Tuesday, June 2, 2020

हसतखेळत ‘सामना’...


मानसिकदृष्ट्या हतबल होऊ लागलेल्या समाजात अशा परिस्थितीमुळे अधिकच नैराश्य येऊ शकते, आणि नैराश्याने ग्रासलेल्या समाजास दिलाशाचे दोन शब्ददेखील मोठा आधार ठरू शकतात. उद्धव ठाकरे यांनी नेमक्या याच मानसशास्त्राचा अभ्यास केला आहे. 
***
संकट गंभीर आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले असले, तरी जनतेशी संवाद साधताना या गंभीर संकटातून हलकाफुलका दिलासा देण्याचा प्रयत्न ते करत असतात. हलके विनोद, शाब्दिक कोट्या, यमके आणि चिमटे-कोपरखळ्या काढत ते बोलू लागले, की त्यांचे भाषण ऐकणाऱ्यास त्या वेळेपुरता का होईना, संकटाच्या गांभीर्याचा विसर पडतो. हे आता नेहमीचंच झालंय, अशी सुरुवात करून ते बोलू लागतात, आणि मग कोट्यांवर कोट्या करत त्यांची सौम्य वाणी संवाद साधू लागते. आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्याने अशा अनौपचारिक रीतीने संवाद साधलेला नाही. सरकारच्या शिष्टाचार विभागाने लिहून दिलेली भाषणे वाचून दाखविण्याचा रिवाज अगदी पट्टीचे वक्ते समजल्या जाणाऱ्या कोणाही मुख्यमंत्र्यास चुकलेला नाही. उद्धव ठाकरे यांचे वैशिष्ट्य हे, की त्यांनी या सरकारी रिवाजास फाटा दिला, आणि आपली स्वतःची संवादशैली विकसित केली. म्हणूनच, त्यांचे भाषण पार पडल्यानंतर पुढचे भाषण ऐकावयास मिळेपर्यंतच्या आठवडाभरात, जुन्या भाषणातील किस्से, गमतीजमती, कोट्या आणि चिमट्यांचा विरंगुळा जनतेस मिळतो, आणि गंभीर संकटातही हसतखेळत कसे रहावे याचे अप्रत्यक्ष प्रशिक्षणही होते.

संकटाच्या भयाने धास्तावलेल्या समाजास भयापासून दूर राखण्याचा हा एक वेगळा मानसशास्त्रीय प्रयोग असला पाहिजे. करोनाचे संकट गंभीर आहे. दिवसागणिक नव्या हजारो रुग्णांची भर पडत आहे. मृत्युदराचा आलेख अजूनही खाली आलेला नाही. देशात सर्वात मोठा हाहाकार एकट्या महाराष्ट्रात माजला आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना याची पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच ते आपल्या सुरुवातीच्या जनसंवादातच म्हणाले होते, संकट गंभीर आहे, पण सरकार खंबीर आहे’! त्यांच्या या ग्वाहीस आता दोन महिने उलटून गेले. संकटाचे गांभीर्य त्यानंतर अधिकाधिक गहिरे होत चालले आहे. अशा परिस्थितीत समाजाचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते. संकटभयाने ग्रासलेल्या समाजाची मानसिकता विकल होऊ शकते. असे जेव्हा घडते, तेव्हा समाजास दिलासा देणाऱ्या तातडीच्या उपाययोजना आखणे आणि त्यांची दृश्य अंमलबजावणी करणे हे मोठे आव्हान असते. महाराष्ट्रात यासाठी मोठ्या मर्यादा आहेत, हे लपून राहिलेले नाही. संकटाचा सामना करण्यास आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे, किंबहुना, जवळपास कोलमडलीच आहे. प्रशिक्षित डॉक्टर्स, नर्सेस, इस्पितळे, खाटा, औषधे, उपचाराची व स्वसंरक्षणाची साधने, साऱ्यांचाच मोठा तुटवडा भासू लागला आहे, आणि त्यावर तातडीने इलाज शोधणे सरकारच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आहे. मानसिकदृष्ट्या हतबल होऊ लागलेल्या समाजात अशा परिस्थितीमुळे अधिकच नैराश्य येऊ शकते, आणि नैराश्याने ग्रासलेल्या समाजास दिलाशाचे दोन शब्ददेखील मोठा आधार ठरू शकतात. उद्धव ठाकरे यांनी नेमक्या याच मानसशास्त्राचा अभ्यास केला आहे. संकटात खचलेल्या मनावर हलक्याफुलक्या विनोदाची फुंकर मारून त्यांनी आजवरच्या अनेक जनसंवादातून संकटाच्या गांभीर्याचे सावट पुसण्याचा प्रयत्न केला आहे. लॉकडाऊन हा शब्द कचऱ्याच्या पेटीत फेकण्याच्या त्यांच्या निर्धाराने करोनाचा विषाणू भयभीत होऊन काढता पाय घेणार नाही, हे सर्वसामान्य आणि अशिक्षित माणूसही जाणतो. मुख्यमंत्र्यांनाही हे माहीत आहे. तरीही त्यांनी जाणीवपूर्वक या वाक्याचा वापर केला. कारण, या एका वाक्यातून जनतेच्या मनात आत्मविश्वासाची, नव्या लढाईची नवी उमेद जाही होईल, असा त्यांचा विश्वास असावा.
