Thursday, June 18, 2020

श्रीमंत पत्रकारितेचा अखेरचा अंश!

आवाजी पद्धतीने वाजविल्या जाणाऱ्या ब्रेकिंग न्यूजचे आयुष्य किती टिकते, हे सर्वांनाच माहीत आहे. उलट, त्यामुळे बातमीदारी नाट्यमयझाल्याचा सूर सर्वसामान्य वाचकवर्गात सतत उमटत असतो. एखादी बातमी समोर आली, की सर्वात अगोदर त्यावर वाचकाचे प्रश्नचिन्ह उमटते, अशा दुर्दैवी काळातही, रणदिवे यांच्या चारपाच दशकांहूनही जुन्या बातम्या अजूनही गाजावाजा न करता गाजत राहतात, हे त्यांच्या बातमीदारीच्या सच्चाईचे यश आहे. 
***
एखाद्या कोपऱ्यातलादेखील पालापाचोळाही ढिम्म हलणार नाही अशा बातम्या सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज असे  कानठळ्या बसविणाऱ्या ढणढणाटाच्या पार्श्वभूमीवर सांगण्याचा जमाना तेव्हा जन्मालाही आलेला नव्हता. पेड न्यूज हा शब्ददेखील कुणाच्याच कानावर पडलेला नव्हता, आणि वृत्तवाहिन्यांचे तर भविष्यदेखील कुणी वर्तविलेले नव्हते.फूटपाथवरच्या दूधवाल्याकडून दुधाच्या बाटल्या घेऊन येताना सोबत आणलेले वर्तमानपत्र सकाळच्या चहासोबत वाचताना काही सुखाच्या, थोड्या दुःखाच्या आणि तरीही, सगळ्याच आपल्या वाटतील अशा बातम्या वाचण्याची सवय झाल्यामुळे वर्तमानपत्र हा खराखुरा मित्र वाटावा असा तो काळ होता. त्या काळात, दादरसारख्या भागाची भरभराट नुकतीच सुरू झाली होती. गिरगाव, गिरणगावासारख्या भागात दीड खोलीतल्या संसारात बहुसंख्य मराठी वाचक सामावलेला असल्याने वर्तमानपत्राचे पहिले पान झगमगाटी जाहिरातीने व्यापलेले नसायचे, तरीही तो काळ म्हणजे मराठी वर्तमानपत्रसृष्टीच्या श्रीमंतीचा खरा सुवर्णकाळ होता. ज्या काही मोजक्या पत्रकारांनी मराठी पत्रकारितेकडे ही श्रीमंती खेचून आणली होती, त्यामध्ये आघाडीचे नाव होते, दिनू रणदिवे यांचेकोणताही अभिनिवेश न गाजविता, कोणताही ढणढणाट, जाहिरात न करता, पत्रकारितेच्या साऱ्या सच्चाईला जागून संयत आणि संकेतांच्या चौकटीतील बातमीने साऱ्या यंत्रणांना हलवून सोडण्याचे आणि वाचकांना विचार करायला लावण्याचे सामर्थ्य दिनू रणदिवे यांच्या बातमीने मराठी वर्तमानपत्रांच्या दुनियेला बहाल केले, म्हणून ही पत्रकारिता श्रीमंत झाली. 
काळ बदलला, आणि श्रीमंतीचा हा प्रवाह पत्रकारितेकडून पत्रकारांकडे वाहू लागला. आजकाल समाजमाध्यमांमुळे माध्यमविश्वात आलेल्या पारदर्शकपणामुळे, हा बदल सहजपणे समाजास लख्ख दिसू लागलापत्रकारितेला श्रीमंती बहाल करणाऱ्या दिनू रणदिवे यांच्यासारख्या पत्रकाराचे जगणे त्यामध्ये काहीसे झाकोळूनच गेले. पत्रकारितेविषयी जकाल सामान्य माणसाच्या मनात काही शंका रूढ झालेल्या आहेत. अशा काळात, सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी सक्रीय पत्रकारितेतील निवृत्तनंतरही पत्रकाराचा पिंड जिवंत ठेवून उतरत्या वयातही त्यावर सुरकुतीही पडणार नाही याची काळजी घेणाऱ्या दिनू रणदिवेच्या दीड खोलीच्या घराने मात्र, या झगमगाटातदेखील त्यांच्या काळातील पत्रकारितेची श्रीमंती जपली, आणि पत्रकाराच्या श्रीमंतीचा स्पर्शदेखील आपल्या घराला होणार नाही, याची व्रतस्थपणे काटेकोर काळजीदेखील घेतली.
