून त्याच्याशी इमान राखण्याची पत्रकारिता रणदिवे यांनी केली. त्यांनी पत्रकारिता हे चळवळीचे माध्यम मानले, आणि  पत्रकारितेलाच आंदोलनाचे रूप दिले. त्यांच्या पत्रकारितेतून शोषितांचा आवाज उमटत राहिला, त्यांच्या पत्रकारितेच्या पुण्याईतूनच वर्तमानपत्रालाही वाचक मित्र मानू लागले. 
असे म्हणतात, की कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याची अनुभूती आणि संस्कारांचे प्रतिबिंब त्याच्या केवळ व्यक्तिमत्वावरच नव्हे, तर त्याच्या व्यावसायिक जीवनावरही उमटलेले असते. दिनू रणदिवे यांनी आपल्या बालपणापासून कळत्या वयापर्यंतच्या आयुष्यात ज्या खंबीरपणे परिस्थितीशी सामना करत व्यावसायिक शिखर गाठले, त्या परिस्थितीची सावली हटवून समाजाला सुखाचे दिवस दाखविण्यासाठी त्यांनी लेखणी चालविली. रात्रभर रस्त्यावर कुडकुडत झोपणाऱ्या गरीबांच्या हालअपेष्टांचा मागोवा घेण्यासाठी ते पुन्हा स्वतः रात्ररात्र जागले, आणि आपल्या लेखणीच्या ताकदीवर अनेक उपेक्षितांना मायेची ऊब मिळवूनही दिली. गोवा मुक्तीसंग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभागामुळे भोगलेल्या तुरुंगवासामुळे पत्रकारितेस आवश्यक असलेल्या कार्यकर्तेपणाची जोड त्यांना मिळाली, म्हणून त्यांची लेखणी अधिक तेजाने तळपून समाजाच्या समस्यांच्या चौफेर माहितीमुळे समृद्ध झाली. लोकमित्र, धनुर्धारीमधील पत्रकारिमुळे धारदार झालेली लेखणी हे शस्त्र घेऊन ते महाराष्ट्र टाईम्स या दैनिकात दाखल झाले, आणि चळवळी व आंदोलनांमुळे समाजाला माहीत असलेले दिनू रणदिवे हे नाव घराघरात पोहोचले. महाराष्ट्र टाईम्समधील सलग २३ वर्षांच्या जाज्ज्वल्य पत्रकारितेतून त्यांनी मराठी पत्रसृष्टीला नवा आयाम मिळवून दिला, आणि शोध पत्रकारितेचा आदर्श पत्रकारितेच्या नव्या पिढीसमोर ठेवला. 
पत्रकाराने चळवळ्या असावे की नाही, यावर त्याआधी आणि पुढेही काही काळ पत्रकारितेच्या विश्वात मतांतरे सुरू होती. दिनू रणदिवे यांनी आपल्या कौशल्याने त्याला कधीच उत्तर देऊन ठेवले होते. चळवळी, आंदोलने हे समाजाच्या समस्यांची जाणीव करून देणारे माध्यम असल्याने, समाजाशी नाळ जोडून त्यांच्या समस्यांसाठी बातमीदारी करणाऱ्या प्रत्येक पत्रकाराने कोणत्याही चळवळीशी नाते जोडलेच पाहिजे, हे त्यांनी दाखवून दिले. 
आपण काय कमावलं याचा विचार त्यांनी केला नाही, म्हणून दादरच्या दीड खोलीच्या घरातही पत्रकारिता ऐश्वर्यसंपन्न झाली. एका खिडकीतून झिरपणाऱ्या मंद उजेडातही झगमगणाऱ्या तिच्या ऐश्वर्याची सर, अनेक ऐश्वर्यसंपन्न घरांना कधीच लाभली नाही. 
आजही पत्रकारितेला जे काही वलय शिल्लक आहे, त्याचे श्रेय दिनू रणदिवे यांच्यासारख्या निष्ठावंतांनी कमावलेल्या पुण्याईला द्यावेच लागेल.