किनारपट्टीवर येऊ घातलेल्या निसर्ग वादळास थोपविण्याची ताकद फक्त निसर्गातील चमत्कारामध्येच असून कोणतीही, अगदी सरकारमधील किंवा कोणत्याही सर्वोच्च स्थानावरील व्यक्तीदेखील हे संकट थोपविण्यास समर्थ नसते, हेही त्यांना माहीत आहे. तरीही, हे वादळ आपल्यापर्यंत येणार नाही, असा आत्मविश्वासपूर्ण दावा त्यांनी केला. आपण मुख्यमंत्री आहोत, परमेश्वर नाही, याची जाणीव त्यांना नाही, असा याचा अर्थ नाही. म्हणूनच, या संकटास तोंड देण्यासाठी सर्वांनी सज्ज राहिले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. असे समजुतीचे शब्द कानावर पडले, की भयाची भावना कमी होते. संकटाचे गांभीर्य कमी होत नसले, तरी त्याचे भय कमी होणे ही अशा परिस्थितीत मोठी बाब असते. ठाकरे यांनी या मानसशास्त्राचा नेमका वापर केलेला त्यांच्या भाषणात दिसतो.
करोना हे संकट थोपविण्याचा उपाय अजून सापडलेला नाही. त्यामुळे, पुढचे आयुष्य करोनासोबत जगायचे आहे, हे एव्हाना जनतेस माहीत झाले आहे. मग, जर हा आजार आपली पाठ सोडणार नसेल, तर त्याच्या अस्तित्वाच्या खुणांना घरात घेण्यास काय हरकत आहे? मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोठ्या खुबीने आणि हळुवारपणे या वास्तवाची जाणीव करून दिलेली दिसते. आता जन्माला आलेले मूल बोलू लागेल, तेव्हा आई हा पहिला शब्द न उच्चारता, लॉकडाऊन असे म्हणेल... ही त्यांची कालच्या भाषणातील सर्वोच्च मानसशास्त्रीय कोटी मानली पाहिजे. करोनाचे अस्तित्व टाळणे शक्य नाही, त्याच्या खाणाखुणा पुसणे शक्य नाही, हेच त्यांनी केवढ्या नेमक्या शब्दांत समाजास समजावून सांगितले आहे...
