Sunday, September 20, 2020

एका शुद्ध 'श्वासा'साठी...

 


एक जुना प्रसंग आठवला. हॉस्पिटलमध्ये एका मित्राची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. कसल्याशा ऑपरेशननंतर त्याची तब्येत सुधारत होती. आम्ही इकडच्यातिकडच्या गप्पा मारत होतो. मित्र खुशीत होता. आता दोनचार दिवसांतच डिस्चार्ज मिळाला की कोकणातल्या गावाकडे जाऊन महिनाभर मस्त आराम करायचा, तब्येत सुधारली की पुन्हा मुंबईत येऊन कामाला लागायचं, असं काहीकाही प्लॅन केलेलं मला सांगू लागला, आणि आम्ही दोघंही त्या गप्पांचा धागा पकडून कोकणातल्या गावात पोहोचलो. जुन्या आठवणी, जंगलातली भटकंती, मस्त हवापाणी, भेसळमुक्त गावठी अन्नावर मारलेला भरपेट ताव आणि भरल्या पोटी मारलेली लांबवरची रपेट, सारं काही आठवणीतून जिवंत झालं, आणि आम्ही त्या क्षणापुरतं मुंबईतलं आमचं अस्तित्व विसरलो.
अशाच गप्पा रंगलेल्या असताना, अचानक रूममध्ये चारपाच जणांचा घोळका घुसला, आणि अगोदरच फुललेलं वातावरण बहरलं. गावाकडून त्याला भेटण्यासाठी मित्र आले होते. मग त्याच गप्पांचा ओघ आणखी प्रवाही झाला. जुन्या आठवणींना नव्या घडामोडींची जोड मिळाली. गावाकडची लफडी, कुलंगडी, कोण गेला, कोण आला, ती सध्या काय करते, तो हल्ली कुठे असतो... वगैरे सारं काही उलगडत गेलं, आणि हॉस्पिटलमधली ती खोली अक्षरशः टाईमपासचा अड्डा झाली...
अशाच गप्पा रंगलेल्या असताना, त्या मित्रांपैकी एकाची नजर अचानक बेडच्या उशीपर्यंत पोहोचलेल्या नळाएवढ्या पाईपलाईनकडे गेली. त्याच्या डोळ्यात कुतूहल उमटले, आणि न राहवून त्याचे विचारलं, 'हा नळ कसला रे... हितं काय बसल्याबसल्या नळाचं पाणी भरायची सोय हाय काय?'..
बेडवरचा पेशंट खळाळून हसला... 'बाबा रे, ती ऑक्सिजनची नळी आहे. कधीकधी पेशंटला ऑक्सिजनची तातडीची गरज लागली, की नाकाला लावायला हाच ऑक्सिजन वापरतात... '
गावाकडच्या मित्राच्या डोळ्यातलं कुतूहल आणखी गडद झालं.
त्या पाईपकडे अनिमिष नेत्रांनी पाहात त्याने निरागसपणे विचारलं, 'जरा मिनिटभर मी पण नाकाला लावू काय? मुंबईत आल्यापास्नं जीव निस्ता घुसमटून गेलाय. थोडी गावाकडल्यासारखी हवा छातीत भरून घेतो...'
पुन्हा खोलीत हास्याचे ताजेतवाने फवारे उसळले, आणि मी उगीचच अंतर्मुख झालो.
मुंबईच्या विदारक प्रदूषणाचं भयाण चित्र त्याच्या त्या एकाच प्रश्नात भेसूरपणे उमटून गेलं होतं.
मुंबईच्या हवेची पातळी आजकाल अनेक वर्तमानपत्रांत एका कोपऱ्यात वाचायला मिळते. राजकारण, कुरघोड्या, मारामाऱ्या, खून, बलात्कार, आत्महत्या, गुन्हेगारीच्या बातम्यातून त्या कोपऱ्याकडे किती नजरा रोज स्थिरावतात, हा प्रश्नच आहे. पण तो बोटभराचा चौकोन म्हणजे सगळ्या मुंबईवर डोळे वटारून बघणारा राक्षस असतो... प्रदूषणाची रोजची पातळी आणि हवेची शुद्धता यांचा एका लहानसा आलेख त्यात दिसतो. आपण प्रदूषणात एवढे आकंठ बुडालोय, की त्या चौकौनातल्या लाल-हिरव्या खुणांचे काही वाटेनासेच झाले आहे. मुंबईचा सर्वात प्रदूषित आणि कमी प्रदूषित पट्टा कोणता एवढेच त्यावरून कळते. प्रदूषणमुक्त पट्टा हे मुंबईकरांचे भविष्य नाही, हेच तो कोपरा रोज बजावत असतो...
गावाकडच्या त्या मित्राच्या त्या एका प्रश्नाने समोर वर्तमानपत्र नसतानाही तो कोपरा माझ्या डोळ्यासमोर नाचू लागला, आणि मी उगीचच अस्वस्थ झालो.
शुद्ध हवा हा मुंबईकराचा हक्क राहिलेलाच नाही.
आता तर, एका श्वासापुरत्या प्राणवायूसाठी माणसाला झगडायची वेळ आली आहे.
शुद्ध प्राणवायूचा एक श्वास माणसाच्या किंवा कोणत्याही जिवंत प्राण्याच्या जगणं आणि मरण्यातील कुंपणरेषा भक्कम करत असतो.
सध्या ती रेषाच धूसर, धुरकट होत चालली आहे. प्राणवायूच्या शोधात वणवण करताना माणसाची दमछाक होऊ लागली आहे, आणि त्या शोधाचा शेवट होईपर्यंत अखेरचा श्वासही सुटून जाऊ लागला आहे.
प्रदूषणाने ग्रासलेल्या मुंबईला आता कृत्रिम प्राणवायूची समस्याही भेडसावू लागली आहे. ऑक्सिजन सिलिंडर्स तुटवड्याच्या बातम्या दररोज भयाण रूप घेऊन माणसावर आदळू लागल्या आहेत.
भविष्यात पाण्यासाठी संघर्ष होतील, असे म्हटले जात होते.
आता तर, प्राणवायूच्या श्वासासाठी संघर्ष होईल अशी भयाण स्थिती समोर येऊ पाहात आहे.
... देशाच्या राजधानीत, दिल्लीत, प्रदूषणाचा कहर झाल्यावर, नवा उद्योग म्हणून अनेक ऑक्सिजन पार्लर्स सुरू झाल्याच्या बातम्या मागे येत होत्या. प्रदूषित हवेने भरलेल्या फुफ्फुसांना दिलासा देणारा शुद्ध प्राणवायूचा एखादा श्वास घेण्यासाठी पैसे मोजण्याची योजना तेथूनच आकाराला येऊ लागली होती.
गेल्या वर्षी डिसेंबरात, नाशिकच्या रेल्वे स्थानकावर एक ऑक्सिजन पार्लर सुरू झाले. प्राणवायूचे उत्सर्जन करणाऱ्या वनस्पतींनी भरलेली एक काचबंद खोली रेल्वे स्थानकावर तयार करण्यात आली. प्रदूषणाने घुसमटलेल्या जिवांनी त्या खोलीत एक फेरफटका मारावा, आणि वनस्पतींनी उत्सर्जित केलेल्या प्राणवायूच्या श्वासाने छाती भरून ताजेतवाने व्हावे, ही त्यामागची कल्पना....
अशी पार्लर्स जागोजागी व्हावीत, अशी अपेक्षा त्या वेळी प्रवाशांनी व्यक्त केली होती. पुढे काय झाले, माहीत नाही.
नासिकचे ते पार्लरही अजून सुरू आहे किंवा नाही, कल्पना नाही.
आपण शुद्ध हवेसाठी आता फारसे गंभीर नाही, याचे पुरावे मात्र दिवसागणिक वाढत चाललेले असताना, आता प्राणवायूचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.
हवेतला प्राणवायू श्वासून घेण्याची फुफ्फुसांची सवय प्रदूषणाने अगोदरच मोडून टाकलेली असल्याने, कमकुवत झालेल्या फुफ्फुसांना कृत्रिम प्राणवायूची गरज वाढू लागली आहे.
असे काही घडले, की पैसा मिळविण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांच्या धंद्यांना बरकत येते. सध्या ऑनलाईन दुकानदारीत, बाटलीबंद ऑक्सिजनचा व्यापार तेजीत आहे, ते त्यामुळेच...
त्यातही, शुद्ध प्राणवायूची हमी देणारी आणि टक्केवारीनुसार शुद्धतेची पातळी दर्शविणारे ऑक्सिजन टीन्स आता बाजारात आले आहेत.
भविष्यात, पोर्टेबल ऑक्सिजन खिशात ठेवणे ही माणसाची गरज ठरेल, असे याआधी कधी कुणास वाटले नसेल.
आता ती वेळ आली आहे.
असे म्हणतात, की कोणताही सजीव, सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची स्वतःची क्षमता निर्माण करत असतो. कोणत्याही परिस्थितीशी संघर्ष करण्याची त्याती शारीरिक क्षमता परिस्थितीनुरूप तयार होत असते.
याला सध्या हर्ड इम्युनिटी म्हणतात.
ऑक्सिजनविना जगण्याची सजीवाची क्षमता या परिमाणातून तयार होईल का?
तसे झाले, तर, प्राणवायूच्या नव्या बाजारपेठा फोफावणार कशा?

Saturday, September 19, 2020

‘नजर’ आणि ‘दृष्टी’ !

 ‘नजर’ ही काळानुरूप बदलणारी बाब आहे. वयासोबतही नजर बदलते. बहुतांश वेळा अंधुक होते. त्यावर उपाय म्हणजे, चष्मा! नजर स्वच्छ रहावी म्हणून चष्मा लावायचा असला, तरी अनेकदा चष्म्यानुसार नजर बदलते. म्हणजे, जसा चष्मा असेल तसे त्यातून सभोवतीचे दिसते. ही एक गंमत असते. म्हणून ‘ओरिजिनल’ नजर जपण्यापेक्षा, चष्मे बदलावेत आणि नव्या चष्म्यामुळे मिळणाऱ्या नव्या नजरेतून सभोवताल बघावे यावर अलीकडे वाढता कल दिसून येतो. म्हणून चष्म्यांचा खप वाढलेला दिसतो. 


चष्म्याची खरेदी हा नजरेसोबतच खिशालाही खेळविणारा खेळ असल्यामुळे जगप्रसिद्ध ब्रॅंडसप्रमाणेच, फूटपाथवर जुनेपुराणे, वापरलेले चष्मेदेखील विकणारे चष्मेवाले दिसतात. काही चष्मे निवडण्याआधी नजरेचा नंबर तपासतात, तर काहीजण चष्मा डोळ्यावर चढवून नजरेला सुटेबल असा चष्मा निवडतात. असो.

माझा चष्मा आता जुना झाला आहे. सुमारे आठ वर्षांपूर्वी साडेचार हजाराला घेतलेल्या त्या चष्म्याची नजरेला सवय झाली आहे. अजूनही काळ पुढे जाऊनही, नजरेने आणि चष्म्याने कुरकूर केलेली नाही. त्यामुळे त्याच काचांमधून अजूनही सर्व काही स्वच्छ दिसते, पाहाता येते. नजरही बऱ्यापैकी शाबूत आहे त्यामुळे चष्मा बदलावा, नवा घ्यावा असे वाटलेच नाही.

पण आजकाल वातावरणातील बदल, परिस्थितीतील बदल, हवामानाचे चढउतार आदी अनेक कारणांचा नजरेनर परिणाम होत असल्याने दृष्टी अधू होण्याची शक्यता असते. विशेषत: बालवयात दृष्टीविकार वाढत चालल्याचे काही निष्कर्ष अलीकडे पाहण्यातून काढले गेले आहेत. राज्याच्या आदिवासी समाजातील आठ टक्के म्हणजे सुमारे नऊ लाख शाळकरी मुलांमध्ये दृष्टिदोष आढळल्याने त्यांना मोफत चष्मे देण्याचा निर्णय सुमारे सहा महिन्यांपूर्वी राज्य सरकारने घेतला होता. त्यासाठी २० कोटींची तरतूदही करण्याचे जाहीर केले होते. हा चष्मा प्रत्येकी २५ रुपयास पडेल, असे कळते. म्हणजे, ५० हजारांत दोन हजार मुलांना चष्मे मिळतील. पण किंमत महत्वाची नाही. त्या मुलांना वेळेवर चष्मे मिळाले तर त्यांचा दृष्टिदोष दूर होऊन नजर स्वच्छ होईल, त्यामुळे या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी सुरू व्हायला हवी होती. किती मुलांना याचा लाभ झाला ते स्पष्ट झालेले नाही, पण चष्मा ही त्यांची गरज आहे हे स्पष्ट आहे. 