Sunday, June 7, 2020

प्रश्नचिन्ह !


करोनाचा उद्रेक सुरू झाल्यापासून अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण अमेरिकेत ५१ टक्क्यांनी, तर फ्रान्समध्ये ९० टक्क्यांनी खाली आले आहे. देहदान चळवळीवरही करोनाचे सावट दाटले आहे...
------


जगणं हातात नाही. नसतंच ते. मरणही हातात नसतं. पण आपण जिवंत असेपर्यंत कसं जगावं हे ठरविण्याचा अधिकार आपल्याला असायला हवा. मेल्यानंतरही, आपलं काय व्हावं हे ठरविण्याचा अधिकार आपल्याला असायला हवा. करोनाच्या महामारीमुळे हे दोन्ही अधिकार हिरावले गेले आहेत. मला जगण्याची चिंता नाही. पण मेल्यानंतर आपल्या देहदान करावं, आणि मागे उरलेल्या कोणासाठी तरी आपल्या देहानं दधीची व्हावं असं मला वाटत होतं... आता त्याची शाश्वती राहिलेली नाही!’...
उद्विग्न मनानं तो बोलत होता. चांगलं आयुष्य जगण्यासाठी जे काही आपल्याकडे असावं लागतं, ते सारं त्याच्यासमोर हात जोडून उभं होतं. आपल्या जगण्याचा आनंद इतरांसोबत वाटून घ्यावा, त्यांच्या आयुष्यातही त्या आनंदाचे चार क्षण उधळावेत, यासाठी तो धडपडत होता. त्यातूनच त्याने पूर्वीच एक निर्णय घेतला. देहदान करायचं... मरणानंतर आपला देहाची नाहक राख होऊ द्यायची नाही. वैद्यकीय क्षेत्राला संशोधनासाठी आपला देह अर्पण करायचा, हे ठरवून त्याने देहदानाची सारी प्रक्रिया जिवंतपणी पूर्ण केली होती. कधीकधी त्याविषयी तो भरभरून बोलायचा. मरणानंतरच्या त्या पुण्यकर्माचा आनंद त्याच्या डोळ्यात जिवंत झालेला स्पष्ट उमटायचा... मृत्यू हा आयुष्यातील सर्वात सुखद सोहळा असावा असं वाटावं, इतकं भरभरून तो देहदानाविषयी बोलू लागला, की ते ऐकणाऱ्या आणखी कुणाच्या मनातही देहदानाचे विचार घोळू लागायचे...
देहदान चळवळीचा तो एक सक्रीय कार्यकर्ता बनला होता. अनेक सोसायट्यांमध्ये, संमेलनांमध्ये, कधी निमंत्रित म्हणून, कधी आगंतुक म्हणूनही जाऊन तो देहदानाचं महत्त्व समजावून सांगायचा.
आता मात्र, त्याचा सूर काळवंडला आहे. त्याच्या इच्छेवर कसलं तरी अगम्याचं ग्रहण दाटलं आहे. देहदान करण्याचा आपला संकल्प पूर्ण होणार, की आपल्या देहाची माती होणार, या चिंतेने त्याचा दिवस काळवंडतो. देहदानाविषयी आता तो उत्साहाने बोलत नाही. त्याच्या बोलण्यात देहदान चळवळीच्या भविष्याचं प्रश्नचिन्ह उमटलेलं दिसतं. देहदान तर दूरच, जिवंतपणी आपण कुणाच्या उपयोगी पडू की नाही याचीदेखील आता शाश्वती नाही, असं काहीतरी तो आता बोलू लागला आहे...
हे खरंच आहे...
करोनाचा विळखा घट्ट होऊ लागल्यापासून माणसांचं जगणंही अनश्चिताच्या विळख्यात सापडलं आहे. मनसारखं जगण्याचा हक्क संपलाच आहे, पण मरणानंतर आपल्या देहाचं काय करायचं, हे ठरविण्याचा हक्कदेखील सध्या संपला आहे. अनपेक्षितपणे झडप घालणाऱ्या मृत्यूने, मरणानंतरच्या देहाची विल्हेवाट लावण्याच्या हक्कावरही घाला घातला आहे.
देहदानासारखी माणसाच्या मनाला मोठेपणा मिळवून देणारी एक चळवळ या साथीमुळे संकटात सापडली आहे.
अवयवदान करून अन्यांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यातील समाधानही या संकटाने संपविले आहे.