तसेही, करोनाच्या जाणीवा आजकाल समाजात पसरू लागल्याच आहेत. लहान बाळाच्या लॉकडाऊन या पहिल्या शब्दोच्चारावरून ठाकरे यांनी केलेल्या विनोदाच्या आधी, देशात जन्माला आलेल्या नवजातांना करोना, कोविड, अशी नावेदेखील मिळाली आहेत. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे गेल्या २७ मार्चला जन्माला आलेल्या एका जुळ्याचे करोना आणि कोविड असे नामकरण करून त्यांच्या मातापित्यांनी हा आजार संस्मरणीय केलाच आहे. लॉकडाऊनच्या काळात असंख्य अडचणींचा सामना करत अखेर या महिलेने सरकारी इस्पितळात या जुळ्याला जन्म दिला. त्या अडचणींचा विसर पडू नये म्हणून त्या मुलांची करोना आणि कोविड अशी नावे ठेवण्याचा त्या मातापित्यांचा निर्णय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मानसशास्त्रीय जाणीवेतून केलेला विनोद यांतूनच, संकटाचे गांभीर्य कमी होण्यास मदत होते. शहरात सारे काही ठप्प झाले आहे, रस्त्यावर एकही वाहन नाही, इस्पितळांत करोनाग्रस्तांची गर्दी झाली आहे. डॉक्टर, नर्सेस आणि कोणत्याही आरोग्य सेवकास बाळंतपणासारख्या अडचणीकडे लक्ष देण्यास फुरसत नाही, अशा अवस्थेत या महिलेस प्रसववेदना सुरू झाल्या, तेव्हा तिच्या सुरक्षित बाळंतपणासाठी तिच्या कुटुंबास मानसिक संतुलन राखण्यासाठी केवढी कठोर परीक्षा द्यावी लागली असेल, याची कल्पनादेखील करणे कठीण आहे. तरीही, सारे काही सुरळीत झाले, म्हणून त्या संघर्षाच्या खुणा बाळांच्या नावाने जिवंत ठेवण्याचा निर्णय मातातपित्यांनी घेतला... मनिलामध्ये याच काळात जन्माला आलेल्या बाळांचेही करोना आणि कोविड असे बारसे करण्यात आले आहे. राजस्थानातील एका दाम्पत्यास याच संकटाच्या काळात झालेल्या मुलाचे नाव लॉकडाऊन असे ठेवलेच आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर विनोद, टीका होतही असेल. कारण त्यांच्या शाब्दिक कोट्या आणि हलक्याफुलक्या विनोदाचा, वाक्यांच्या पुनरुच्चारांचा आणि आत्मविश्वास व्यक्त करण्याच्या त्यांच्या पद्धतीचा मानसशास्त्रीय कंगोरा कोणास उमगलेला नाही. याच शब्दांनी करोनाचा सामना करता येईल, याचा त्यांना पक्का विश्वास असला पाहिजे, नव्हे, असेलच... किंबहुना, भयाने मरगळलेल्या समाजास असे शब्द संकटाचा विसर पडण्यासाठी मदत करतील, अशी त्यांना खात्री असेल...

...म्हणून, शिष्टाचार बाजूला ठेवून होणाऱ्या संवादाचा अर्थ जाणून घेण्याची सवय समाजाने लावून घेतली पाहिजे.

Monday, June 1, 2020

भाषेचे प्रदूषण...

असे म्हणतात, की ब्रिटीश संस्कृतीचा विकास त्या देशातील माणसांच्या गप्पिष्ट स्वभावामुळे होत गेला. आता समाजमाध्यमांचे पीक फोफावल्यापासून 'मौखिक गप्पा' हा प्रकार फारच दुबळा होऊ लागला असून, केवळ कळपट्ट्यावरील बटने दाबून आभासी गप्पांचा पड रंगविण्याची सवय फोफावत चालली आहे.
.....
'मराठी वृत्तवाहिन्यांचे मराठी' हा विनोदाचा विषय झाल्यापासून, 'माध्यमांतील मराठीचे भवितव्य' या मुद्द्यावर सर्वत्र गंभीर चर्चा सुरू झाली आहे. समाजमाध्यमांचा मंच ही या चर्चेसाठी योग्य अशी जागा असल्याने, वृत्तवाहिन्यांच्या मराठीचे वाभाडे काढणारा आणि या वाहिन्यांच्या मराठीवर ताशेरे ओढणारा वर्ग हा सामान्य मराठी माणूस आहे, ही चांगली बाब आहे. मराठी वर्तमानपत्रे किंवा मराठी वाहिन्यांवरील मराठी भाषेवर नेमका कोणत्या भाषेचा प्रभाव आहे, हेदेखील सांगता येणार नाही, अशा गूढ रीतीने मराठीची अवस्था केविलवाणी होत चालली आहे. बातम्यांना भडकपणा आणण्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या या अगम्य आणि भ्रष्ट मराठीचा गाडा मूळ मराठीच्या मार्गावर येण्याची चिन्हे नाहीत. या दिव्य मराठीचाच कित्ता सध्या वर्तमानपत्रांच्या ई-आवृत्त्या गिरविताना दिसतात. बातमीला भडक रंग देण्यासाठी मराठीची मोडतोड करणे ही जणू गरज बनली असावी. विशेष म्हणजे, या बिघडत्या मराठीमुळे, भविष्यातील मराठी कोणत्या भाषेच्या रूपाने प्रगत होणार आहे, हे सध्या तरी अनाकलनीय गूढ आहे.
