Sunday, September 20, 2020
एका शुद्ध 'श्वासा'साठी...
Saturday, September 19, 2020
‘नजर’ आणि ‘दृष्टी’ !
‘नजर’ ही काळानुरूप बदलणारी बाब आहे. वयासोबतही नजर बदलते. बहुतांश वेळा अंधुक होते. त्यावर उपाय म्हणजे, चष्मा! नजर स्वच्छ रहावी म्हणून चष्मा लावायचा असला, तरी अनेकदा चष्म्यानुसार नजर बदलते. म्हणजे, जसा चष्मा असेल तसे त्यातून सभोवतीचे दिसते. ही एक गंमत असते. म्हणून ‘ओरिजिनल’ नजर जपण्यापेक्षा, चष्मे बदलावेत आणि नव्या चष्म्यामुळे मिळणाऱ्या नव्या नजरेतून सभोवताल बघावे यावर अलीकडे वाढता कल दिसून येतो. म्हणून चष्म्यांचा खप वाढलेला दिसतो.
चष्म्याची खरेदी हा नजरेसोबतच खिशालाही खेळविणारा खेळ असल्यामुळे जगप्रसिद्ध ब्रॅंडसप्रमाणेच, फूटपाथवर जुनेपुराणे, वापरलेले चष्मेदेखील विकणारे चष्मेवाले दिसतात. काही चष्मे निवडण्याआधी नजरेचा नंबर तपासतात, तर काहीजण चष्मा डोळ्यावर चढवून नजरेला सुटेबल असा चष्मा निवडतात. असो.
माझा चष्मा आता जुना झाला आहे. सुमारे आठ वर्षांपूर्वी साडेचार हजाराला घेतलेल्या त्या चष्म्याची नजरेला सवय झाली आहे. अजूनही काळ पुढे जाऊनही, नजरेने आणि चष्म्याने कुरकूर केलेली नाही. त्यामुळे त्याच काचांमधून अजूनही सर्व काही स्वच्छ दिसते, पाहाता येते. नजरही बऱ्यापैकी शाबूत आहे त्यामुळे चष्मा बदलावा, नवा घ्यावा असे वाटलेच नाही.
पण आजकाल वातावरणातील बदल, परिस्थितीतील बदल, हवामानाचे चढउतार आदी अनेक कारणांचा नजरेनर परिणाम होत असल्याने दृष्टी अधू होण्याची शक्यता असते. विशेषत: बालवयात दृष्टीविकार वाढत चालल्याचे काही निष्कर्ष अलीकडे पाहण्यातून काढले गेले आहेत. राज्याच्या आदिवासी समाजातील आठ टक्के म्हणजे सुमारे नऊ लाख शाळकरी मुलांमध्ये दृष्टिदोष आढळल्याने त्यांना मोफत चष्मे देण्याचा निर्णय सुमारे सहा महिन्यांपूर्वी राज्य सरकारने घेतला होता. त्यासाठी २० कोटींची तरतूदही करण्याचे जाहीर केले होते. हा चष्मा प्रत्येकी २५ रुपयास पडेल, असे कळते. म्हणजे, ५० हजारांत दोन हजार मुलांना चष्मे मिळतील. पण किंमत महत्वाची नाही. त्या मुलांना वेळेवर चष्मे मिळाले तर त्यांचा दृष्टिदोष दूर होऊन नजर स्वच्छ होईल, त्यामुळे या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी सुरू व्हायला हवी होती. किती मुलांना याचा लाभ झाला ते स्पष्ट झालेले नाही, पण चष्मा ही त्यांची गरज आहे हे स्पष्ट आहे.
अर्थात, एकदा मिळालेल्या चष्म्यातून सभोवतीचे आकलन होण्याइतकी नजर सुधारली तरी त्यांच्यासाठी ते खूप आहे. न्यायाधीशांना चष्मे दर वर्षी बदलावे लागतात. त्यांच्यासाठी दृष्टी ही मौल्यवान आणि महत्वाची बाब आहे. म्हणूनच त्यांना नवे चष्मे देणे ही राज्य सरकारची बांधिलकी ठरते. या बांधीलकीच्या भावनेतूनच, न्यायाधीशांना चष्म्यासाठी वर्षाकाठी ५० हजार रुपये देण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले.
सध्याच्या परिस्थितीत हा खर्च अनाठायी ठरेल असा आक्षेप काहींनी घेतला असला तरी सरकारची भूमिका स्पष्ट आहे. न्यायदेवतेची नजर स्वच्छ असणे ही काळाची गरज आहे. ती आंधळी असते, हा भावनात्मक गैरसमज आहे.
म्हणून चष्म्याचे महत्व अधोरेखित होते!!
Sunday, September 6, 2020
‘करोना’ की ‘कंगना’?
टीव्ही चॅनेलांचा बूम समोर आला की संजय राऊत कंगनाचा उद्धार सुरू करतात. मग चॅनेलवाल्यांनाही चेव चढतो, आणि कंगनाच्या निमित्ताने प्रश्न, चर्चा सुरू होतात.