सारे काही अनिश्चित झाले आहे. या चळवळींचे भविष्य काय, असा प्रश्न विक्राळपणे भेसूर होऊन भेडसावू लागणार आहे, आणि त्याचा मोठा फटका भविष्यात वैद्यकशास्त्रातील संशोधनकार्यास बसेल, अशी भीतीही व्यक्त होऊ लागली आहे.
ह्रदय, मूत्रपिंडे, फुफ्फुसे, डोळे, यकृत असे अवयव निकामी झाल्यामुळे जगणे दुरापास्त झालेले हजारो जीव जगभरात दात्यांच्या प्रतीक्षेत आयुष्य कंठत असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगभरातील दीड लाखांहून अधिक माणसे, कोणाच्या तरी अवयवदानाच्या पुण्याईवर आपल्या आयुष्याचा आनंद उपभोगत आहेत. अमेरिकेसारख्या देशात वर्षाकाठी चाळीस हजार रुग्णांवर अवयवरोपण शस्त्रक्रिया होत असल्या, तरी लाखो रुग्ण अवयवदात्यांच्या प्रतीक्षेत वेदनामय जीवन जगत असतात, आणि हजारो रुग्ण प्रतीक्षा सहन न झाल्याने जगाचा निरोप घेतात.
करोनामुळे आता अववदानाच्या मोहिमांपुढे नवेच संकट निर्माण झाले आहे.  करोनामुक्त अवयवदाता मिळण्याचे मोठे आव्हान वैद्यकक्षेत्रास भेडसावणार आहे. ही केवळ अमेरिका आणि युरोपीय देशांची नव्हे, तर संपूर्ण जगाची एक  समस्या ठरणार आहे. या समस्येची तीव्रता आता जाणवू लागली आहे, पण भविष्यात ती किती भयाण ठरेल त्याचा साधा अंदाजही आता लागणे अशक्य झाले आहे. 
 करोनाचा उद्रेक सुरू झाल्यापासून अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण अमेरिकेत ५१ टक्क्यांनी, तर फ्रान्समध्ये ९० टक्क्यांनी खाली आल्याचे काही पाहणी अहवालांवरून दिसते. यामध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे हा पाहणी अहवाल सांगतो. ह्रदय, यकृत, फुफ्फुस प्रत्योरापणाच्या शस्त्रक्रियादेखील करोनाच्या संकटामुळे थंडावल्यामुळे, या अवयवांशी संबंधित व्याधींनी ग्रासलेल्यांच्या जगण्याच्या शक्यताही मंदावत चालल्या आहेत..
या समस्येचा सर्वात मोठा फटका नेत्रहीनांना बसत आहे. नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याची भावना अलीकडे समाजात रुजत असतानाच, या साथीमुळे या चळवळीची मोठी हानी झाली आहे. भारतामध्ये वर्षाकाळी जवळपास २५ हजार नेत्रहीनांवर नेत्रप्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतात, आणि अंधांचे जीवन दृष्टीने उजळून निघते. प्रत्यक्षात, वर्षाकाठी लाखाहून अधिक अंध नेत्ररोपणाच्या प्रतीक्षेत अंधारमय जीवन जगत असतात. आता करोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे अंधांचे सर्वसाधारण जगणेही अवघड झाले असताना, नेत्रदान चळवळीस बसणारा हा फटका अधिकच अंधार पसरविणारा ठरणार आहे.
अर्थात, वैद्यकीय क्षेत्राने या समस्येमुळे आशा सोडलेली नाही. यातूनही मार्ग काढून, नवजीवन देणाऱ्या या चळवळीस संजीवनी मिळेल, असा या क्षेत्रातील अनेकांचा विश्वास आहे. आजच्या परिस्थितीत मात्र, अवयवदान, देहदान, किंवा नेत्रदानाच्या चळवळीस खीळ बसल्याने, एक मोठे अंधारमय प्रश्नचिन्ह भविष्याच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे, हे वास्तव आहे.
देहदान करणाऱ्या दधीची ऋषीची गोष्ट पुराणकाळापासून आजवर अमर राहिली आहे. त्या गोष्टीच्या अमरत्वावर काजळी दाटली आहे.