वर्तमानपत्रे हे सामान्य मराठी माणसाला मराठी भाषेची नेमकी जाण देणारे माध्यम असल्याने, मराठी वर्तमानपत्रांनी मराठीचा वापर जबाबदारीने करावा अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. सध्या वर्तमानपत्रांच्या दैनंदिन कार्यपद्धतीचा ढाचा पुरता बदलून गेला असून भाषा आणि आशय यांचा जोरदार संघर्ष मराठी वर्तमानपत्रांत दिसू लागला आहे. कोणताही मजकूर त्याचा आशय समजावण्याएवढा स्पष्ट असण्यापुरते भाषेचे महत्व उरले असून भाषेच्या शुद्धतेचे निकष फार महत्वाचे नाहीत, असे चित्र दिसू लागले आहे. वर्तमानपत्रांच्या ई-आवृत्त्यांमुळे, आता ती मराठी जगभरातील मराठी माणसांकडून वाचली जाऊ लागली असून, मराठी भाषेसोबतचे नाते आकलनापुरतेच उरलेल्या परदेशस्थ मराठी वाचकांना भाषेच्या शुद्धाशुद्धतेशी फारसे देणेघेणे नसावे, उलट, वाचकास बातमी किंवा कन्टेन्ट देणे हेच वर्तमानपत्राच्या भाषेचे मर्यादित काम आहे, असा समज रुजू लागला असावा. प्रत्येक नव्या मराठी पिढीच्या भाषेत जागतिकीकरणाचे प्रतिबिंब उमटत असल्याने, मराठीच्या वापरात अन्य भाषांमधील शब्द ही 'आकलनाची गरज' असल्याच्या समजुतीतून वर्तमानपत्रांनीही आपल्या मराठीला परभाषांतील शब्दांचे साज चढविण्यास जाणीवपूर्वक सुरुवात केल्याने, वर्तमानपत्रांतील मराठी वाक्यरचना केवळ काळ आणि क्रियापदांपुरतीच मराठीशी नाते जोडणारी ठरू लागली. 'पांढऱ्यावर काळे करणे' म्हणजे, मजकूर भरणे महत्वाचे झाले, तेव्हापासून भाषेची शुद्धता हा प्रकार कालबाह्य ठरू लागला असावा. वर्तमानपत्रांच्या निर्मिती प्रक्रियेत एकेकाळी महत्वाचा असलेल्या मुद्रितशोधकास नावापुरतेच अस्तित्व उरले आहे. त्यामुळे, ज्याचे त्याचे मराठी लेऊन बातमी किंवा वृत्तपत्रीय मजकूर तयार होत असल्याने, वर्तमानपत्रेदेखील या बाबतीत उदासीन दिसू लागली आहेत. वृत्तवाहिन्यांनी मराठीची कत्तल सुरू केल्यानंतर वर्तमानपत्रे तरी मराठीचा डोलारा सावरण्यासाठी सज्ज होतील, हा समज आता धूसर होऊ लागला आहे.
'गप्पा मारणे' ही एक संस्कृती असते. गप्पांच्या माध्यमांतून भाषेची देवाणघेवाण होत असते. असे म्हणतात, की ब्रिटीश संस्कृतीचा विकास त्या देशातील माणसांच्या गप्पिष्ट स्वभावामुळे होत गेला. आता समाजमाध्यमांचे पीक फोफावल्यापासून 'मौखिक गप्पा' हा प्रकार फारच दुबळा होऊ लागला असून, केवळ कळपट्ट्यावरील बटने दाबून आभासी गप्पांचा पड रंगविण्याची सवय फोफावत चालली आहे. त्यातही, विशिष्ट भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरजही अलीकडे कमी होऊ लागली असून, सांकेतिक चित्रलिपी (स्माईली) हा प्रकार समाजमाध्यमांवर रूढ होऊ लागला आहे. अगोदरच मौखिक गप्पांचा वेळ समाजमाध्यमांवरील आभासी गप्पांनी खाऊन टाकलेला असताना, त्यातही शब्दांची जागा सांकेतिक खुणांनी घेतली, तर भाषेचे भवितव्य काय असेल, याची कल्पना करणे काहीसे अवघडच होणार आहे.