आवाजी पद्धतीने वाजविल्या जाणाऱ्या ब्रेकिंग न्यूजचे आयुष्य किती टिकते, हे सर्वांनाच माहीत आहे. उलट, त्यामुळे बातमीदारी नाट्यमयझाल्याचा सूर सर्वसामान्य वाचकवर्गात सतत उमटत असतो. एखादी बातमी समोर आली, की सर्वात अगोदर त्यावर वाचकाचे प्रश्नचिन्ह उमटते, अशा दुर्दैवी काळातही, रणदिवे यांच्या चारपाच दशकांहूनही जुन्या बातम्या अजूनही गाजावाजा न करता गाजत राहतात, हे त्यांच्या बातमीदारीच्या सच्चाईचे यश आहे. कारण, त्यांची बातमीदारी केवळ नोकरी नव्हती. पत्रकारिता हा पेशा नव्हे, तर बांधीलकी आहे, या विचाराशी ठाम राहून, सामान्य माणसाचे प्रश्न हा बातमीदारीचा कणा मानून त्याच्याशी इमान राखण्याची पत्रकारिता रणदिवे यांनी केली. त्यांनी पत्रकारिता हे चळवळीचे माध्यम मानले, आणि  पत्रकारितेलाच आंदोलनाचे रूप दिले. त्यांच्या पत्रकारितेतून शोषितांचा आवाज उमटत राहिला, त्यांच्या पत्रकारितेच्या पुण्याईतूनच वर्तमानपत्रालाही वाचक मित्र मानू लागले. 
असे म्हणतात, की कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याची अनुभूती आणि संस्कारांचे प्रतिबिंब त्याच्या केवळ व्यक्तिमत्वावरच नव्हे, तर त्याच्या व्यावसायिक जीवनावरही उमटलेले असते. दिनू रणदिवे यांनी आपल्या बालपणापासून कळत्या वयापर्यंतच्या आयुष्यात ज्या खंबीरपणे परिस्थितीशी सामना करत व्यावसायिक शिखर गाठले, त्या परिस्थितीची सावली हटवून समाजाला सुखाचे दिवस दाखविण्यासाठी त्यांनी लेखणी चालविली. रात्रभर रस्त्यावर कुडकुडत झोपणाऱ्या गरीबांच्या हालअपेष्टांचा मागोवा घेण्यासाठी ते पुन्हा स्वतः रात्ररात्र जागले, आणि आपल्या लेखणीच्या ताकदीवर अनेक उपेक्षितांना मायेची ऊब मिळवूनही दिली. गोवा मुक्तीसंग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभागामुळे भोगलेल्या तुरुंगवासामुळे पत्रकारितेस आवश्यक असलेल्या कार्यकर्तेपणाची जोड त्यांना मिळाली, म्हणून त्यांची लेखणी अधिक तेजाने तळपून समाजाच्या समस्यांच्या चौफेर माहितीमुळे समृद्ध झाली. लोकमित्र, धनुर्धारीमधील पत्रकारिमुळे धारदार झालेली लेखणी हे शस्त्र घेऊन ते महाराष्ट्र टाईम्स या दैनिकात दाखल झाले, आणि चळवळी व आंदोलनांमुळे समाजाला माहीत असलेले दिनू रणदिवे हे नाव घराघरात पोहोचले. महाराष्ट्र टाईम्समधील सलग २३ वर्षांच्या जाज्ज्वल्य पत्रकारितेतून त्यांनी मराठी पत्रसृष्टीला नवा आयाम मिळवून दिला, आणि शोध पत्रकारितेचा आदर्श पत्रकारितेच्या नव्या पिढीसमोर ठेवला. 
पत्रकाराने चळवळ्या असावे की नाही, यावर त्याआधी आणि पुढेही काही काळ पत्रकारितेच्या विश्वात मतांतरे सुरू होती. दिनू रणदिवे यांनी आपल्या कौशल्याने त्याला कधीच उत्तर देऊन ठेवले होते. चळवळी, आंदोलने हे समाजाच्या समस्यांची जाणीव करून देणारे माध्यम असल्याने, समाजाशी नाळ जोडून त्यांच्या समस्यांसाठी बातमीदारी करणाऱ्या प्रत्येक पत्रकाराने कोणत्याही चळवळीशी नाते जोडलेच पाहिजे, हे त्यांनी दाखवून दिले. 
आपण काय कमावलं याचा विचार त्यांनी केला नाही, म्हणून दादरच्या दीड खोलीच्या घरातही पत्रकारिता ऐश्वर्यसंपन्न झाली. एका खिडकीतून झिरपणाऱ्या मंद उजेडातही झगमगणाऱ्या तिच्या ऐश्वर्याची सर, अनेक ऐश्वर्यसंपन्न घरांना कधीच लाभली नाही. 
आजही पत्रकारितेला जे काही वलय शिल्लक आहे, त्याचे श्रेय दिनू रणदिवे यांच्यासारख्या निष्ठावंतांनी कमावलेल्या पुण्याईला द्यावेच लागेल.

No comments:

Post a Comment