Saturday, June 6, 2020

आत्मनिर्भर महाराष्ट्र


स्वबळावर करोनाचा सामना करणाऱ्या जनतेस दिलासा देण्यासाठी रेमडेसीवीर इंजेक्शनची खरेदी करून राज्याला आत्मनिर्भर करण्याच्या ठाकरे सरकारच्या प्रयत्नांकडे देश उत्सुकतेने पाहात आहे.
------

टाळेबंदीसारख्या उपाययोजनाही निष्प्रभ ठरल्यामुळे रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्या वाढतच चालल्याने आता महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने स्वबळावर करोनाविरुद्धचा लढा लढण्याची तयारी सुरू केली आहे. करोनाच्या उपचारास सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या दहा हजार कुप्या खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 
करोनावरील उपचारात या इंजेक्शनचा सकारात्मक परिणाम दिसून आल्याचा निर्वाळा आता जागतिक आरोग्य संघटनेने दिला असून, प्रयोगशाळा, प्राणी आणि क्लिनिकल अभ्यासातील पुराव्यांच्या आधारे करोना विषाणुमुळे होणाऱ्या आजारावरील उपचारात याचा आशादायक परिणाम दिसला आहे, असे राज्य सरकारचे मत आहे. हे औषध अत्यंत महाग असून सामान्य गरीब रुग्णांना ते उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने व्यवस्था केली आहे, अशी ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
करोनाबाधितांच्या संख्येत दररोज सरासरी अडीच हजारांची वाढ होत असताना महाराष्ट्रात टाळेबंदीचा अंमल टप्प्याटप्प्याने शिथील करण्यास सुरुवात झाली आहे. जनतेने करोनासोबत जगावे यासाठीची मानसिकता तयार करण्याचाच हा अप्रत्यक्ष प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. मुंबई महानगर प्रदेशातील इस्पितळांमध्ये रुग्णांसाठी जागा नाही, वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना भीतीने ग्रासले आहे, रुग्णवाहिकाचा तुटवडा, सरकारच्या सज्जड इशाऱ्यास न जुमानता खाजगी इस्पितळांमध्ये सुरू असलेली मनमानी आणि त्यामध्ये होरपळणाऱ्या रुग्णांची तडफड असे सध्याचे महामुंबईतील चित्र आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढते आहे, आणि करोनाच्या विळख्यात सापडलेल्यांच्या करुण कहाण्या भयाचे सावट दाट करीत आहेत. या फैलावाविरुद्धच्या लढाईत यंत्रणांची दमछाक झाली आहे. त्यामुळे, स्वबळावर करोनाचा सामना करणाऱ्या जनतेस दिलासा देण्यासाठी रेमडेसीवीर इंजेक्शनची खरेदी करून राज्याला आत्मनिर्भर करण्याच्या ठाकरे सरकारच्या प्रयत्नांकडे देश उत्सुकतेने पाहात आहे.