... आज सकाळी एका बुजुर्ग पत्रकार मित्राशी बोलताना, वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचे मराठी या विषयावर गाडी वळली. अनेकदा एखाद्या वर्तमानपत्रात, एकाच अंकाच एकच शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेला आढळतो. त्यामुळे, त्यापैकी योग्य शब्द कोणता, हे ठरविणे वाचकालाही अवघड होऊन जाते. असे प्रकार टाळण्यासाठी एकेकाळी वर्तमानपत्रांमध्ये स्टाईल शीट नावाचा प्रकार असे. म्हणजे, कोणताही एक शब्द त्या वर्तमानपत्रात त्या ठरलेल्या पद्धतीनेच वापरला जावा यावर कटाक्ष असे. त्यामुळे तो शब्द रूढ करणे सोपे होत असे, आणि मराठी वाचकासही त्या शब्दाची सवय होत असे. आजकाल स्टाईल शीट हा प्रकार कालबाह्य झाला आहे. मराठी पत्रकारांच्या संघटनांनी मराठी शब्दांचा खजिना सूचिबद्ध करावा यासाठी हा मित्र प्रयत्नशील आहे. मराठी भाषेत सर्रास वापरल्या जाणाऱ्या परभाषी शब्दांकरिता मराठीमध्ये चपखल असा एखादा शब्द शोधावा, आणि तो सर्व मराठी माध्यमांनी वापरून रूढ करावा अशी यामागची कल्पना... उदाहरणार्थ, सध्या करोनाकाळात, तोंडावर मास्क वापरणे ही अपरिहार्य गरज आहे, आणि ती कदाचित भविष्यातील जीवनशैलीच होऊन राहणार आहे. त्यामुळे, कालांतराने मास्क हा शब्द मराठीत एवढा रूढ होणार आहे, की त्यासाठी मराठी प्रतिशब्द असेल की नाही अशीच शंका येत राहील. त्यामुळे, मास्कचा वापर सुरू होत असतानाच त्याला नेमका मराठी प्रतिशब्द शोधून सर्व मराठी माध्यमांनी तोच शब्द सामूहिकपणे रूढ केल्यास भविष्यातील मराठीची जपणूक होईल. मास्क हा एक उदाहरणार्थ शब्द आहे. असे असंख्य शब्द मराठीमध्ये येऊन दाखल झालेले आहेत. त्यामुळे मराठी भ्रष्ट होते की समृद्ध होते, हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे. मराठीने स्वतःचे शब्द न गमावता अन्य शब्दांना आपल्यात सामावून घेतले, तर मराठी समृद्ध होईल, अन्यथा मराठीचे मराठीपण हरवेल, असे अनेकांना वाटते. हे खरेच आहे. मात्र, मराठी वर्तमानपत्रे, मराठी पत्रकारांच्या संघटना, मराठी वृत्तवाहिन्या आणि सार्वत्रिकपणे मराठीचा वापर करणाऱ्या कोणत्याच यंत्रणेस मराठीच्या भविष्याची चिंता वाटत नसावी असेच वातावरण असल्याने, मराठीला कालांतराने परभाषांच्या पांगुळगाड्यावरच वाटचाल करावी लागेल, असे सध्याचे चित्र आहे.
याचे एक बोलके उदाहरण काही काळापूर्वी मला जाणवले. त्यामुळेच आज हा मुद्दा अधोरेखित करावा असे वाटले. आकाशवाणीच्या एका मराठी वाहिनावर एकदा एका वक्त्याचे भाषण कानावर पडले. विषय ध्वनिप्रदूषणासंदर्भात होता, आणि भाषण नवमराठीतून होते.