अर्थात, एकदा मिळालेल्या चष्म्यातून सभोवतीचे आकलन होण्याइतकी नजर सुधारली तरी त्यांच्यासाठी ते खूप आहे. न्यायाधीशांना चष्मे दर वर्षी बदलावे लागतात. त्यांच्यासाठी दृष्टी ही मौल्यवान आणि महत्वाची बाब आहे. म्हणूनच त्यांना नवे चष्मे देणे ही राज्य सरकारची बांधिलकी ठरते. या बांधीलकीच्या भावनेतूनच, न्यायाधीशांना चष्म्यासाठी वर्षाकाठी ५० हजार रुपये देण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले. 

सध्याच्या परिस्थितीत हा खर्च अनाठायी ठरेल असा आक्षेप काहींनी घेतला असला तरी सरकारची भूमिका स्पष्ट आहे. न्यायदेवतेची नजर स्वच्छ असणे ही काळाची गरज आहे. ती आंधळी असते, हा भावनात्मक गैरसमज आहे.

म्हणून चष्म्याचे महत्व अधोरेखित होते!!


Sunday, September 6, 2020

‘करोना’ की ‘कंगना’?





टीव्ही चॅनेलांचा बूम समोर आला की संजय राऊत कंगनाचा उद्धार सुरू करतात. मग चॅनेलवाल्यांनाही चेव चढतो, आणि कंगनाच्या निमित्ताने प्रश्न, चर्चा सुरू होतात.

संजय राऊत हे सध्या चॅनेलवाल्यांसाठी मोस्ट ॲक्सेसिबल आणि ईझिली ॲव्हेलेबल न्यूज सोर्स आहेत. कारण त्यांच्यामुळे चॅनेलींना विनासायास, बसल्या जागी बातम्यांचा खमंग मसाला मिळतो.

करोनाची महामारी कव्हर करणे हा जिवाशी खेळ असल्याने त्यासंबंधीच्या बातमीमागे धावण्याची शक्ती आणि, खरे म्हणजे, हमखास सुरक्षिततेच्या सुविधाही, चॅनेलींच्या प्रतिनिधींकडे नाहीत.

करोना सोडून कंगनाचे कव्हरेज हा सोयीचा पर्याय चॅनेलींनी निवडला व तोच लोकांच्या माथी मारण्यास सुरुवात केली, ती त्यामुळेच.

कंगनाचा वाद हातातून सोडून दिला, तर कव्हर करायला करोनाशिवाय दुसरे काहीच हातात उरणार नाही. प्रेक्षक या कंगनावादास कंटाळले असले तर वाहिन्यांच्या मर्यादांमुळे तोच वाद प्रेक्षकांच्या माथी मारावा लागतोय.

त्यामुळेच, संजय राऊत समोर सहजपणे हजर असताना एकाही चॅनेलमधील हरीचा लाल त्यांना हे विचारण्याचे धाडस का करत नाही, की, ‘खासदार साहेब, कंगनापेक्षा सध्या करोनाचा कहर ही मोठी समस्या असताना तुम्ही त्यावर अवाक्षरही का काढत नाही? राज्यासमोरची सर्वात मोठी समस्या कोणती ?

‘करोना’ की ‘कंगना’??

Sunday, August 30, 2020

बाबांना विचारा...

 “विचारा... विचारा... माझ्या बाबांना सगळं माहीत आहे!”...

चमकदार डोळ्यांची ती चिमुरडी मिश्किल सुरात मला जणू आव्हान देत होती, आणि मागच्या बाजूला आरामखुर्चीत बसून वर्तमानपत्र वाचणाऱ्या तिच्या बाबांकडे मी पाहिलं.

चष्म्याच्या काचेच्या कोपऱ्यातून आमच्याकडेच चोरून पाहणाऱ्या तिच्या बाबांच्या डोळ्यात भीती उमटली असावी असं मला उगीचच वाटून गेलं, पण तोवर तिचे बाबा सावरले असावेत. 

मी त्यांच्याकडे बघून आदराने एक हलकेसे स्मितहास्य केले, आणि आरामखुर्चीत बसलेले तिचे बाबा पुन्हा कावरेबावरे झाले.

‘आता खरंच हा आपल्याला काहीबाही विचारणार’ अशी शंका त्यांच्या डोळ्यात स्पष्ट उमटली, आणि वर्तमानपत्राचा कागद आपल्या चेहऱ्यावर ओढून घेत त्यांनी तोंडच लपविले.

मिश्किल डोळ्यांची ती मुलगी अजूनही खट्याळ हसत माझ्याकडे पाहातच होती.

जणू बाबांना खरंच सगळं माहीत आहे का याची परीक्षाच घ्यायचे तिने ठरवले असावे.

पण बाबांनी पेपराआड चेहरा लपविल्याचे माझ्या लक्षात आले होते.

मुलीच्या मनातील बाबांच्या प्रतिमेस तडा जायला नको म्हणून मी गप्प बसणेच पसंत केले.

पण तिच्या ‘सगळं माहीत असलेल्या’ बाबांना एक प्रश्न विचारावा, असे मनात आलेच होते.

परीक्षा न घेता मुलांना पास करता येणार नाही या कोर्टाच्या निकालावर सगळं माहीत असलेल्या बाबांनी काहीतरी बोलावे, असे मला वाटत होते.

पण बाबांचे आमच्याकडे लक्षच नव्हते. ते पेपरातच डोकं खुपसून बसले होते.

‘जाऊ दे... तुझे बाबा पेपर वाचतायत.. नंतर कधीतरी विचारीन !’ त्या चिमुरडीकडे कौतुकाने पाहून मी म्हणालो, आणि ती काहीशी हिरमुसली होऊन माजघरात पळाली!

पुढे दोनतीन दिवसांनी पुन्हा एकदा असाच, सहज त्यांच्याकडे गेलो, पण ती चुणचुणीत चिमुरडी पुढे आलीच नाही.

बाबाही नेहमीप्रमाणे पेपरात तोंड खुपसून आरामखुर्चीत बसले होते.

मी बाहेर पडलो.

दरवाजाबाहेर अंगणात एक चुणचुणीत मुलगा गोट्या खेळत होता.

माझ्याकडे बघून तो मिश्किल हसला.

बहुतेक त्या चिमुरडीचा मोठा भाऊ असावा.

मी त्याच्याजवळ गेलो, आणि गोट्या खेळायचं थांबवून उभा राहात उलट्या मनगटाने कपाळावरचे केस मागे सारत तो माझ्याकडे पाहून पुन्हा मिश्किल हसला.

‘काय रे, तुझी बहीण कुठे आहे?’ मी विचारले.

‘असेल घरात बसलेली...’ तो काहीसा बेफिकीरीने म्हणाला.

‘पण मी आत्ताच जाऊन आलो, दिसली नाही... आलीच नाही पुढे. नाहीतर आपणहोऊन येऊन सांगायची, “विचारा विचारा... माझ्या बाबांना सगळं माहीत आहे”...

“आता ती असा आगाऊपणा करणार नाही!” गंभीर होत दरवाजातून आत पाहात तो म्हणाला.

“का रे? काय झालं?” मी.

“त्या दिवशी बाबांनी तिला चांगलं झापलंय. येईलजाईल त्याला म्हणायची, विचारा विचारा... माझ्या बाबांना सगळं माहीत आहे... मग बाबांचा प्राॅब्लेम व्हायचा ... म्हणून बाबांनीच तिला सांगितलं, की, कुणी आलं की बाहेर यायचं नाही. माजघरात बसून अभ्यास करायचा... तेव्हापासून ती येत नाही!”...

एवढं बोलून पुन्हा खाली बसून त्याने लांबवरच्या एका गोटीवर नेम धरत बोटं ताणली.

मी एकवार कौतुकाने त्याच्याकडे पाहिलं, आणि रस्ता धरला!

Saturday, August 1, 2020

एका अमर दंतकथेची अखेर!

एका अमर दंतकथेची अखेर!
राजकीय पक्ष, चंदेरी दुनिया आणि उद्योगविश्वालाही हवाहवासा वाटणारा अमर सिंह नावाचा नेता आज काळाच्या पडद्याआड गेला. गेल्या काही महिन्यांपासून किडनीच्या विकारामुळे अंथरुणास खिळलेल्या खासदार अमर सिंह यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली, आणि या तीनही क्षेत्रांत शोकाच्या लाटा उसळल्या. राजकारणातले गूढ म्हणून ओळखले जाणारे अमर सिंह आपल्यासोबत राजकीय, उद्योग आणि चित्रपटसृष्टीतील अनेक सहस्यकथांची उकल न करताच परलोकवासी झाले. या क्षेत्रातील त्यांचा सहज वावर ही राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीने एक गूढकथा होती. राजकीय कारकीर्दीतील मोठा काळ त्यांनी मुलायमसिंह यादव यांचा विश्वासू सहकारी म्हणून समाजवादी पार्टीसोबत घालविला असला, तरी ते कधीच त्या एकाच नेत्याशी व त्याच पक्षाशी बांधील राहिले नव्हते. काँग्रेसपासून भाजपपर्यंत, साऱ्या पक्षांतील साऱ्या नेत्यांसोबत असलेली अमर सिंह यांची ऊठबस हेच त्यांचा व्यक्तिमत्वातील गूढपणाचे कारण होते. काँग्रेसच्या तंबूतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या अमर सिंह यांची उपयुक्तता नेमकी हेरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी त्यांच्याशी दोस्तीचा हात पुढे केला, आणि पार्टीतील भल्याभल्या नेत्यांना मागे सारून अमर सिंह हे पार्टीतले प्रस्थ बनले. समाजवादी पार्टीच्या कारभारावर त्यांनी आपला एवढा अंकुश बसविला, की त्या काळात अमरसिंहांचा शब्द हा पक्षातील अंतिम शब्द मानला जाऊ लागला. उत्तर प्रदेशातील राजकारणाचा चाणक्य म्हणून ओळख असलेल्या अमर सिंहांनी आपल्या राजकीय संबंधांचा धूर्त वापर करून समाजवादी पार्टीला राजकारणाच्या केंद्रस्थानी बसविले. मुलायमसिंह यादव यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसविण्यातही त्यांचाच मोठा वाटा होता. वेगवेगळ्या निवडणुकांतील उमेदवार निवडीचा निर्णय अमरसिंहांनी हिरवा कंदिल दाखविल्याखेरीज पूर्ण होत नसे. पक्षाचे महासचिव आणि राज्यसभा सदस्य असतानाही, अन्य अनेक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेले त्यांचे संबंध हे अखेरपर्यंत एक गुपित होते. अमरसिंह यांच्या सल्ल्याखेरीज पान हलत नाही, अशा नामवंतांमध्ये एकेकाळी अमिताभ बच्चन यांचाही समावेश होताच. बच्चन कुटुंबासाठी राज्यसभेचे दरवाजे अमरसिंह यांच्यामुळेच खुले झाले, हे गुपित राहिले नव्हते. सिनेसृष्टीतील कलावंतांची लोकप्रियता ओळखून त्यांना राजकारणात आणण्याचे व प्रस्थापित करण्याचे त्यांचे कसब वाखाणण्यासारखे होते. त्यामुळेच, चंदेरी दुनियेतील जेमतेम कारकिर्दीतच अमाप लोकप्रियता मिळविलेली अभिनेत्री जयाप्रदा राजकारणाच्या रंगमंचावर अमर सिंह यांच्यासोबत सहजपणे वावरू लागली.
पुढे समाजवादी पार्टीतील नेतृत्वाच्या वादातून मुलायमपुत्र अखिलेश यादव यांच्याकडे पक्षाची सूत्रे गेली, आणि अमर सिंह यांनी समाजवादी पार्टीला नमाजवादी पार्टी असे नाव देऊन टाकले. त्याआधी त्यांना मुलायमसिंहांनी पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविलाच होता. त्यांनी राष्ट्रीय लोक मंच नावाचा स्वतःचा पक्षही स्थापन केला, आणि जयाप्रदा यांच्यासोबत पक्षाची पाळेमुळे रुजविण्यासाठी दौरे सुरू केले. पिलिभीतमधील बिलसंडा गावात त्यांची जाहीर सभा होणार होती. या सभेत जयाप्रदा त्यांच्यासोबत आहे अशी जोरदार जाहिरात झाली, आणि सभेला प्रचंड गर्दी लोटली. जयाप्रदा यांचे दर्शन घेण्यासाठी रसिक (श्रोते कि प्रेक्षक?) अक्षरशः उतावीळ झाले होते. बराच वेळ गर्दी ताटकळल्यानंतर अमर सिंहांचे आगमन झाले, आणि जयाप्रदासोबत ते मंचावर आले. लोकांमध्ये अक्षरशः उन्माद संचारला होता. संध्याकाळ उलटून रात्रीचा अंधार पडू लागला होता. अमर सिंह यांनी माईक हातात घेतला, पण लोकांना त्यांचे भाषण ऐकायचे नव्हते. लोकांचा मूड ओळखून जयाप्रदांच्या हाती त्यांनी माईक दिला, आणि पुन्हा एकदा गर्दी अनावर झाली. जयाप्रदा यांना नेता म्हणून नव्हे, तर अभिनेत्री म्हणून पाहाण्यासाठी जनता उत्सुक होती. गर्दीतून फर्माईश सुरू झाली. शिट्ट्यांचा गदारोळ झाला, आणि फर्माईश घुमू लागली. मग जयाप्रदा यांनी भाषण आवरते घेतले, आणि त्या राजकीय मंचावर मुझे नौ लख्खा मंगा दे रे, सईया दिवाने... या गाण्यावर त्यांनी ताल धरला. अमर सिंहांनी सभा जिंकली होती.
राजकारणाच्या मंचावर अभिनेत्यांना आणून पब्लिकला पागल करण्याच्या त्यांच्या अनोख्या अंदाजामुळे प्रतिस्पर्धी राजकीय नेत्यांना घाम फुटत असे, असे म्हणतात. २४ फेब्रुवारी २०१८ या दिवशी अमर सिंह ढसाढसा रडले. श्रीदेवीचा अकाली मृत्यू अमरसिंहांना अस्वस्थ करून गेला. श्रीदेवी आणि आपले एवढे घनिष्ट संबंध होते, की ळ श्रीदेवी बोनी कपूरचे बोलणे कानाआड करेल, पण आपल्या म्हणण्याचा कधीच अनादर करणार नाही, असे सांगत तिच्या अनेक आठवणींनी व्याकुळ होऊन अमर सिंहांना अश्रू अनावर झाले होते. श्रीदेवीच्या निधनाची पहिली खबर देण्यासाठी बोनी कपूरचा पहिला फोन आपल्यालाच आला होता, असे अमर सिंह यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते.
राजकारणात घोडेबाजार नावाचा एक गूढ प्रकाराची नेहमीच चर्चा होत असते. अमर सिंह हे अशा घोडेबाजारात निष्णात होते, असेही बोलले जात असे. २००८ मध्ये गाजलेल्या, नोट फॉर वोट प्रकरणात त्यांच्यावर खासदारांच्या खरेदीचा आरोप झाला होता, आणि त्यांना तुरुंगवारीही करावी लागली होती, पण अमरसिंह यांना किंगमेकर म्हणून आणखी एक ओळख मिळाली...
अमरसिंह यांचे सर्वपक्षीय मैत्र हे अखेरपर्यंत सामान्यांसाठी गूढच राहिले. मोदींच्या एका सभेत समोरच्या रांगेत भगवे कपडे परिधान करून हजर असलेल्या अमर सिंह यांच्याकडे पाहात मोदींनी त्याचा उल्लेख केला होता. यांच्याकडे सगळ्यांचीच कुंडली आहे, ती योग्य वेळी ते बाहेर काढतील, असे मोदी म्हणाले, आणि अमर सिंह यांच्याभोवतीचे ते गूढ वलय अधिकच गहिरे झाले. अखेरच्या काही वर्षांत त्यांच्या राजकारणाचे रंगही बदलत गेले. आपली कोट्यवधींची संपत्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दान करून त्यांनी आपल्या राजकीय क्षेत्रालाच नव्हे, तर स्वतःच्या राजकीय कारकिर्दीलाही धक्का दिला, असे म्हटले जाते.