अजित पवार यांचा इशारा

करोना रुग्णांवरील उपचारात हयगय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. उपचारांना नकार देणे म्हणजे वैद्यकीय नैतिकतेस हरताळ फासणे आहे, त्यामुळे असे करणाऱ्या खाजगी रुग्णालयांवर कडक कारवाई केली जाईल, असे पवार यांनी वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना सुनावले. टाळेबंदीचे नियम जनतेकडून धाब्यावर बसविले जात असल्याबद्दलही पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा लोकांना धडा शिकवा, असा आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
टाळेबंदीचे नियम शिथील केल्याबरोबर जणू करोनाचा फैलाव संपल्याच्या आवेशात पूर्वपदावर येण्याची घाई करणे धोक्याचे असून अंतरभान राखून करोनाला दोन हात दूर ठेवण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे या बैठकीत वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

मद्यविक्री जोरात...

राज्यात घरपोच मद्यविक्रीस परवानगी मिळाल्यानंतर गेल्या १५ मे पासून नऊ लाख ४७ हजार ८५१ ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यापैकी मुंबई शहर आणि उपनगरांतील ३४ हजार ग्राहकांना घरपोच मद्यपुरवठा करण्यात आला आहे... अवैध मद्यविक्रीप्रकरणी सात हजार २२५ गुन्हे नोंदविले गेले असून, १८ कोटी ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आम्हाला वाचवा...
दरम्यान, करोनाच्या फैलावामुळे सारे भविष्यच अनिश्चित झाले असून कोणत्याच उपाययोजना डोळ्यासमोर दिसत नसल्याने आता संकट अंगावर घेऊन जगावे लागणार याची जाणीव लोकांना होऊ लागली आहे. व्यापर, उद्योगधंदे कायमचे बंद ठेवले, तर जगण्याचे मार्गच खुंटतील अशा भीतीने व्यापाऱ्यांनी नव्या जीवनपद्धतीस सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये मात्र, भविष्याच्या भयाचे दाट सावट पसरले आहे. पदवी परीक्षा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयावर नाराजीचे सूर उमटत आहेत.


Wednesday, June 3, 2020

मीडीयाचं माध्यम...


राजकारणातील असंख्य अडथळे सहज पार करून एका टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी चाणक्याची बुद्धी हवी, अमाप संघटनकौशल्य हवा, जनाधार हवा, आणि मुख्य म्हणजे, प्रसार माध्यमांचा विश्वासही संपादन करता यायला हवा. गोपीनाथ मुंडेंनी हे सारं मिळवलं, म्हणूनच ते राजकारणाच्या राष्ट्रीय प्रवाहातही सहज सामील झाले...
काळाच्या छाताडावर आपले स्मृतिचिन्ह उमटविणाऱ्या या माणसास, नमन!