त्याचे कानावर पडलेले शब्द मी टिरून ठेवले, आणि नंतर एक सलगपणे एक परिच्छेद तयार झाला...
तो असा होता...
'बॉडी आणि माईंड यांच्यावर नॉईज पोल्यूशनचा डायरेक्ट अँडव्हर्स इफेक्ट होत असतो. म्हणून, लहान मुलांच्या परिसरातील नॉईज पोल्यूशनचे नॉर्म्स भयंकर स्ट्रिक्ट असायला पाहिजेत. याचा विचार करूनच, सायन्स रिलेटेड ज्या गाईडलाईन्स आहेत, त्या एक्टिव्हिस्ट्सनी खूप रिसर्च करून चॉकआऊट केल्या आहेत. रेसिडेन्शियल एरियात किता नॉईज एक्स्पोजर असायला पाहिजे, हे डिसाईड केले पाहिजे. थोडक्यात, नॉईज पोल्यूशनला लाईटली घेऊन चालणार नाही. कारण ते एक हेल्थ हझार्ड आहे. इर्रिव्हर्सिबल हियरिंग लॉस झाला नाही, तरी त्याव्यतिरिक्त अन्य अनेक बॉड इफेक्टस होऊ शकतात, हे सायन्सने प्रूव्ह केलेले आहे...'
-तर, या भाषणाने एका महत्वाची समस्या गांभीर्याने अधोरेखित केली, यात शंका नाही. प्रदूषणाचा एक अत्यंत गंभीर मुद्दा अतिशय प्रभावीपणे मांडला गेला, यातही शंका नाही. पण नॉईज पोल्यूशनचा मुद्दा मांडताना, भाषेचे प्रदूषण झाले, त्याचे काय
याचे 'इफेक्टस' भविष्यात भोगावेच लागतील...

Saturday, May 16, 2020

कुठे ठेवायची एवढी संपत्ती?...

असं म्हणतात, की मनुष्यबळ ही संपत्ती आहे. खरं आहे ते. पण केवळ साठत जाणाऱ्या संपत्तीतून काही परतावा मिळायला हवा. त्यासाठी संपत्तीच्या गुंतवणुकीचे नियोजन करायला हवे. भारतासारख्या मनुष्यबळ संपन्न देशाचे चित्र काय आहे? संपत्ती साठत चालली आहे, तसतसे तिचे ओझे वाढत आहे. काही दशकांत असे होईल, की माणसाला जेमतेम स्वत:पुरती जागा (स्पेस) शोधण्यासाठी धडपडावं लागेल. कारण लोकसंख्या वाढते आहे, आणि तिला सामावून घेणारा भूभाग मात्र तितकाच राहणार आहे.
अशा स्थितीत, मनुष्यबळ संपत्तीचे नियोजन ही समस्या उभी राहणार आहे.
काय आहे या संपत्तीचे वर्तमानातील वास्तव?
***
कोणताही सिद्धान्त सिद्ध होण्यासाठी एक अट असते. ‘इतर परिस्थिती सामान्य असेल तर’... ही ती अट. म्हणजे, सारे काही सुरळीत, जगरहाटीनुसार सुरू असेल, तरच कोणत्याही शास्त्राचे सिद्धान्त खरे ठरतात. कारण असे सिद्धान्त हे पूर्वानुभवाच्या आणि वर्तमानातील सुरळीत स्थितीच्या आधारावरच मांडले जात असतात. म्हणजे, अघटित किंवा अनपेक्षित परिस्थितीत प्रस्थापित सिद्धान्त सार्थ ठरत नाहीत.