‘व्हिजन’वास!

सांप्रतकाळात करोनामुळे सारे काही ‘लाॅकडाऊन’ झालेले असल्याने दूरचित्रवाणीवरील मनोरंजन वाहिन्यांची मोठीच पंचाईत झाली असून अंतर’भान राखणे जरुरीचे झाल्यापासून चोखंदळ प्रेक्षकांना पाहता येतील अशा नवनव्या मनोरंजनाची निर्मितीही जवळपास ठप्प झाली आहे. अशा वेळी घरबसल्या मनोरंजनाचे माध्यम म्हणून अशा वाहिन्यांकडे पाहणाऱ्या प्रेक्षकांची निराशा होऊ नये व छोट्या पडद्यावरील मनोरंजन विश्वाच्या आकुंचनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढता यावी या स्पर्धात्मक साहजिक संधीचा लाभ उठविण्याचा विचार करून टेलिव्हिजनवरील वृत्तवाहिन्यांनी आपापल्या प्रसारणात बदल करण्यास सुरुवात करावी हे काळानुरूपच ठरते. मनोरंजन आणि माहिती यांचा मिलाफ असे वृत्तवाहिन्यांच्या कार्यक्रमांचे स्वरूप असावे अशी माहितीची आंस असलेल्या प्रेक्षकांचाही अपेक्षा असली तरी सध्या घरबसलेपणाच्या काळात मनोरंजन ही प्राधान्याची गरज आहे हे काही वृत्तवाहिन्यांनी बरोबर ओळखले आहे. तथापि, आपण मनोरंजन करीत नसून माहितीलाच प्राधान्य देतो असा आभास निर्माण करणे हे वृत्तवाहिन्यांच्या संपादकरूपी नेपथ्यकाराचे खरे कौशल्य असते. यामुळे होते असे, की, अशा वाहिन्यांना दोन्ही प्रकारांतील प्रेक्षक मिळतात. ज्यांना मनोरंजन म्हणून अशा कार्यक्रमांकडे पाहावयाचे असते, ते त्या निखळ दृष्टिकोनातून कार्यक्रम पाहतातच, पण जे माहितीसाठी आसुसलेले असतात, ते मात्र, मनोरजनातून माहिती मिळेलच या अपेक्षेने अखेरपर्यंत असे कार्यक्रम पाहतात.
मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे एक बरे असते. त्यातून काहीही मनोरंजनात्मक मिळाले नाही तर त्याचा प्रेक्षक निराश होत नाही. ‘टाईमपास झाला’ असा विचार करून रिकामा वेळ कसातरी घालविल्याच्या समाधानात पुढच्या कार्यक्रमाकडे वळतो. ज्यांना माहिती हवी असते, ते मात्र अनेकदा निराश होऊन, पुढच्या कार्यक्रमात तरी माहिती मिळेल या अपेक्षेने टीव्हीसमोर बसतात. ही एक प्रकारे निराशा पचविण्याची कसोटीच असली तरी माहिती मिळविण्याची आसक्ती एवढी प्रबळ असते, की त्यापुढे ते नाराश्यदेखील कस्पटासमान ठरते.
प्रेक्षकांची हीच मानसिकता नेमकी ओळखून सध्याच्या काळात ज्यांची गरज आहे असे कार्यक्रम आखणे हे एक प्रकारे ‘व्हिजन’ असते. वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रम पाहताना थोडे खोलात जाऊन प्रत्येक कार्यक्रमाचे विश्लेषण केले, तर या ‘व्हिजन’ मागील ‘दृष्टी’ अंधुकपणे दिसू शकते.
मनोरंजन वाहिन्यांची जागा वृत्तवाहिन्या व्यापतील अशी शंका आधीपासूनच माध्यविश्वात व्यक्त होत होती, आता ती वास्तवात येऊ लागली आहे.
कारण, एकूणातच, माध्यमविश्व हे ‘व्हिजनरी’ असावेच लागते!

Friday, July 31, 2020

हाच का सन्मान?

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार लोकशाहीवादी आहे, हे आता पुन्हा सिद्ध झाले.
ते होणार याची कुजबूज गेल्या चारसहा महिन्यांपासून मंत्रालयाच्या परिसरात सुरू होतीच.
लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या व्यक्तींचा आता खऱ्या अर्थाने आगळ्या पद्धतीने यथोचित सन्मान झाला आहे. फडणवीस सरकारच्या कारकिर्दीत सुरू झालेली सन्मानवृत्ती बंद करून करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक चणचणीवर मात करण्याचे ठाकरे सरकारने ठरविले आहे. १९७५ ते ७७ या आणीबाणीच्या कालावधीत लोकशाहीकरिता लढा देणाऱ्या व्यक्तींचा यथोचित सन्मान/गौरव करण्यासाठी त्यांना मासिक सन्मानवृत्ती देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता.
अर्थात त्या वेळी तुरुंगवास भोगलेल्या सर्व योद्ध्यांनी या योजनेचा लाभ उकळलेला नाही. आणीबाणीच्या काळात लोकशाहीसाठी आंदोलन करून तुरुंगवास भोगलेल्या हयात व्यक्तींपैकी ज्यांना खरोखरीच गरज आहे अशा गरजवंतांनी सरकारकडे अर्ज करून आणूबाणीविरोधी लढ्यात लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी तुरुंगवास भोगल्याचे सप्रमाण पुरावेही सादर केले होते अशा व सध्या मानधन मिळाल्याने जगण्यास हातभार लागेल अशा गरजू व्यक्तींना दरमहा सुमारे दहा हजार तर त्यांच्या विधवा पत्नींना पाच हजार रुपये सन्मानवृत्ती देण्याच्या फडणवीस सरकारने सुरू केलेल्या योजनेला लगाम घालून करोनावर मात करण्याकरिता आर्थिक रसद उभी करण्याचे ठाकरे सरकारने ठरविले आहे.
आणीबाणीच्या काळातील आंदोलन हा 'लोकशाहीकरिता लढा' होता. अशा लढवय्यांची सन्मानवृत्ती थांबविण्याचा निर्णय जारी करणाऱ्या आदेशातही ठाकरे सरकारने तसाच उल्लेखही केला आहे. त्यांंची सन्मानवृत्ती थांबवून वाचणाऱ्या जेमतेम काही कोटींमुळे करोनाविरोधी लढाईमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झालेला विपरीत परिणाम भरून काढून तिजोरीची दुरवस्था दूर करणे शक्य होईल, असे ठाकरे सरकारला वाटते. किंबहुना, तसे करण्याकरिता हा निर्णय म्हणजे प्रभावी उपाययोजना ठरेल, असेही ठाकरे सरकारचे मत आहे.
ही सन्मानवृत्ती बंद करण्यासंबंधीचा निर्णय घेणे किंवा आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय वा योजनांना कात्री लावणे हा सर्वस्वी सरकारचा अधिकार असतो, हे खरे आहे. आणीबाणीविरोधी आंदोलकांची सन्मानवृत्ती थांबविण्याचा निर्णयही त्या अधिकारातून घेतला, तर त्यातही काही गैर नाही.
मात्र, फडणवीस सरकारने सन्मानवृत्ती मंजूर केलेल्या या व्यक्तीनी लोकशाहीसाठी लढा दिला होता हे ठाकरे सरकार जाणते.
मानधन थांबविण्याबाबत जारी केलेल्या ताज्या शासन निर्णयातही ठाकरे सरकारने तसे नमूद केले आहे.
म्हणूनच, ठाकरे सरकार लोकशाहीवादी आहे, ही बाब अधोरेखित करणे गरजेचे आहे.
***
“राज्यातील सरकार हे आणिबाणीचे समर्थक असल्यानेच त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी कार्यरत संघर्षशील व्यक्तिमत्त्वांची मानधन योजना बंद केली आहे. या देशातील लोकशाही धोक्यात आली, तेव्हा त्याच्या रक्षणार्थ अनेकांनी संघर्ष केला आणि देशात लोकशाही हक्कांचे संरक्षण केले. या सरकारकडे
मंत्र्यांसाठी वाहने घेण्यासाठी पैसे आहेत. अन्यही कारणांसाठी पैसे आहेत. पण, लोकशाहीचे रक्षण करणार्‍यांना मानधन द्यायला पैसे नाहीत. आमचे सरकार आल्यावर आम्ही ही योजना पुन्हा सुरू करू.” - देवेंद्र फडणवीस
***

Thursday, July 9, 2020

काँग्रेसचे 'नवबंधन'!

नगर जिल्ह्याच्या पारनेरमधील पाच शिवबंधनधारी सैनिकांचे स्थलांतर आणि नंतरच्या नाराजीनाट्यानंतर झालेली घर वापसी हे सध्याच्या सर्वत्र माजलेल्या अनिश्चिततेचे प्रतिबिंब ठरले. अन्यथा,  पवित्र शिवबंधनाची गाठ तोडून त्यांनी दुसरा घरोबा करण्याचे धाडस केले नसते. एकाच तंबूत असताना इकडून तिकडे जाणे म्हणजे, ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात असाच प्रकार आहे, हे माहीत असूनही शिवसेनेचे पाच मावळे बारामतीच्या सावलीत दाखल झाले, आणि पारनेरसारख्या गावातील स्थानिक राजकारणाने थेट राज्याच्या सत्तास्थानालाच हादरा बसला.  