***



पत्रकार कधीच कुणाचा मित्र नसतो. त्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे...
... एका बाजूला कोंडाळं करून बसलेल्या पत्रकारांच्या कंपूतील एकाच्या पाठीवर दाणकन थाप मारत शेजारची खुर्ची ओढून बसताबसता मुंडे म्हणाले, आणि दिलखुलास हसत त्यांनी सर्वांची विचारपूस सुरू केली. आपल्या साडेतीन चार दशकांच्या राजकारणातील अनुभवानंतर सहजपणे मुंडेंनी हे वाक्य उच्चारलं, आणि नंतर, पत्रकार आणि पत्रकारितेच्या नावानं चौकार, षटकार हाणायला सुरुवात केली. 
मग हशा, टाळ्यांचा पाऊस पडत राहिला...
... पण राजकारणात राहून पत्रकारांशी वैर म्हणजे, पाण्यात राहून माशाशी वैर असा प्रकार असल्याची पुरेपूर जाणीव गोपीनाथ मुंडेंना होती. तसं नसतं, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील यच्चयावत पत्रकारांच्या मांदियाळीशी त्यांचं मैत्र जुळलंच नसतं. आपल्या आयुष्यातील अनेक नाजूक क्षण त्यांनी दिलखुलासपणे आणि मैत्रभावनेने पत्रकारांच्या गप्पांच्या अड्ड्यात सहभागी होऊन मोकळे केले. म्हणूनच, 'पत्रकारांपासून लांब राहावं', असं जरी ते म्हणाले, तरी पत्रकारांना तेव्हा त्याचा राग आला नाही. गप्पांमध्ये खुसखुशीतपणा पेरण्यासाठी केलेला तो एक राजकीय विनोद होता, हे पत्रकारांना माहीत होतं...
म्हणूनच, गोपीनाथ मुंडे आणि पत्रकार यांच्यात कधीच अंतर राहिलं नाही. खरं म्हणजे, भाजप आणि प्रसार माध्यमं- म्हणजे अलीकडची टीव्ही चॅनेल्स, आणि पूर्वीपासूनची वर्तमानपत्रं- दोघांचंही निदान महाराष्ट्रात तरी फारसं सख्य नाही. पण गोपीनाथ मुंडे भाजपचे नेता असूनही, ते आणि प्रसार माध्यमं असं रसायन अनेकदा मस्त जुळून आलंय. एखाद्या खाजगी कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे असले, की तो सारा कार्यक्रम मुंडेंभोवती फिरत राहातो, हे पत्रकारांना चांगलंच माहीत होतं. म्हणूनच, एखाद्या अगदी नवख्या पत्रकारापासून, ते जाणकार बुजुर्ग पत्रकारापर्यंत सारे त्या कार्यक्रमात हजेरी लावत. मग, दिवसभराची कामाची कितीही दगदग असली, तरी मुंडेंच्या सहवासात तो शीण संपून जातो, आणि एकत्र जमण्यासाठीच्या, शिणवटा संपविण्यासाठीच्या 'बाकीच्या कल्पना'ही मनाला शिवत नसत. कारण, गोपीनाथ मुंडे यांच्या सहवासाची नशा पुरेशी असे...
राजकारण आणि जात हे महाराष्ट्रातलं एक अतूट असं समीकरण राहिलं आहे. म्हणजे, महाराष्ट्राच्या राजकारणावर एकाच जातीचा पगडा आहे, हे सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्राचं राजकारण जातीच्या जोरावर आपल्याला हवं तसं वाकविणारे वाकबगार नेते महाराष्ट्रात जेव्हा राजकारणात मुरले होते, तेव्हा गोपीनाथ मुंडे नावाचा, समाजाच्या मुख्य प्रवाहापासूनही दूर असलेल्या समाजातला एक युवक राजकारणात योगायोगाने प्रवेश करतो, रुजतो, मुळं धरतो, आणि परळीजवळच्या हजारपाचशे वस्तीच्या खेड्यापासून थेट दिल्लीच्या राजकारणापर्यंत मजल मारतो, हा काही केवळ योगायोग किंवा नशिबाचा भाग असू शकत नाही. राजकारणातील असंख्य अडथळे सहज पार करून एका टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी चाणक्याची बुद्धी हवी, अमाप संघटनकौशल्य हवे, जनाधार हवा, आणि मुख्य म्हणजे, प्रसार माध्यमांचा विश्वासही संपादन करता यायला हवा. गोपीनाथ मुंडेंनी हे सारं मिळवलं, म्हणूनच ते राजकारणाच्या राष्ट्रीय प्रवाहातही सहज सामील झाले...