संजय राऊत हे सध्या चॅनेलवाल्यांसाठी मोस्ट ॲक्सेसिबल आणि ईझिली ॲव्हेलेबल न्यूज सोर्स आहेत. कारण त्यांच्यामुळे चॅनेलींना विनासायास, बसल्या जागी बातम्यांचा खमंग मसाला मिळतो.
करोनाची महामारी कव्हर करणे हा जिवाशी खेळ असल्याने त्यासंबंधीच्या बातमीमागे धावण्याची शक्ती आणि, खरे म्हणजे, हमखास सुरक्षिततेच्या सुविधाही, चॅनेलींच्या प्रतिनिधींकडे नाहीत.
करोना सोडून कंगनाचे कव्हरेज हा सोयीचा पर्याय चॅनेलींनी निवडला व तोच लोकांच्या माथी मारण्यास सुरुवात केली, ती त्यामुळेच.
कंगनाचा वाद हातातून सोडून दिला, तर कव्हर करायला करोनाशिवाय दुसरे काहीच हातात उरणार नाही. प्रेक्षक या कंगनावादास कंटाळले असले तर वाहिन्यांच्या मर्यादांमुळे तोच वाद प्रेक्षकांच्या माथी मारावा लागतोय.
त्यामुळेच, संजय राऊत समोर सहजपणे हजर असताना एकाही चॅनेलमधील हरीचा लाल त्यांना हे विचारण्याचे धाडस का करत नाही, की, ‘खासदार साहेब, कंगनापेक्षा सध्या करोनाचा कहर ही मोठी समस्या असताना तुम्ही त्यावर अवाक्षरही का काढत नाही? राज्यासमोरची सर्वात मोठी समस्या कोणती ?
‘करोना’ की ‘कंगना’??
Sunday, August 30, 2020
बाबांना विचारा...
“विचारा... विचारा... माझ्या बाबांना सगळं माहीत आहे!”...
चमकदार डोळ्यांची ती चिमुरडी मिश्किल सुरात मला जणू आव्हान देत होती, आणि मागच्या बाजूला आरामखुर्चीत बसून वर्तमानपत्र वाचणाऱ्या तिच्या बाबांकडे मी पाहिलं.
चष्म्याच्या काचेच्या कोपऱ्यातून आमच्याकडेच चोरून पाहणाऱ्या तिच्या बाबांच्या डोळ्यात भीती उमटली असावी असं मला उगीचच वाटून गेलं, पण तोवर तिचे बाबा सावरले असावेत.
मी त्यांच्याकडे बघून आदराने एक हलकेसे स्मितहास्य केले, आणि आरामखुर्चीत बसलेले तिचे बाबा पुन्हा कावरेबावरे झाले.
‘आता खरंच हा आपल्याला काहीबाही विचारणार’ अशी शंका त्यांच्या डोळ्यात स्पष्ट उमटली, आणि वर्तमानपत्राचा कागद आपल्या चेहऱ्यावर ओढून घेत त्यांनी तोंडच लपविले.
मिश्किल डोळ्यांची ती मुलगी अजूनही खट्याळ हसत माझ्याकडे पाहातच होती.
जणू बाबांना खरंच सगळं माहीत आहे का याची परीक्षाच घ्यायचे तिने ठरवले असावे.
पण बाबांनी पेपराआड चेहरा लपविल्याचे माझ्या लक्षात आले होते.
मुलीच्या मनातील बाबांच्या प्रतिमेस तडा जायला नको म्हणून मी गप्प बसणेच पसंत केले.
पण तिच्या ‘सगळं माहीत असलेल्या’ बाबांना एक प्रश्न विचारावा, असे मनात आलेच होते.
परीक्षा न घेता मुलांना पास करता येणार नाही या कोर्टाच्या निकालावर सगळं माहीत असलेल्या बाबांनी काहीतरी बोलावे, असे मला वाटत होते.
पण बाबांचे आमच्याकडे लक्षच नव्हते. ते पेपरातच डोकं खुपसून बसले होते.
‘जाऊ दे... तुझे बाबा पेपर वाचतायत.. नंतर कधीतरी विचारीन !’ त्या चिमुरडीकडे कौतुकाने पाहून मी म्हणालो, आणि ती काहीशी हिरमुसली होऊन माजघरात पळाली!
पुढे दोनतीन दिवसांनी पुन्हा एकदा असाच, सहज त्यांच्याकडे गेलो, पण ती चुणचुणीत चिमुरडी पुढे आलीच नाही.
बाबाही नेहमीप्रमाणे पेपरात तोंड खुपसून आरामखुर्चीत बसले होते.
मी बाहेर पडलो.
दरवाजाबाहेर अंगणात एक चुणचुणीत मुलगा गोट्या खेळत होता.
माझ्याकडे बघून तो मिश्किल हसला.
बहुतेक त्या चिमुरडीचा मोठा भाऊ असावा.