सारेजण एकाच होडीतून प्रवास करत असताना, या पाचजणांनी शिवबंधनाचा धागा तोडून थेट राष्ट्रवादीच्या सावलीत दाखल होणे ही वरवर वाटते तेवढी साधी घटना नाही. कारण सध्या महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या सावलीतून शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार कारभार करत आहे. काँग्रेस हे या सत्तेच्या खेळातलं कच्चं लिंबू आहे. राज्यातील या खेळात काँग्रेसला फारसा भाव नाही. पण अशी वेळ केव्हाही कोणावरही येऊ शकते, याची गंभीर जाणीव मात्र या प्रकरणाआधीच काँग्रेसला झाली असावी. 

अशा प्रसंगात भावनिक धागेदेखील तटातट तुटू शकतात, म्हणून पक्षजनांना घट्ट धरून ठेवता येईल, असा एक 'नवबंधन धागा' काँग्रेसने विकसित केला आहे. सध्या तंत्रज्ञानाचे युग असल्यामुळे आधुनिक तंत्राचा वापर करून आपल्या माणसांनी तंबूबाहेर जाऊ नये यासाठी काहीतरी केले पाहिजे, यावर खल सुरू होता, आणि एक नवी शक्कल समोर आली...

जंगलातील प्राण्यांच्या हालचालींवर पाळत ठेवावी लागते. ते कुठे जातात, काय करतात, काय खातात, कोणाबरोबर भांडतात आणि कोणाशी लगट करतात, हे सारे कळावे यासाठी त्यांच्या गळ्यात जीपीएस प्रणालीचा पट्टा अडकविला जातो. ही शक्कल काही नवी नाही. जेथे स्थलांतराची शक्यता अधिक असते, तेथे अशी पाळत ठेवावीच लागते.  

नेमकी हीच युक्ती काँग्रेसला सुचली, आणि पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या गळ्यात जीपीएस प्रणालीचा पट्टा अडकविण्याचे काँग्रेसने ठरविले. या मोहिमेची सुरुवात कर्नाटकातून झाली आहे. 

कर्नाटकातील काँग्रेस कार्यकर्त्याच्या गळ्यात असा जीपीएस प्रणालीचा पट्टा अडकविण्यात येणार आहे. यामुळे आपला कार्यकर्ता कोठे जातो, कोणासोबत ऊठबस करतो, काय करतो याची सारी खबरबात तंत्रज्ञानाच्या साह्याने एकत्र करणे काँग्रेसला शक्य होणार आहे. अलीकडेच कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले डी. के शिवकुमार - फोडाफोडीचे जाणकार म्हणून त्यांचा लौकिक आहे असे म्हणतात-  यांनी तसे फर्मान जारी केले आहे. 

पट्टेवाल्या कार्यकर्त्यांमुळे काँग्रेस अधिक मजबूत होईल, असा शिवकुमार यांचा विश्वास आहे. पक्षाने आता डिजिटल तंत्रज्ञान वापरले पाहिजे, आणि ग्रामपंचायत स्तरापर्यंत या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे त्यांनी पदभार स्वीकारतानाच, गेल्याच आठवड्यात आयोजित प्रतिज्ञा दिन कार्यक्रमात जाहीर केले होते. राज्यातील ३० जिल्हे, ४६२ तालुके आणि सहा हजारांहून अधिक ग्रामपंचायत क्षेत्रांतील पक्ष कार्यकर्त्यांना पक्षासोबत बांधूनठेवण्याचा हा अभिनव प्रयोग शिवबंधन प्रयोगाहूनही अभिनव असा ठरणार अशी चर्चा आहे...


Saturday, July 4, 2020

भविष्य वाचविण्यासाठी...



संकटे कधीच एकटी येत नाहीत असे म्हणतात. एका मोठ्या संकटासोबत त्याला बिलगलेली शेकडो संकटे आसपास संचार करत असतात. महापूर, वादळ, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती येऊन गेल्या की लगेचच रोगराई सुरू होते. साथीचे आजार फैलावतात, आणि मोठ्या संकटातून बचावलेल्यांसमोर जगण्याचे नवे आव्हान उभे राहते. करोनाभोवतीदेखील अशा हजारो संकटांच्या सावल्या विक्राळपणे पसरलेल्या असल्याने, ही जीवघेणी साथ आटोक्यात आली, तरी त्यानंतरचे जगाचे भविष्य कसे असेल व त्याला विळख्या घालणाऱ्या इतर संकटांतून माणसाला कसे वाचवायचे या चिंतेने जगाची झोप आत्ताच उडाली आहे.
करोनाची साथ दिवसागणिक भयाण होत असून ती आटोक्यात येण्याची कोणतीच चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. या संकटाने संपूर्ण जगाची शांतताच धोक्यात आली असून माणसाच्या सहनशक्तीची कसोटी सुरू झाली आहे. त्यामुळे, लोकांचे जीव वाचविण्याबरोबरच, लोकांचा भविष्यकाळ सुरक्षित करणे हेदेखील सध्याचे मोठे आव्हान ठरले आहे. संयुक्त राष्ट्रसंघास सध्या याच आव्हानाच्या चिंतेने ग्रासले आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीनंतरच्या प्रसिद्धी पत्रकात या भीतीचे प्रतिबिंब दिसते. करोनाचा फटका एवढा तीव्र असेल, की वर्षअखेरीस जगभरातील तेरा कोटी लोकसंख्येस उपासमारीचे संकट झेलावे लागेल, असा इशारा या पत्रकात देण्यात आला आहे. करोनाच्या संसर्गाची साखळी तोडून आजारमुक्तीसाठी अमलात आणल्या जाणाऱ्या टाळेबंदीचे दुष्परिणामही यानंतर दिसू लागणार असून गोवर आणि पोलियोच्या साथीचे नवे संकट यातून उद्भवू शकते अशी भीती संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एन्टोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली आहे. सर्वसाधारणपणे ज्या देशात सध्या स्थैर्य आहे, अशा देशांनादेखील या दुष्परिणामांचे चटके बसू शकतात. अशा संकटांमुळे मानसिक स्थैर्य बिघडते, सामाजिक आणि आर्थिक समस्या तीव्र होतात, तणाव वाढतो व हिंसाचारासारख्या घटनादेखील घडू शकतात. त्यामुळे करोनाचा फैलाव रोखण्याच्या प्रयत्नांबरोबरच, त्यासोबत येऊ घातलेल्या या संकटांशी मुकाबला करण्याची तयारी व आखणीदेखील जगाला अगोदरच करावी लागणार आहे. सध्या तरी अशी तयारी सुरू झालेली दिसत नाही, अशी भावना या पत्रकात व्यक्त झाली आहे. शांततेची प्रक्रियाच विस्कळीत झाली आहे, त्यामुळे या आघाडीवरील जागतिक स्तरावरील कामदेखील थंडावले आहे. याचा परिणाम म्हणून दहशतवादी आणि अतिरेकी संघटनांच्या कारवायांना ऊत येईल, अशी भीती संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केली आहे.
अगोदरच समस्यांनी ग्रासलेल्या देशांना या संकटांचे चटके बसण्यास आता सुरुवात झाली आहे. इमो हे नायजेरियातील ३६ राज्यांपैकी एक राज्य. जेमतेम साडेपाच हजार चौरस कि.मी. क्षेत्रफळाच्या या राज्याची लोकसंख्या सुमारे ५० लाखांच्या आसपास आहे. शेती आणि व्यापार- पाम तेलाचे उत्पादन ही या राज्याच्या उत्पन्नाची मुख्य साधने असली, तरी आज तेथील परिस्थिती चांगली नाही. गेल्या चार महिन्यांपासून येथील ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. इमोच्या राजधानीच्या शहरात असे शेकडो ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर ठाण मांडून आपल्या समस्येकडे लक्ष वेधताना दिसतात. उपासमारी आणि भुकेमुळे त्यांच्या अंगात निषेधाच्या घोषणा देण्याचीही ताकद उरलेली नाही. अलीकडच्या काळात नायजेरियातील अन्य अनेक राज्यांतील ज्येष्ठ नागरिकांवर हीच वेळ ओढवली आहे. काही राज्यांमधअये तर गेल्या अडीच वर्षांपासून निवृत्तीवेतन न मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकांना जगण्याचीच भ्रांत निर्माण झाली आहे.
नायजेरियामध्ये ज्येष्ठांची ही स्थिती, तर, अगोदरच सततच्या युद्धाच्या सावटामुळे पुरते खिळखिळे झालेल्या  येमेनमध्ये करोनाच्या संकटाची भर पडल्याने तेथील लाखो बालकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. कोणत्याही संकटात, दुर्बल आणि संरक्षणासाठी इतरांवर अवलंबून असलेल्यांनाच संकटाचे चटके अगोदर सोसावे लागतात. नायजेरियातील बालकांवर ओढवलेल्या कुपोषणाच्या संकटामुळे सध्या सारे जग हळहळते आहे. या बालकांवर मृत्यूने दाट सावट धरले आहे. या वर्षाअखेर येमेनमधील सुमारे पंचवीस लाख मुले उपासमारीची शिकार होतील, असा युनिसेफचा अंदाज असून, या संकटातून सोडविण्यासाठी जगाने पुढे यावे अशी हाक युनिसेफने दिली आहे. करोनामुळे येमेनची अर्थव्यवस्था पुरती खिळखिळी झाल्याने वर्षअखेरीसपर्यंत आणखी सुमारे सहा लाख बालके उपासमारीमुळे मृत्यूच्या खाईत ढकलली जातील, असा भीषण अंदाज युनिसेफने वर्तविला आहे. गेल्या पाच वर्षांच्या युद्धकाळात या देशातील किती बालकांचा मृत्यू झाला, त्याला गणतीच नाही. आता त्यात करोनाची भर पडली आहे.
संकटांच्या या सावटामुळे जगभरातील कळ्या उमलण्याआधीच कोमेजून जाणार असल्याने, त्या वाचविण्यासाठी जगाने संकटापलीकडच्या भविष्यकाळावर आजच लक्ष देण्याची गरज आहे.
दिनेश गुणे
dineshgune@gmail.com

Tuesday, June 30, 2020

कचरा आणि बातमी...