एखाद्या नेत्याच्या खाजगी आणि राजकीय जीवनाबद्दल सर्वसामान्य समाजाला अपार उत्सुकता असते. गोपीनाथ मुंडे राज्याच्या सत्ताकारणात दाखल झाले, तेव्हा याचंच भांडवल करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला होता. १९७१ मध्ये संघाच्या पहिल्या ओटीसी वर्गात जाऊन आल्यानंतर या तरुणाच्या आयुष्याला पहिली कलाटणी मिळाली. राजकीय भाषेत, त्यांच्या जीवनातला हा पहिला 'टर्निंग पॉईंट'... आणि पुढे गोपीनाथ मुंडे संघाच्या पुण्यातील एका शाखेचा मुख्य शिक्षक झाला. संघाच्या कार्यपद्धतीत, मुख्य शिक्षकाचं पद मिळणाऱ्याचे नेतृत्वगुण आणि संघटनकौशल्य सिद्ध व्हावं लागतं. त्यासाठी संघस्थानावर प्रदीर्घपणे मानसिक मशागत करून घ्यावी लागते. गोपीनाथ मुंडे संघात दाखल झाले, प्रशिक्षण वर्गात गेले, आणि मुख्य शिक्षकही झाले. आयुष्यातला हा पहिला टर्नींग पॉईंट त्यांना राजकारणाच्या राष्ट्रीय केंद्रबिंदूपर्यंत घेऊन जाणारा ठरला. त्याच, पहिल्याच वळणानं त्यांना जातीच्या राजकारणाचाही अनुभव देत, बेरजेचं गणित शिकवलं. दोनतीन वर्षांच्या संघकार्य आणि अभाविपच्या संघटनात्मक कामातून प्रमोद महाजनांशी जुळलेलं भावनिक मैत्र त्यांना अलगदपणे राजकारणात घेऊन आलं, आणि गोपीनाथ मुंडे नावाचा तरुण जनसंघाचा नेता झाला. १९७५ मधल्या आणीबाणीच्या कडवट आठवणी आजही अनेक काँग्रेसेतर नेत्यांच्या मनात रुतून राहिल्या आहेत. गोपीनाथ मुंडेंनाही आणीबाणीच्या काळात १६ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. पण मुंडेंच्या मनात आणीबाणीच्या काळातल्या काही मोरपिशी आठवणीही टवटवीत राहिल्या होत्या. कारण, इथेच त्यांच्या खाजगी जीवनातला एक मोठ्ठा टर्निंग पॉइंट आकाराला आला होता. जेलमध्ये असताना, प्रमोद महाजनांच्या घरून येणाऱ्या जेवणाच्या डब्यातून येणारा कागदाचा एक चतकोर तुकडा त्यांचं नवं आयुष्य आखत होता. गोपीनाथ मुंडे आणि प्रज्ञा महाजन यांची जन्मगाठ या कागदाच्या तुकड्यासोबत घट्ट होत गेली, आणि दोघे जीवनसाथी झाले...
ही मोरपिशी आठवण अगदी खाजगी बैठकीत, मोजक्या मित्रांसोबत अलगदपणे उलगडताना, त्यांच्यातला राजकीय, चतुर नेता मनाच्या कप्प्याआड समजूतदारपणे जाऊन बसलेला अनेकांनी अनुभवलाय...
म्हणून, पत्रकारांपासून लांब राहा असं ते म्हणत असले, तरी त्यांनी मात्र पत्रकारांपासूनचं अंतर मर्यादेबाहेर वाढू दिलं नाही. उलट, अनेकदा, गोपीनाथ मुंडे हे मोजक्या पत्रकारांसाठी 'मीडियाचं माध्यम' ठरले आहेत. 
मला त्या काळात मुंडेंच्या या स्नेहाचा खूप फायदा झाला.
ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले, आणि मंत्रालयात त्यांना केवळ भेटण्यासाठी, त्यांच्या गालावरून प्रेमानं हात फिरविण्यासाठी, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उभा महाराष्ट्र मंत्रालयात लोटला. ही अतिशयोक्ती नाही. मुंडेंच्या दालनानं त्याआधी अशी गर्दी क्वचितच अनुभवली असेल. जुना परिचय असल्यामुळे, मीही एका दिवशी त्या गर्दीत त्रयस्थपणे उभा राहिलो. तेव्हा मी मंत्रालय कव्हर करत होतो, पण मुंडेंनी जुन्या ओळखीचंच ते नातं जिवंत ठेवलं होतं. त्या गर्दीच्या गराड्यात त्यांनी मला पाहिलं, आणि ते पुढे आले. स्वतःहून हात पुढे करून माझं अभिनंदन स्वीकारलं... त्या वेळी माझ्याकडे त्यांना देण्यासाठी केवळ अभिनंदनाचे शब्द होते. तरीही मी धाडस केलं, आणि माझ्या खिशाचं, सोनेरी मुलामा असलेलं एक छान पेन मी त्यांच्या हातात दिलं. भेट म्हणून... उपमुख्यमंत्रीपदावरच्या माणसाला मिळणाऱ्या भेटींच्या तुलनेत ही अगदीच किरकोळ वस्तू होती. पण पुढे कितीतरी दिवस त्यांच्या जाकिटाला ते पेन दिसलं, की मला आनंद व्हायचा... नातं जपण्याची खूण जिवंत असल्याचा आनंद... ते नातं त्यांनी पत्रकारितेच्या आड येऊ दिलं नाही. उलट, आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन माझ्याशी त्यांची ओळख करून दिली. ते मला पुढे बातमीदारीसाठी खूपच उपयुक्त ठरले. 
जातीच्या राजकारणाचा पहिला कडवट डोस गोपीनाथ मुंडेंनाही घशाखाली घ्यावा लागला. रेणापूर मतदारसंघातून लढविलेल्या पहिल्या निवडणुकीत, जातीबाहेरच्या मुलीशी प्रेमप्रकरण असल्याचा आरोप प्रचारादरम्यान झाला, आणि त्यांना पराभवाचा पटका सोसावा लागला. हजारभर मतांनी मुंडे पडले. कधीतरी बोलताबोलता त्यांना हे आठवायचं, आणि त्या पराभवाच्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावर उमटायच्या... नंतर मात्र, त्या पराभवाचा मजबूत वचपा काढत महाराष्ट्रातील विक्रमी मताधिक्याचा विजय घेऊन ते विधानसभेत दाखल झाले. बेरजेच्या आणि समर्थ काटशह देण्याच्या राजकारणाची पक्की पायाभरणी झाल्याची खात्री तेव्हा वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजनांना पटली होती.
म्हणूनच, होपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्रात जातीचं वेगळं राजकारण मांडलं. भाजपचा चेहरा तोपर्यंत ब्राह्मणी होता. मुंडेंच्या रूपाने भाजपला नवा चेहरा मिळाला, आणि ओबीसींच्या राजकारणाचा नवा प्रवाह महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाला. आज तो पक्का रुजलाय... ओबीसींच्या उत्कर्षासाठी जे जे करावं लागेल, ते सारं करण्याची कबुली देताना, पक्षाच्या धोरणापेक्षाही अनेकदा त्या मुद्द्याला प्राधान्य देणाऱ्या मुंडेंनी आपली भूमिका त्या वेळी पक्षात रुजविली, आणि नेत्यांच्या गळी उतरविली. आज भाजपचा सर्वसमावेशक चेहरा हे त्या वेळच्या त्यांच्या द्रष्टेपणाचे प्रतिबिंब आहे, असे मला वाटते. जातिनिहाय जनगणनेचा पक्षाच्या धोरणाचा विचार झुगारून त्यांनी धरलेला आग्रह अखेर कशाही स्वरूपात असो, पक्षाला आणि पक्षाच्या मातृसंघटनेलाही स्वीकारावा लागला, हे त्यांच्या बेरजेच्या राजकारणाचे उत्तर आहे.
गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय राजकारणात फारसे समाधानी नाहीत, ते अस्वस्थ आहेत, अशी चर्चा तेव्हा वारंवार होत असे. पण त्यांच्या राजकारणाला पारदर्शकपणा होता, म्हणूनच त्यांची प्रत्येक कृती आणि त्यामागचा अर्थ स्पष्ट होता. त्यामागच्या भावना राजकारणापलीकडच्या होत्या, म्हणूनच, गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाचे ते वेगळेपण पक्षानेही स्वीकारले होते.