म्हणूनच, जागतिक लोकसंख्यावाढीच्या आजवरच्या गणिती सिद्धान्तांच्या आधारावर येत्या काही दशकांत मांडले गेलेले भविष्यातील लोकसंख्येचे आकडे किती खरे ठरतील, हा मुद्दा महत्वाचा आहे. जागतिक लोकसंख्यावाढीचा गेल्या दोन हजार वर्षांचा किंवा त्याआधीचा इतिहास, गेल्या काही दशकांमध्ये त्यामध्ये होणारे चढउतार आणि त्यांच्या आधारावर वर्तविण्यात आलेली जगाच्या लोकसंख्येची आगामी भाकिते लक्षात घेतली, तर आज ७७८ कोटींच्या घरात असलेल्या जगाच्या लोकसंख्येने येत्या तीस वर्षांत, २०५० पर्यंत, एक हजार कोटींचा आकडा पार केलेला असेल. जगाच्या लोकसंख्येपैकी तब्बल १७.७ टक्के लोकसंख्या असलेला भारत हा चीनपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला देश आहे. आजवरच्या भारताचा लोकसंख्यावाढीच्या संख्याशास्त्रानुसार, येत्या तीन दशकांत, लोकसंख्यावाढीचा आजवरचा वेग मंदावणार असला तरी, सन २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या १६४ कोटींवर पोहोचलेली असेल, आणि भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश असेल. आज देशातील दर चौरस किलोमीटर क्षेत्रात ४६४ लोकसंख्या राहते. येत्या तीस वर्षांत लोकसंख्यावाढीमुळे ही दाटी अधिकच गडद होणार असून, २०५० मध्ये लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरमागे ५५१ इतकी असेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
जागतिक पातळीवरील विविध क्षेत्रांचा संख्याशास्त्रीय अभ्यास करणाऱ्या संशोधकांच्या वर्ल्डओमीटर नावाच्या अमेरिकेतील एका आंतरराष्ट्रीय समूहाकडून लोकसंख्येचा जवळपास प्रत्येक क्षणाचा तपशील गोळा केला जातो. या समूहाच्या नोंदीनुसार, ख्रिस्तपूर्व आठ हजार साली जेमतेम ५० लाख लोकसंख्या असलेल्या मानवजातीस शेतीचे तंत्र अवगत होत गेले आणि लोकसंख्यावाढीचा वेग वाढत गेला. पहिल्या इसवी सनात २० कोटींपर्यंत लोकसंख्या असलेल्या जगातील मानवजातीच्या प्रगतीचा वेग आणि लोकसंख्यावाढीचा वेग जवळपास सारखाच राहिला. सन १८०० मध्ये १०० कोटींचा टप्पा गाठला गेला, आणि पुढे १९३० पर्यंतच्या जेमतेन १३० वर्षांत लोकसंख्येने दोनशे कोटींची मजल मारली. पुढे केवळ ३० वर्षांतच जगाच्या लोकसंख्येने दुपटीचा टप्पा गाठला, आणि नंतर दुपटीकडे झेपावण्याचा कालावधीही कमी होत गेला. १९८७ पर्यंत लोकसंख्येने ५०० कोटींची मजल मारली होती. आता मात्र हा वेग पुन्हा एकदा मंदावत चालला असून जगाच्या आजच्या लोकसंख्येने दुपटीचा, म्हणजे १५५० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी पुढील २०० वर्षांची वाटचाल करावी लागेल, असा या अभ्यासगटाचा अंदाज आहे.
जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत पहिल्या क्रमांकाचा देश असलेल्या चीनची आजची लोकसंख्या १४३.८६ कोटी इतकी आहे. मात्र, लोकसंख्यावाढीचा वेग उणे करण्यावर चीनचा भर असल्याने, २०५० पर्यंत तेथील लोकसंख्या आजच्यापेक्षा कमी, म्हणजे १४० कोटींवर स्थिरावलेली असेल असा वर्ल्डओमीटर गटाचा अंदाज आहे. भारत आणि चीन या पहिल्या रांगेतील दोन देशांची तुलना केली, तर भारताचे भविष्य काहीसे भयावह वाटावे असे असेल. आज दर चौरस किलोमीटरमध्ये ४६४ एवढी लोकसंख्येची घनता असलेल्या भारतात जेव्हा ही गर्दी आणखी वाढेल, तेव्हा चीनकडील घनता मात्र, दर चौरस किलोमीटरमागे १५३ वरून १४९ पर्यंत कमी झालेली असेल.
परिस्थिती सामान्य राहिली, तर भविष्यातील भारताचे हे गर्दीचे चित्र आनंददायी असेल, की भयप्रद असेल याचा विचार करण्यासाठी या अभ्यास गटाचे हे संशोधन नक्कीच उपयोगी आहे.