तब्बल सदतीस मिनिटांनंतर त्याने कानाला अडकवलेला इयरफोन काढला, आणि एक मोकळा श्वास घेतला. अशी काही असाईनमेंट असली, की त्याला जाम टेन्शन यायचं. त्यातही लंबचवडी भाषणं ऐकून त्यातून बातमी शोधायची, म्हणजे तर वार्षिक परीक्षेतला गणिताचा पेपर असल्यासारखी छाती धडधडायला लागायची. आजही तसंच झालं. राज्याच्या परिस्थितीवर साहेब आज जनतेशी संवाद साधणार आहेत, त्यावरून छानशी बातमी करा, असा आदेश त्याला व्हॉटसअप ग्रुपवर आला, आणि रस्त्यावरून चालत असतानाच तो थबकला. रस्त्याच्या पलीकडे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा साचला होता. त्यावर माशा घोंघावत होत्या. थोडी दुर्गंधीही सुटली होती. पण त्याचं त्याकडे लक्षच नव्हतं. बसस्टॉपवरच्या बाकड्यावर बसून त्याने मोबाईलमधून साहेबांच्या भाषणाची लिंक उघडली, आणि इयरफोनमधून तो परिचित आवाज त्याच्या कानात घुमला. पुढची सदतीस मिनिटे तो मन लावून भाषण ऐकतच होता. नेहमीचेच शब्द, तीच वाक्यं, तोच विनवणीचा स्वर, तीच कौतुकाची झालर, सारे काही आपण याआधी कितीतरी वेळा ऐकलंय, असं त्याला सारखं वाटत होतं. तरीही संपूर्ण भाषण एकाग्रतेने ऐकून त्यानेही मनातल्या मनात जयहिंद वगैरे म्हटलं, आणि मोबाईल बंद करून खिशात ठेवला...
मग मात्र, त्याला घाम फुटला. एवढ्या लांबलचक भाषणातली बातमी आपल्याला शोधायची आहे, हे त्याला आठवलं. शिवाय, छानशी बातमी करा, असा आदेश होता, हेही आठवलं, आणि त्याच्या घशाला कोरड पडली. या भाषणात नेमकी बातमी काय, त्यात छानसं काय आणि ते कसं शोधायचं, हा प्रश्न त्याला पडला. क्षणभर मन भिरभिरलं... पुन्हा एकदा ते भाषण ऐकून पाहावं, असंही त्याला वाटलं, आणि त्याने मोबाईल काढला. सुरू केला, आणि इयरफोन कानाला लावला... पुन्हा तेच, नेहमीचेच, सवयीचे शब्द कानावर पडले. आता त्याला फक्त ते भाषण ऐकू येत होते. आसपास कुठेही त्याचे लक्ष नव्हते. रस्त्यावरून तुरळक वाहने येजा करत होती. एखाददुसरा माणूसही त्याच्याकडे विचित्रपणे पाहात पुढे जात होता. साध्या माणसांसाठी बसेस बंद असताना हा बसस्टॉपवर कशाला ताटकळतोय, असा भाव त्या नजरेत उमटायचा. पण त्याचे त्याकडे लक्ष नव्हते. त्याचे कान भाषणावर खिळले होते.
पुढची सदतीस मिनिटे गेली, आणि त्याने मोबाईल बंद केला. इयरफोन गुंडाळला, आणि खिशात ठेवून तो पुन्हा विचार करू लागला. यातून नेमकी छानशी बातमी कशी काढायची, हेच त्याला सुचत नव्हते. मुळात, या भाषणात बातमी तरी काय होती, असा प्रश्न त्याला पडला होता.
त्याने अस्वस्थपणे इकडेतिकडे पाहिले, आणि त्याची नजर समोरच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे वळली. फाटके कपडे घातलेला, पाठीवर गोणपाटाची पिशवी लटकावलेला, विझलेल्या डोळ्यांचा एक माणूस हातातल्या लोखंडी सळीने कचरा इकडेतिकडे करत होता. त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून काहीतरी शोधत होता.
आपणही कचरावेचकच आहोत, असा विचार त्या क्षणी मनात येऊन तो स्वतःशीच खिन्नपणे हसला. आता त्याचे संपूर्ण लक्ष त्या कचरा वेचणाऱ्या माणसावर खिळले होते. बातमीचा थोडासा विसरही पडला होता.
अचानक कचरा उपसणाऱ्या त्या माणसाच्या विझलेल्या डोळ्यात एक चमक उमटली. त्याला ती लांबूनही स्पष्ट दिसली. कचऱ्याच्या ढिगाऱ्यातल्या त्या माणसाने हातातली लोखंडी सळी बाजूला ठेवली, आणि तो खाली वाकला. त्या कचऱ्यातून त्याने काहीतरी वेचलेच होते. ती विकून काहीतरी किंमत मिळेल, याचा त्याला आनंद झाला होता. त्याने ती वस्तू हातात घेतली. उलटीसुलटी करून पाहिली. त्यावर हलकेच हात फिरविला, आणि अंगावरच्या मळक्या फाटक्या शर्टाच्या टोकाने पुसून ती साफ केली. त्याच्या डोळ्यात आनंद मावत नव्हता. कुणीतरी कचऱ्यात फेकलेल्या त्या वस्तूला त्याच्या दृष्टीने किमत होती. कचरा वेचण्याच्या आजच्या कष्टाचे चीज झाले, असा विचार त्याच्या मनात उमटला होता.
याला तो स्पष्ट वाचता आला होता.
तो स्वतःशीच हसला, आणि कचरा वेचणाऱ्या त्या माणसाचे त्याने मनोमन आभार मानले. कचऱ्यातूनही काहीतरी कामाचे हाती लागते, हा मोलाचा संदेश त्याला ऐन मोक्याच्या क्षणी मिळाला होता.
दुसऱ्याच क्षणाला त्याने मोबाईल काढला, आणि बातमी लिहायला घेतली. सदतीस मिनिटांच्या भाषणातील पंधरावीस वाक्ये रंगवून रंगवून लिहून काढली, आणि त्याला छानसा मथळा देऊन त्याने व्हॉटसअपवरूनच ती बॉसच्या नंबरवर धाडली.
कचऱ्यातून किंमती काहीतरी वेचण्याच्या शिक्षणाचे चीज झाले, असे त्याला वाटले, आणि त्याची पावले पुढे पडू लागली...

Sunday, June 28, 2020

कळ्या जपण्याचा काळ...


जगाच्या पाठीवरील दक्षिण आशियाच्या एका कोपऱ्यातील मालदीव नावाच्या एका लहानशा बेटावरची ही एक विरोधाभासी कहाणी आहे. १९८० पासूनच्या गेल्या चार दशकांत या देशाने विकासाचे सारे मापदंड झपाट्याने आपल्या खिशात घातले. ८० च्या दशकात हा देश जगातील सर्वात दरिद्री देश म्हणून ओळखला जात होता. आज पर्यटन व्यवसायाच्या जोरावर या देशाने आपल्या कपाळावरील दारिद्र्यरेषा जवळपास पुसून मध्यमवर्गीय उत्पन्नगटातील देश म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. येथील नागरिकांचे सरासरी आयुर्मान ४७ वर्षांवरून ७७ वर्षांपर्यंत वाढले आहे. तब्बल ९६ टक्के मुले प्राथमिक शिक्षणाच्या पटावर नोंदली गेली आहेत, आणि ९६ टक्के मुलांना इंग्रजी या जागतिक भाषेची ओळख झाली आहे... गेल्या २० वर्षांत माता मृत्युदराचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

पण या यशाला एक काळोखी बाजूदेखील आहे. या देशातील हजारबालके अजूनही दारिद्र्याच्या खाईत खितपत पडलेली आहेत, आणि सुमारे ७५ टक्के सुशिक्षित युवक बेरोजगारीचे जिणे जगताहेत. पाचपैकी एक मूल कमजोर आहे, तर साठ टक्के मुलींना शाळकरी वयातच लैंगिक शोषणाची शिकार व्हावे लागले आहे. हिंसाचारी टोळकी ही या देशाची मोठी डोकेदुखी बनली आहे. देशाच्य राजधानीतच, किशोरवयीन मुलांच्या वीस ते ३० टोळ्या हिंसक कारवायांमध्ये गुंतलेल्या आहेत. प्रत्येक टोळीमध्ये किमान ५० ते कमाल ४०० मुले आहेत. त्यामुळे, उच्च माध्यमिक शिक्षणाच्या टप्प्यात प्रवेश करणाऱ्यांची संख्या मात्र जेमतेम ४५ टक्क्यांपर्यंतच आहे. २२ टक्के मुलांना स्थूलपणाच्या विकाराचा विळखा आहे, तर १५ ते २५ वयोगटातील ५० टक्के मुले अंमली पदार्थांच्या आहारी गेली आहेत....
मुलांचे आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षितता या तीन बाबींना प्राधन्य देऊन गेल्या काही दशकांत धोरण आखणी करणाऱ्या मालदीवमध्ये दिसणाऱ्या विकासाच्या परिणामांच्या या दोन बाजू हे जगभराचे प्रातिनिधिक चित्र आहे. मालदीवचे उदाहरण अशासाठी, की या देशाने कमीत कमी काळात परिवर्तनाचा एक टप्पा गाठला असला तरी त्याची दुसरी बाजू फार कौतुकास्पद दिसत नाही. जगात अनेक देशांत हीच परिस्थिती आहे. असे जेव्हा होते, तेव्हा त्याच्या दुष्परिणामांची पहिली शिकार बालकेच असतात. संकट किंवा असाधारण परिस्थितीचा पहिला फटका संरक्षणासाठी मोठ्यांवर अवलंबून असलेल्यांनाच बसतो, हे सार्वत्रिक सत्य आहे. म्हणजे, अशा स्थितीत बालकांनाच वेगवेगळ्या हिंसाचाराची शिकार ठरविले जाते. 
संयुक्त राष्ट्रसंघाच्या बालकल्याण निधी (युनिसेफ), जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि संयुक्त राष्ट्रसंघाची शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (युनेस्को) यांनी एकत्रितपणे बालकांवरील हिंसाचारास आळा घालण्याबाबतच्या पाहणीचा जागतिक अहवाल नुकताच प्रसिध्द केला. या अहवालातील वास्तव माणुसकीच्या संवेदनांना सुन्न करणारे आहे. जगभरातील निम्मी, म्हणजे सुमारे एक अब्ज बालके वर्षाकाठी शारीरिक, मानसिक व लैंगिक हिंसाचाराची शिकार ठरतात, असे चिंताजनक वास्तव या अहवालाने सामोरे आणले आहे. जखमा, अपंगत्व किंवा मृत्यूपासून बालकांचे संरक्षण करण्याबाबत ठोस धोरण आखण्यातील जगभरातील उदासीनतेमुळे, भावी पिढीच्या भविष्यावरच या अहवालातील वास्तवाने काळी रेघ उमटविली आहे. जगभरातील सुमारे ८८ टक्के देशांमध्ये बालकांच्या संरक्षणासाठी ठोस कायदे अस्तित्वात आहेत. पण त्यापैकी निम्म्या देशांत या कायद्यांची परिणामकारक अंमलबजावणीच होत नाही, असे या पाहणीच्या निमित्ताने उघडकीस आले. 
बालहत्येच्या आणखी एका भीषण वास्तवावर या अहवालाने बोट ठेवले आहे. २०१७ मध्ये जगभरात १८ वर्षांखालील ४० हजार मुलांची हत्या झाली. हे प्रकार पुढे सातत्याने वाढतच चालले आहेत, असे हा अहवाल म्हणतो. 
कोविडच्या महामारीच्या काळात तर मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. शाळाबंदी, संचारबंदी आणि टाळेबंदीमुळे तर, अत्याचारींचे आणि मानसिक विकृतांचे चांगलेच फावले असून मुले त्यांच्या तावडीत सापडणे सोपे झाले आहे. त्यामुळे या काळात मुलांच्या सुरक्षिततेकडे सतर्कतेने लक्ष ठेवले पाहिजे. स्वयंसेवी संस्था, संघटना आणि समाजसेवींनी या कामी पुढाकार घेतला पाहिजे, असे युनिसेफने सुचविले आहे. याच काळात ऑनलाईन द्वेषमूलकतेचे प्रमाणही वाढीस लागले आहे. मानसिक हिंसाचाराची ही सुरुवात असली, तरी मुलांना या भीतीने ग्रासण्यास सुरुवात झाली असून त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. आज घरात स्वतःस बंद करून घेतलेल्या मुलांन या भयामुळे उद्या घराबाहेर पडणे, शाळेत जाणेही असुरक्षित वाटू लागेल, अशी शंका बालकांच्या सुरक्षिततेविषयी अभ्यास करणाऱ्या या गटास वाटते. त्यामुळे, भविष्यात जेव्हा शाळा नियमित सुरु होतील, तेव्हा तेथील वातावरण अधिक सुरक्षित असेल याची हमी मुलांना मिळण्याची गरज आहे. सध्या ऑनलाईन शिक्षणपद्धती विकसिक होऊ पाहात आहे, ही चांगली बाब असली, तरी ऑनलाईन संपर्कातूनच मानसिक अत्याचारांचे प्रकारही वाढीस लागले आहेत. लैंगिक आणि विकृत वर्तणूकीचे प्रमाणही वाढत आहे, आणि असे प्रकार म्हणजे मानसिक हिंसाचारच आहेत. घरात कोंडून घेतल्यामुळे मुलांचे मोकळेपणाचे वर्तुळच आकसले आहे. पालकांसोबत राहूनही, सगळेच आपापल्या कामात व्यग्र असल्याने, त्यांच्या मोकळेपणात मुलांसाठी मिळणारा वेळ प्रत्यक्षात मात्र कमी झाला आहे. मित्र, नातेवाईक किंवा समव्यवसायींचा थेट संपर्क तुटल्यामुळे मानसिक आधार काहीसे कमकुवत होत चालले आहेत, आणि त्यातून मुलांना सावरणे व पुन्हा त्यांच्या रुळलेल्या जीवनशैलीत आणणे हे पुढील काळाचे मोठे आव्हान असेल, 
अशा आव्हानात्मक काळात समाज आणि सरकारांना मोठी जबाबदार भूमिका वठवावी लागणार आहे. त्याकरिता व्यापक विचारमंथनाची आणि संभाव्य समस्यांची उत्तरे आत्ताच शोधण्याची गरज आहे. तसे झाले नाही, तर मानसिक किंवा शारीरिक हिंसाचाराच्या वाढत्या प्रकारांत भविष्यातील एका पिढीची मोठी हानी होण्याची भीती आहे. ते टाळायचे असेल, तर, करोनाच्या महामारीनंतरचे असे एक नवे जग आपल्याला उभे करावे लागेल, जेथे मुलांचे विश्व आश्वस्त आणि भयमुक्त असेल. केवळ भतिक विकासाची साधने मानसिक विकृतीला आळा घालू शकत नाहीत, भविष्यात मानसिक विकासाची मोठी गरज भासणार आहे. टाळेबंदी आणि संचारबंदीमुळे मानसिक विकासास आलेल्या मर्यादांची दरी बुजविणे हे आता काळाने माणसासमोर ठेवलेले आव्हान आहे. जागतिक आरोग्य संघटनेने योग्य वेळी हा प्रश्न ऐरणीवर आणून जगाला जागे केले आहे.  

Thursday, June 25, 2020

डे-वन : मफलर ते मास्क

-


 आज पुन्हा, ४५ वर्षांनंतर, याच दिवशी, त्याच दिवसाचा एक वेगळाच अंश अनुभवायला मिळतोय. सकाळी जाग आली, तेव्हा तो दिवस आठवला. योगायोगाने नव्हे. अगदी जाणीवपूर्वक. ४५ वर्षांपूर्वी, २६ जूनला... मी साखरप्याच्या घरी, सोप्यात, राजांगणातला पावसाचा धबधबा अनुभवत अंथरुणात लोळत होतो. नुकतं उजाडू लागलं होतं. मस्त, कुंद हवा होती. पावसाळ्याच्या दिवसात साखरप्याच्या घरात असणं हे त्या वेळी माझ्या सुखाच्या कल्पनांतलं परमोच्च सुख होतं. बाहेर कोसळणारा पाऊस, अगदी बसल्या जागी, आमच्या चौसौपी घराच्या मधल्या अंगणात- राजांगणात- एकवटून कोसळायचा, आणि छपराच्या चारही कोपऱ्यांच्या पन्हळीतून अक्षरशः धबाधबा ऊतू जायचा... त्याला एक मस्त लय असायची. अजूनही असते, पण ते दिवस वेगळे होते. कारण, ते अनुभवण्याची मजा त्या वयात अधिक होती. पुढे अनेक पावसाळे पाहिल्यावर, त्यातलं ते वेगळेपणही सवयीचं होतं. म्हणून, प्रत्येक पावसाळ्याचं नवेपण असलं, तरी काही वेगळे पावसाळे मनावर शिंपडतच राहातात. तर, त्या दिवशी तो असाच कोसळत होता, आणि मी अंथरुणावर, डोळे मिटून, त्याचा नाद कानात साठवत पडून होतो. तितक्यात ओटीवरून एक ओळखीच्या आवाजातली हाक आली. मी लाजून ताडकन अंथरुणातून उठलो. कारण, इतक्या उशिरापर्यंत कुणी लोळत पडतो का, असं विचारायचे आणि त्यावर उत्तर न देता, शरम वाटायचे ते दिवसच होते...
बाहेर रमाकांत पाटील होते. आमच्या तालुक्याचे प्रचारक. ठेवणीतल्या, कौटुंबिक आवाजात त्यांनी मला हाक मारली, आणि मी ताजातवाना असल्यासारखा चेहरा करून ओटीवर गेलो.
‘आवरा... आपल्याला निघायचंय. लगेच. वेळ काढू नको.’ उगीचच इकडेतिकडे पाहात दबक्या आवाजात ते म्हणाले, आणि मी बिचकलो.
कुठे निघायचंय, कशाला जायचंय, काहीच कळलं नव्हतं. तरीही कपडे पिशवीत भरले, आणि मागीलदारीच्या चुलीवरच्या कोनाड्यातली शेणीची राखुंडी दातावर खसाखसा घासून चारपाच चुळा भरून मी पुन्हा ओटीवर आलो. मामीने दिलेला चहा आम्ही दोघांनी घेतला. दरम्यान पाटील आणि मामाचं काहीतरी बोलणं झालं होतं.
मग मी पिशवी काखोटीला मारली, आणि पाटलांसोबत बाहेर पडलो. मामाने पाठीवर थोपटून निरोप दिला.
गावाबाहेर तिठ्यावर आलो, तेव्हाही पाऊस भरुभुरत होता. एक ट्रक देवरूख रोडकडे वळला. पाटलांनी हात दाखविला. कुणीतरी अनोळखी ड्रायव्हर होता. त्याने ट्रक थांबविला, आणि आम्ही केबिनमध्ये चढलो. ट्रक देवरूखच्या दिशेने निघाला. तासाभरानंतर मार्लेश्वर तिठ्यावर पाटलांनी ट्रकवाल्याला खूण केली, आणि आम्ही उतरलो. देवरूखहून चंदू तिठ्यावर येऊन थांबलेलाच होता. त्याच्या पाठीवर एक गोणपाटाची मोठी पिशवी, आणि कपडे बांधलेली एक लहान पिशवी होती. काही न बोलता आम्ही मार्लेश्वरच्या दिशेने चालू लागलो.
पाचसहा मैल चालल्यावर पाटलांनी तोंड उघडलं.
‘आणीबाणी लागू झालीय. आपल्यातल्या काही लोकांना पकडणारेत. वॉरंट निघालीयेत. जेलमध्ये सडण्यापेक्षा, लपून जाऊ. भूमिगत होऊ, आणि काहीतरी करू. जेलमध्ये किती दिवस राहावं लागेल, तिथे काय हाल होतील, काहीच कळत नाही. त्यापेक्षा भटकू. कुठेतरी लपून आसरा घेऊ. आपल्या माणसांनी तशी व्यवस्था केलीय’...
आम्ही मान डोलावली, आणि चालू लागलो. चंदूच्या पाठीवरचं गोणपाटाच्या पिशवीतलं ओझं आलटून पालटून पाठीवर घेत निघालो. मार्लेश्वरला पोहोचलो, तेव्हा दुपार वगैरे झाली होती. तेव्हा तिथे आजच्याएवढी वर्दळ नव्हती. संपूर्ण एकान्त. दाट जंगल, आणि आसपास माणसाचा वावरही नाही.
एका मोठ्या दगडाच्या मागे आम्ही सामान लपवलं, आणि एका लहानशा ओहोळाखाली बसून मनसोक्त आंघोळ केली. कपडे बदलले आणि चंदूने बांधून आणलेल्या भाजीभाकरीवर ताव मारला. थोड्या वेळाने गोणपाटाची पिशवी उघडली, आणि माझे डोळे विस्फारले. आत सायक्लोस्टायलिंग मशीनचे मॉडेल होते. हाताने बनविलेले. स्क्रीन प्रिंटिंगसाठी बनवतात, तसे. दोन लाकडी चौकटी बिजागराने जोडलेल्या. एकावर पाट, आणि एकावर जाळी... एक हाताने फिरवायचा रॉड... शाईच्या ट्यूब, कागदांचा गठ्ठा...
चंदू माझ्याकडे बघून नुसतंच हसला. शाळेतून या वस्तू गुपचूप उचलून आणल्या होत्या.
आणीबाणीविरोधातील पत्रके तयार करून गावोगाव त्याचे वितरण करायचे, असं काम आपल्याकडे असेल. पाटील म्हणाले. पण तोवर आणीबाणी म्हणजे काय, त्याचा आपल्याशी संबंध काय, वगैरे काहीच माहीत नव्हतं. तेव्हा आजच्यासारखं मोबाईल, इंटरनेट नव्हतं, आणि आम्ही तर, ‘तेव्हाच्या कव्हरेज एरिया’च्याही पुरते बाहेर...
मग, नुसतंच, ‘आणीबाणी मुर्दाबाद’ असा मजकूर मोठ्या अक्षरात स्टेन्सिल करून स्क्रीनवर चिकटवला, आणि भराभरा पाचपन्नास प्रती काढून झाल्या... पुन्हा सगळं सामान गोणपाटाच्या पिशवीत भरून, पिशवी काखोटीला मारून आम्ही तिथून निघालो.
जाम मजा वाटत होती. काहीतरी वेगळं, थ्रिलींग आहे, हे जाणवत होतं.
पायथ्याच्या गावात आलो, आणि आसपास कुणी नाही याची खात्री करून घेत दोनचार पत्रकं शाळेच्या खिडकीतून आत टाकली...
पुन्हा गुपचूप चालू लागलो. देवरूखच्या दिशेने... पण गावात थांबायचं नव्हतं. एखादा ट्रक पकडायचा, आणि गावाला वळसा घालून पुढे जायचं, हे ठरलं होतं. पाटलांनी सगळा कार्यक्रम व्यवस्थित आखला होता.
रात्र झाली तेव्हा आम्ही धामणीच्या पुढे कुठेतरी उतरलो होतो. पुन्हा पिशव्या पाठीवर घेतल्या, आणि पलीकडे दिसणाऱ्या दाट डोंगराच्या दिशेने चालू लागलो.
दोन घाट्या ओलांडल्यावर झाडीत लपलेलं एक मोठं कौलारू घर दिसू लागलं. आम्हाला तिथेच जायचं होतं. पाटलांनी आमच्यासाठी त्या घराची निवड केली होती. गुप्त जागा. इथे आम्ही आमचं काम सुरू करणार होतो. कुणालाच आमचा सुगावा लागणार नव्हता.
घरात पोहोचलो, तेव्हा ते वयोवृद्ध गृहस्थ आमची वाटच पाहात झोपाळ्यावर बसले होते. पिशव्या पडवीच्या रेज्याला रेलून ठेवून आम्ही समोर खुर्च्यांवर बसलो. जुजबी चौकशा झाल्या, आणि थोड्या वेळाने जेवण तयार असल्याचा निरोप आला. मागीलदारी विहीरीजवळ त्यांनी आपल्या हाताने आमच्या हातापायावर पाणी घातले, ताजेतवाने होऊन आम्ही केळीच्या पानावर जेवायला बसलो. कुळथाचं खमंग पिठलं, आणि वाफाळलेला भात... डावीकडे झणझणीत लसणाची चटणी... अक्षरशः ताव मारला. तोवर नावं वगैरे सांगून झाली होती. माझं नाव ऐकताच त्यांनी- त्यांना आप्पा असे म्हणत- डोळे किंचित बारीक केले, आणि विचारलं, ‘म्हणजे तुमची जात कोणती?’
 मी सटपटलो. आपण सांगितलेल्या आडनावाची जात कोणती हे मलाही माहीत नव्हतं...
‘ नाही, तीच.. आम्ही गुजर’... आप्पांनी मान हलविली, आणि जेवण आटोपल्यावर खुणेनंच मला माझं पान उचलायला सांगितलं. मागोमाग मागीलदारी आले.
‘टाका तुमचं पान म्हशीच्या पुढ्यात’... ते म्हणाले. मी ओळखलं.
आपल्या आडनावामुळे आता इथलं वास्तव्य असंच असणार, मला जाणवलं. मी पान लांबूनच म्हशीच्या पुढ्यात टाकलं, आणि पाथरीजवळ आलो. आप्पांनी त्यांच्या हाताने माझ्या हातावर पाणी घातलं. हातपाय धुवून पुन्हा आम्ही आत आलो, आणि त्यांनी मागच्या पडवीजवळची एक खोली उघडून आम्हाला दिली. ‘इथे तुम्ही राहायचं. बाहेर पडायचं नाही. दिवसा कुणालाही कळता नये’... त्यांनी कडक आवाजात सूचना केल्या, आणि आम्ही तिघे मान हलवून खोलीत गेलो. आतून कडी लावली, आणि गोणपाटाची पिशवी उघडून पुन्हा मशीन जोडलं.
येतायेता पाटलांनी झोपाळ्यावरचं वर्तमानपत्र काखोटीला मारलं होतं. खोलीत गुपचूप वाचन झालं, आणि आणीबाणीचा अर्थ उलगडू लागला... लपून काम करणंच गरजेचं होतं, हे लक्षात आलं. आमचा निर्धार झालाच होता.
‘उद्यापासून आपलं काम सुरू झालं पाहिजे.’ पाटील म्हणाले...
... दुसरा दिवस उजाडण्याआधी आम्ही कामाला लागलो होतो. आणीबाणीच्या विरोधातील घोषणा तयार झाल्या होत्या. मी वेगळ्या अक्षरात त्या स्टेन्सिलवर उतरविल्या, आणि प्रती काढण्यास सुरुवात झाली. शंभर प्रतींचा एक गठ्ठा... तीनचार गठ्ठे दुपारी जेवणाआधी तयार झाले होते.
मग दुपारी पुन्हा आप्पांसोबत, जेवण आटोपलं. या पंक्तीत माझं आणि पाटलांचं पान थोडं बाजूलाच होतं. पण पानात पडणारं अन्न मात्र, सारखंच होतं. त्या काळातल्या वयोवृद्धांची मानसिकता आम्हाला ओळखीची होती.  काहीच वाटलं नाही. तो काळच तसा होता.
जेवणं आटोपल्यावर पुन्हा खोलीत जाऊन आम्ही आडवे झालो. काही वेळातच डाराडूर...
चार साडेचार वाजले असतील. बाहेरून आप्पा कडी वाजवत होते. ‘आहो जोग, गुजर, उठा’... आम्हाला ऐकू येत होतं. पण ते आपल्याला कुठे उठवतायत, असं वाटून आम्ही उठलोच नाही.
आडनावं आम्हालाही नवीनच होती ना...
अखेर आप्पा वैतागले... ‘आणि म्हणे, कामं करणार’... असं काहीतरी बडबडले, आणि आम्ही ताडकन उठलो. बाहेर आलो. झोपाळ्यावर आप्पा बसले, आणि आम्ही समोरच्या खुर्च्यांत बसलो.
चहा झाला. मी माझा कप विसळून मागच्या पडवीत एका बाजूला उलटा घालून ठेवला. चंदूचा कप आपल्यासोबत घेऊन आप्पांनी झोपाळ्याजवळ ठेवला.
संध्याकाळ उलटू लागली, आणि पाटलांनी खुणावलं. आम्ही बाहेर पडलो. एका पिशवीत ते गठ्ठे होते.
गोवा रोडवर येईपर्यंत काळोख झाला होता. आम्ही चालू लागलो. तोंडाला मफलर गुंडाळून संगमेश्वर स्टँडवर आलो, आणि मुंबईकडे जाणाऱ्या दोनचार गाड्यांमध्ये गुपचूप कंडक्टरच्या डोक्यावरल्या कॅरियरमध्ये एकएक गठ्ठा टाकून पसार झालो.
आपण काय केलंय हे दुसऱ्या दिवशी आम्हाला समजलं.
चिपळुणात गदारोळ झाला होता. एस्टी गाड्यांमध्ये कुणीतरी आणीबाणीविरोधी पत्रकं टाकल्याची वार्ता तोवर सगळीकडे पसरली होती. आता काय होणार, याची कुजबूज सुरू झाली होती.
आम्हाला हे कळलं, आणि मजा वाटली.
अज्ञातवासातले दिवस सुरू झाले होते. घरी बहुधा निरोप पोहोचला होता. आता दिवसभर आप्पांच्या घरात मागल्या पडवीशेजारच्या बंद खोलीत पत्रकं सायक्लोस्टाईल करायची, गठ्ठे बांधायचे, आणि रात्री संगमेश्वर, कधी चिपळूण गाठून एस्टीत टाकून यायचं, एवढंच काम आम्हाला होतं. आम्हाला ते आवडलंही होतं.
काही दिवस आप्पांच्या घरी राहिल्यावर बाहेरची कुजबूज वाढली होती. कुणीतरी आसपासचीच माणसं हे करतायत, असा संशय पसरू लागला होता. अशातच, आम्ही त्या भागात नवखे असल्याने, स्टँडवरच्या काही नजरा उगीचच संशयाने पाहातायत असा भास आम्हालाही होऊ लागला होता. तोंडाला मफलर वगैरे बांधला तर आणखीनच संशय वाढणार होता.
मग मुक्काम हलवावा असं ठरलं, आणि आम्ही एका भल्या पहाटे, उजाडण्याआधी बाहेर पडलो. आप्पांच्या पायाला हात लावून नमस्कार केला, आणि मी म्हणालो, ‘आप्पा, माझं नाव गुजर नाही... मी गुणे’...
आप्पा एकदम गहिवरले. माझ्या पाठीवर मायेनं हात फिरवला, आणि त्यांनी तोंड भरून आशीर्वाद दिला.
‘यशस्वी भव!’
… आम्ही पुढच्या मुक्कामासाठी त्या जंगलातल्या एकांतातून बाहेर पडलो.

(चित्र सौजन्य- लोकसत्ता)

भाषेचे जगणे-मरणे...

एका ज्येष्ठ पत्रकार मित्राची अचूक मराठी’वरील एक नोंद वाचली आणि त्यांची तळमळ अस्वस्थ करून गेली. मराठीच्या चिंधड्या उडविण्याची स्पर्धा स्वजनांकडूनच सुरू असून माध्यमे- विशेषत: चित्रवाणी माध्यमे- त्या स्पर्धेत हिरीरिने उतरलेली दिसतात.
त्या नोंदीमुळे मग एक स्वगत -चिंतन- होऊन गेले. सहज वाटलं, हा तर अपरिहार्य बदलाचा प्रभाव आहे.
बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. हे एकदा मान्य केले की आपोआपच बदल स्वीकारायची मानसिकता तयार होते. आणि आपण कसे बदलत गेलो तेही लक्षातदेखील येत नाही. फार पूर्वी, सातआठ पिढ्यांपूर्वी आपल्या घरातील पुरुष मंडळीचा पंचा उपरणं पागोटं असा वेश असायचा, बायका लुगडं नेसायच्या. काळाबरोबर बदल होत गेला, आणि पंचाउपरण्याची जागा धोतर सदऱ्याने घेतली. कालांतराने समाजातच सुधारणा होऊ लागली, विकास होऊ लागला, पायी चालण्याऐवजी मोटारी दिसू लागल्या, आणि सदऱ्यावर कोट आला. वहाणांची जागा चप्पल ने घेतली. काळ आणखी बदलला. धोतर कोट सदऱ्याची जागा ‘पॅंट शर्ट’ने घेतली, चप्पलऐवजी ‘बूट’ आले. पुढे ‘सूट’ आला, पायात ‘शूज’ आले, गळ्यात ‘टाय’ आला, डोक्यावर ‘कॅप’ आली. आता ‘ब्लेझर्स’ वगैरे वापरतो...
हा केवळ वेषातला बदल आहे असे वरवर वाटत असले तरी ते तेवढेच नाही.
मराठी भाषा या वेषाबरोबरच कशी बदलत गेली, त्याचं प्रतिबिंबही या बदलातून दिसतं.
भाषेच्या विकासाची प्रक्रिया सुमारे ७० हजार वर्षांपूर्वी सुरु झाली. तेव्हा फक्त वर्तमानकाळाची भाषा होती. पुढे तीस हजार वर्षांनंतर भूतकाळाची भाषा आली. आता आपण भविष्यकाळाच्याही पुढची भाषा बोलत आहोत, म्हणून मराठीचं काय होणार याची कधीकधी चिंता व्यक्त होते.
काही महिन्यांपूर्वी कधीतरी, *पुण्याच्या* एका एफ्. एम्. स्टेशनवर ‘सलग ३० सेकंद मराठीत बोलून दाखवा’ अशी स्पर्धा घेत होते. *पुण्यात*!
कुणीही बोलू शकले नाही, असं मला कळलं!
मराठीत इंग्रजीची मोठी घुसखोरी झाली आहे.
मागे एकदा, १४ सप्टेंबर २०१५ या दिवशी दुपारी बारा-साडेबारा वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर एक भाषण ऐकलं. मराठीतून होतं. ते मी ऐकता ऐकता लिहून घेतलं.
“बाॅडी आणि माईंड यांच्यावर नाॅईज पोल्यूशनचा डायरेक्ट ॲडवर्स इफेक्ट होत असतो. म्हणून लहान मुलांच्या एरियातील नाॅईज पोल्यूशनचे नाॅर्म्स स्ट्रिक्ट असायला हवेत. या सगळ्याचा विचार करून सायन्स रिलेटेड काही गाईडलाईन्स आहेत, ज्या ॲक्ट्व्हिस्टसनी थरो रिसर्च करून चाॅकआऊट केल्या आहेत. रेसिडेन्शियल एरियाला किती नाॅईज एक्स्पोजर असायला हवेत त्याचा सीरियसली विचार करायला हवा. इन शाॅर्ट, नाॅईज पोल्यूशनला लाईटली घेऊन चालणार नाही. कारण ते हेल्थ हजार्ड आहे. इररिव्हर्सिबल हियरिंग  लाॅस झाला नाही तरी बरेचसे ॲडव्हर्स इफेक्टस होऊ शकतात हे सायन्सने सिद्ध केले आहे.”
...नंतर हे मी एका मित्राला ऐकवलं. त्याने खांदे उडवले. तो म्हणाला, इट हॅपन्स! ॲट टाईम्स मराठी वर्ड रिमेम्बर करायला डिफिकल्ट जातं!
भाषाप्रदूषण. मराठी मरणार नाही, पण प्रदूषित होणार.
या पार्श्भूमीवर मला भाषातज्ञ गणेश देवींचं एक वाक्य कायम आठवतं-
“भाषा कधी मरत नसते. ती मारली जाते- भाषा टिकवणे आपल्या हातात नसेल पण ती मारून टाकू नये. कारण भाषा आपण निर्माण केलेल्या नाहीत. त्यामुळे त्या मारण्याचा अधिकार आपल्याला नाही.”
भाषा जगविणे म्हणजे ती भाषा बोलणारे लोक जगविणे. आपण स्वत:ला तसे जगविले तर भाषा मरणार नाही.
फक्त सध्या आपण भाषा मारतो आहोत की समृद्ध करत आहोत याचा विचार करायला हवा. अर्थात आज एकाच भाषेवाचून काही अडत नाही अशी स्थिती असल्याने आपण भाषेच्या अस्मितेची फार चिंता करत नाही.

Wednesday, June 24, 2020

अश्रूंना जेव्हा पाने पुसतात...



कोकण आणि मुंबईच्या माणसांमध्ये एक साम्य आहे. ही माणसं परिस्थितीपुढे हतबल होत नाहीत असं 'नेत'मंडळी अभिमानाने सांगतात. मुंबईसाठी त्यांनी या मानसिकतेला एक नाव दिलंय... मुंबई स्पिरीट! ...कोकणातही हेच स्पिरीट आहे असं ही मंडळी म्हणतात. काहीही झालं, तरी मन खचू द्यायचं नाही. परिस्थितीपुढे गुडघे टेकायचे नाहीत, उलट, आलेल्या परिस्थितीस खंबीरपणे तोंड द्यायचं, आणि नव्या दिवसाला सामोरं जायचं, ही ती मानसिकता! या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या विनाशकारी निसर्ग वादळानंतर कोकणच्या किनारपट्टीवरील कित्येक गावं अक्षरशः होत्याची नव्हती झाली. पुरती उद्ध्वस्त झाली. जंगलं जमीनदोस्त झाली. पिढ्यापिढ्यांनी आपल्या घामाचं शिंपण करून वाढविलेल्या नारळी-पोफळीच्या, आंबे-काजूच्या बागा जमीनदोस्त झाल्या. अंगणाला घनदाट सावली देणारी फणसाची झाडं उन्मळून पडली, आणि उजाडपणामुळे घरंदारं भकास झाली. माणसांच्या मनावर  उदासीनतेचे ओरखडे उठले, आणि कोणत्याही संकटकाळात घडतं, तसंच इथेही घडून गेलं. चारदोन राजकीय नेत्यांनी घाईघाईने कोकणातील किनारी गावांचे दौरे आखले आणि उरकले. संकटग्रस्तांच्या पाठीवर हात फिरवितानाचे, त्यांचे अश्रू पुसतानाचे फोटो काढले, त्याचा गाजावाजा केला, आणि मुंबईला परतल्यावर कोकण स्पिरीटचं कौतुक सुरू झालं...

... एवढं अस्मानी संकट कोसळलं, तरी कोकणवासी डगमगलेला नाही. आत्महत्येचा विचारही त्याच्या मनाला शिवत नाही, आणि सरकारी मदतीसाठी तो कधीच कुणापुढे हातही पसरत नाही. तो रडतकुढत नाही... उभं आयुष्य उद्ध्वस्त होऊनही त्याची उमेद खचलेली नाही, अशा स्तुसिसुमनांचा वर्षाव सुरू झाला, आणि हा साधाभोळा  माणूस, दुःखाचे डोंगराएवढे ओझे डोक्यावर असतानाही, उगीचच भारावून गेला. पुन्हा उभं राहिलं पाहिजे, ही जिद्द त्याच्या कोसळलेल्या मनात जागी होत आहे, हे त्या, फुलं उधळणाऱ्यांनी ओळखलं, आणि कोकणावर निसर्गाने घातलेल्या घाल्याचं संकट विसरून शहरांतले नेहमीचे व्यवहार सुरू झाले.

त्याआधी काही दिवस, पश्चिम बंगालमध्येही वादळाचा जोरदार तडाखा बसला होता. उभ्या देशाने त्याची गंभीर दखल घेतली. त्या संकटग्रस्तांसाठी मदतीचे हजारो हात पुढे आले. माध्यमांनी तर मदत उभी करण्यासाठी मोहिमा चालविल्या. अजूनही एखाद्या राष्ट्रीय वाहिनीवर पश्चिम बंगालच्या उद्ध्वस्त अवस्थेची बेचैन करणारी छायाचित्रे दिसतात. आवाहनांचा सूर आळवला जातो.

आणि कोकणची माणसं कशी खंबीर आहेत, त्यांनी संकटाला कसं धीरानं झेललं आहे, याचे कौतुकसोहळे दुसरीकडे समाजमाध्यमांवर साजरे केले जातात. तसेही, कोकणाची दखल घ्यावी असं कधी कुणाला वाटत नसतंच. हे खरंच आहे, की सामान्य परिस्थितीत कोकणातला माणूस कुणापुढेच हात पसरत नाही. आपल्या समस्यांचे रडगाणे जगासमोर गात नाही, आणि त्याचे भांडवल न करता, एकमेकांच्याच आधाराने पुन्हा उभे राहण्यासाठी धडपडतो.

यावेळीही तसे होईलच. पण मुद्दा तो नाही. एवढ्या भीषण संकटानंतरही, इथल्या व्यथा-वेदनांची गंभीर दखल घेण्याची मानसिकता का नाही, हा मुद्दा आहे. मुंबईतील मराठी माणूस हा मराठी वर्तमानपत्रांचा आधारस्तंभ म्हणावा असा वाचक-आधार आहे. पण पश्चिम बंगालातील वादळाच्या परिस्थीतीस मिळाली एवढीदेखील जागा दुर्दैवाने कोकणातील वादळाला का मिळाली नाही, हा प्रश्न उद्या नक्कीच विचारला जाईल.
स्वतःस लोकशक्ती समजणाऱ्या एका वर्तमानपत्राची दुसरी बाजू या निमित्ताने समोर आली पाहिजे. एखाद्या वर्तमानपत्रास लोकमान्यता कशामुळे मिळते?... उत्तर साधे आहे. जेव्हा ते वर्तमानपत्र आपले आहे, असे लोकांना वाटते, तेव्हा...!  तीन जूनला कोकणात निसर्ग वादळाने अभूतपूर्व हैदोस घालून कोकणच्या निसर्गाचे पुरते तीनतेरा वाजविले. त्यानंतर या लोकशक्तीने त्या बातमीची एक जेमतेम टिकली आपल्या बारा पानांच्या एका बाजूला कागदावर उमटविली. ही भीषण स्थिती संवेदनशीलतेने समाजासमोर मांडावी, समाजाच्या, सरकारच्या संवेदनांना आणि जबाबदाऱ्यांना जागे करावे, अशी जबाबदारी त्या वर्तमानपत्राने पाळली का, हा प्रश्न विचारायलाच हवा. कारण, हा केवळ बातमीला मिळणाऱ्या जागेपुरत्या चर्चेचा मुद्दा नाही, तर मानसिकतेचा मुद्दा आहे. माणसं मेली तरच संकट गंभीर आहे, असे मानण्याची मानसिकता. कोकणाच्या सुदैवाने या संकटातही मोठी जीवितहानी झाली नाही. त्यामुळे संकटाचे गांभीर्य  नजरेआड करावे, ही ती मानसिकता. मृत्युसंख्येनुसार बातम्यांना जागा मिळते, असा सर्वसाधारण समज असतो. तसा वाचकांचाही अनुभव आहे. तिकडे जगाच्या पाठीवर कुठे काही घडले, आणि चारदोन मृत्यू झाले, तरी त्याची बातमी देण्याचा उतावीळपणा या लोकशक्ती म्हणून मिरविणाऱ्यांमध्ये लपून राहिलेला नाही. अधूनमधून दिसणाऱ्या तशा बातम्यांनी ते दाखवून दिले आहे. म्हणून, मृत्यूसंख्येनुसार बातमीचे मूल्य ठरविण्याच्या मानसिकतेचा फटका कोकणच्या संकटकाळात बसला असावा असा संशय येऊ शकतो. ३ जून रोजी या लोकशक्तीच्या मुंबई आवृत्तीत निसर्ग संकट या मथळ्याखाली, या संकटाचा इशारा देणारी एक कोरडी, मुख्य बातमी झाली, आणि बातमी चुकवू नये, या पत्रकारितेच्या मूल्याची जेमतेम जपणूक झाली. ३ जूनला निसर्ग वादळाने कोकण किनारपट्टीवर अक्षरशः हैदोस घातला. कोकणाचे हिरवे सौंदर्य पुरते धुवून टाकले, आणि पुढच्या किमान दोन दशकांचे भविष्यही पुसून टाकले. प्रचंड हानी झाली. अक्षरशः विध्वंस झाला. जिवाच्या आकांताने स्वतःस आणि पाळळेल्या जनावरांस सांभाळत कोकणी माणसाने कसेबसे स्वतःस वाचविले, आणि भकास वर्तमानाकडे निराशेने पाहात त्याने ती अंधारमय रात्र काढली. दुसरा दिवस उजाडला, तेव्हा या विनाशाचे विषण्ण रूप त्याच्यासमोर साकळलेले होते, आणि या लोकशक्तीने, निसर्ग संकट टळले, वगैरे मोघम मथळा देऊन दुसऱ्या दिवशीचे कर्तव्य त्रयस्थपणे पार पाडले. आयुष्ये उद्ध्वस्त करून होत्याचे नव्हते करून सोडणाऱ्या संकटांच्या बातम्यांवर मनाच्या ओलाव्याचे शिंपण केले, तर संकटाबाहेरच्या मनांना माणुसकीचे कोंब फुटतात, असा अनुभव आहे. ही कोरडीठाक बातमी त्या दिवशी ज्यांनी वाचली असेल, त्यांना मात्र, संकट टळले, एवढाच बोध त्यावरून झाला असेल यात शंका नाही. पुण्याच्या कुणा प्रतिनिधीने दिलेली पावसाची एक तांत्रिक बातमी विस्ताराने वापरून या स्वयंघोषित लोकशक्तीने निसर्ग संकटाची बोळवण केली, आणि कोकणातील विध्वंसाची जाणीव वाचकांपर्यंत पोहोचलीच नाही. महाराष्ट्राचे नंदनवन असलेला हा प्रदेश जेव्हा उजाड उजाड होऊन भविष्यभयाच्या भयाण जाणिवेने कोलमडून गेला होता, त्या दरम्यान ही लोकशक्ती अग्रलेखाच्या जागेवरही शिक्षणाचा ऊहापोह करत होती. या भयाण संकटाचे वारेदेखील या पानाला शिवले नव्हते, ही दुःखद वस्तुस्थिती सर्वांसमोर आहे. मुंबई, पनवेल, नवी मुंबई, नेरूळ, वसई, ठाणे या परिसरातील जेमतेम छायाचित्रांनी पान भरून आणि कोकणच्या किनारी गावांतील विध्वसांकडे डोळेझाक करून या वर्तमानपत्राने कोकणवासीयांच्या अश्रूंनाच पाने पुसून टाकली.


निसर्ग वादळामुळे विजेचे जवळपास तीन हजार खांब उन्मळून पडले. वादळाने केवढा परिसर कवेत घेतला असावा, याचा अंदाज येण्यासाठी हा आकडा महत्वाचा आहे. साधारणतः पन्नास ते शंभर मीटरवर एक खांब असतो, असे गृहीत धरले, तर किमान दीडशे किलोमीटरच्या परिसराचा वादळाने विध्वंस केला, हे या आकड्यावरून दिसते. या ठिकाणी पुढचे किमान दोन महिने, ऐन पावसाळ्यात वीजेविना राहावे लागेल हे स्पष्ट आहे. अशा वेळी, अंधारात चाचपडणाऱ्या संकटग्रस्तांना पावलापुरता प्रकाश मिळावा यासाठी काही संवेदनशील मने मदत गोळा करू लागली. काही राजकीय पक्षांनी मदतीचे सामान भरलेले ट्रक संकटग्रस्त कोकणात पाठविण्यासाठी रवाना केले. पण, ती मदत खऱ्या गरजवंतांपर्यंत पोहोचली किंवा नाही, याची दखल मात्र घेतली गेलीच नाही.

प्रत्यक्ष संकटातही कानाडोळा करणाऱ्या आत्ममग्न वर्तमानपत्रांना तर याची गरज वाटणार नाही हे सहाजिकच होते...

हे खरे आहे, की करोना नावाच्या जागतिक संकटाने सर्वांस घेरले आहे. ते संकट सर्वांसमोरच आहे. तसेच, या आपत्तीचा फटका बसलेल्या कोकणवासींसमोरही आहे. उलट, त्यांना करोनासोबत या नव्या आपत्तीचे संकट झेलावे लागणार आहे. राज्य सरकारने रायगड जिल्ह्यातील हानीसाठी तातडीची काही मदत जाहीर केली, अन्य नुकसानग्रस्त भागांवरही संवेदनशीलतेची फुंकर मारल्यासारखे केले, पण निसर्ग वादळाने डोळ्यात गोळा केलेल्या आपत्तीचे अश्रू पुसण्यास ही संवेदनशीलता पासंगालाही पुरणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. नारळी-पोफळी आणि आंबे-काजूंची उद्ध्वस्त झाडे उचलून जागांची साफसफाई करण्याचीही उमेद कोकणातील संकटग्रस्त माणसास राहिलेली नाही. त्याच्या हातात आत्ता तरी ती ताकद उरलेली नाही. कारण तो मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. आपल्या हातांनी वाढविलेले जपलेले एकएक झाड जमीनदोस्त झाल्याच्या वेदना सहन करणे त्याला कठीण जात आहे. आसपास पसरलेले विनाशाचे चित्र विषण्ण करणारे असले, तरी त्या पसाऱ्याकडे अस्वस्थपणे पाहात बसण्यापलीकडे त्याच्या हातात काहीही उरलेले नाही. कारण, कोसळलेली झाडे उचलून पसारा आवरण्याकरितादेखील ही मदत पुरेशी नाही. उन्मळून पडलेल्या झाडांमुळे अक्षरशः हजारो ट्रक भरून गोळा होतील एवढी लाकडे असूनही, कवडीमोलानेही ती उचलण्यास कुणी तयार नसल्याने या भकास पसाऱ्यात कोकणातील संकटग्रस्त माणसे उदासपणे वावरत आहेत. या संकटात होरपळलेल्या एखाद्या माणसाशी संवाद सादला, तर त्याच्या आवाजातूनही अश्रू ओघळतात, असा भास व्हावा... ते जाणण्यासाठी संवेदना असावयास हवी. लोकमान्य समजणाऱ्यांनी तीच खुंटीवर टांगली, आणि या भीषण संकटाची सावलीदेखील आपल्याला शिवणार नाही, याचीच जणू खबरदारी घेतली. असे का झाले असावे हे अनाकलनीय आहे.

किनारी कोकणाचे सौंदर्य पुन्हा प्रस्थापित करण्यास संकटग्रस्त कोकणवासीयांना पुढची किमान पंचवीस वर्षे जिवाचे पाणी करावे लागणार आहे. म्हणजे, एका पिढीचे पूर्ण परिश्रम त्यासाठी त्यांना जमिनीत अक्षरशः गाडावे लागतील. निसर्ग वादळाने किनारपट्टीच्या निसर्गाची हानी केलीच, पण निसर्गामुळेच नुकताच उभारी घेऊ लागलेला पर्यटनाचा व्यवसायही पुरता पुसून टाकला. म्हणजे, शेकडो कुटुंबांच्या चरितार्थाच्या साधनांवरच पाणी फिरविले. कोकणच्या अर्थव्यवस्थेचा सारा कणाच निसर्गावर निर्भर होता. तोच पुरता मोडला आहे. अर्थकारणावर तावातावाने चर्चा करून जगास शहाणपणाचे डोस पाजावेत, एवढे तरी या निमित्ताने लोकशक्ती माध्यमांना  वाटले असते, तरी तो एक मानसिक आधार ठऱला असता. पण ते पुण्य साधण्याची संधीच या माध्यमाने गमावली. मानसिकतेमुळे संकेतांना कसा कळत नकळत हरताळ फासला जातो, त्याचे हे उदाहरण... कोकणावर अन्याय करून ही मानसिकता घोर पापाची धनी ठरली आहे. पश्चात्तापानेदेखील ते पाप पुसले जाणार नाही.

कोकणवासी या मानसिकतेमुळे व्यथित आहेत, एवढे सांगण्यासाठीच हा प्रपंच... बाकी आमचे आम्ही पाहून घेऊ. पुन्हा उभे राहू तेव्हा तुम्ही कुठे असावे हे आम्ही ठरवू. एवढी धमक कोकणवासी नक्की दाखवेल...!

- दिनेश गुणे