मी त्याच्याजवळ गेलो, आणि गोट्या खेळायचं थांबवून उभा राहात उलट्या मनगटाने कपाळावरचे केस मागे सारत तो माझ्याकडे पाहून पुन्हा मिश्किल हसला.
‘काय रे, तुझी बहीण कुठे आहे?’ मी विचारले.
‘असेल घरात बसलेली...’ तो काहीसा बेफिकीरीने म्हणाला.
‘पण मी आत्ताच जाऊन आलो, दिसली नाही... आलीच नाही पुढे. नाहीतर आपणहोऊन येऊन सांगायची, “विचारा विचारा... माझ्या बाबांना सगळं माहीत आहे”...
“आता ती असा आगाऊपणा करणार नाही!” गंभीर होत दरवाजातून आत पाहात तो म्हणाला.
“का रे? काय झालं?” मी.
“त्या दिवशी बाबांनी तिला चांगलं झापलंय. येईलजाईल त्याला म्हणायची, विचारा विचारा... माझ्या बाबांना सगळं माहीत आहे... मग बाबांचा प्राॅब्लेम व्हायचा ... म्हणून बाबांनीच तिला सांगितलं, की, कुणी आलं की बाहेर यायचं नाही. माजघरात बसून अभ्यास करायचा... तेव्हापासून ती येत नाही!”...
एवढं बोलून पुन्हा खाली बसून त्याने लांबवरच्या एका गोटीवर नेम धरत बोटं ताणली.
मी एकवार कौतुकाने त्याच्याकडे पाहिलं, आणि रस्ता धरला!
Saturday, August 1, 2020
एका अमर दंतकथेची अखेर!
‘व्हिजन’वास!
मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे एक बरे असते. त्यातून काहीही मनोरंजनात्मक मिळाले नाही तर त्याचा प्रेक्षक निराश होत नाही. ‘टाईमपास झाला’ असा विचार करून रिकामा वेळ कसातरी घालविल्याच्या समाधानात पुढच्या कार्यक्रमाकडे वळतो. ज्यांना माहिती हवी असते, ते मात्र अनेकदा निराश होऊन, पुढच्या कार्यक्रमात तरी माहिती मिळेल या अपेक्षेने टीव्हीसमोर बसतात. ही एक प्रकारे निराशा पचविण्याची कसोटीच असली तरी माहिती मिळविण्याची आसक्ती एवढी प्रबळ असते, की त्यापुढे ते नाराश्यदेखील कस्पटासमान ठरते.
प्रेक्षकांची हीच मानसिकता नेमकी ओळखून सध्याच्या काळात ज्यांची गरज आहे असे कार्यक्रम आखणे हे एक प्रकारे ‘व्हिजन’ असते. वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रम पाहताना थोडे खोलात जाऊन प्रत्येक कार्यक्रमाचे विश्लेषण केले, तर या ‘व्हिजन’ मागील ‘दृष्टी’ अंधुकपणे दिसू शकते.
मनोरंजन वाहिन्यांची जागा वृत्तवाहिन्या व्यापतील अशी शंका आधीपासूनच माध्यविश्वात व्यक्त होत होती, आता ती वास्तवात येऊ लागली आहे.
कारण, एकूणातच, माध्यमविश्व हे ‘व्हिजनरी’ असावेच लागते!
Friday, July 31, 2020
हाच का सन्मान?
अर्थात त्या वेळी तुरुंगवास भोगलेल्या सर्व योद्ध्यांनी या योजनेचा लाभ उकळलेला नाही. आणीबाणीच्या काळात लोकशाहीसाठी आंदोलन करून तुरुंगवास भोगलेल्या हयात व्यक्तींपैकी ज्यांना खरोखरीच गरज आहे अशा गरजवंतांनी सरकारकडे अर्ज करून आणूबाणीविरोधी लढ्यात लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी तुरुंगवास भोगल्याचे सप्रमाण पुरावेही सादर केले होते अशा व सध्या मानधन मिळाल्याने जगण्यास हातभार लागेल अशा गरजू व्यक्तींना दरमहा सुमारे दहा हजार तर त्यांच्या विधवा पत्नींना पाच हजार रुपये सन्मानवृत्ती देण्याच्या फडणवीस सरकारने सुरू केलेल्या योजनेला लगाम घालून करोनावर मात करण्याकरिता आर्थिक रसद उभी करण्याचे ठाकरे सरकारने ठरविले आहे.
“राज्यातील सरकार हे आणिबाणीचे समर्थक असल्यानेच त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी कार्यरत संघर्षशील व्यक्तिमत्त्वांची मानधन योजना बंद केली आहे. या देशातील लोकशाही धोक्यात आली, तेव्हा त्याच्या रक्षणार्थ अनेकांनी संघर्ष केला आणि देशात लोकशाही हक्कांचे संरक्षण केले. या सरकारकडे
***
Thursday, July 9, 2020
काँग्रेसचे 'नवबंधन'!
Saturday, July 4, 2020
भविष्य वाचविण्यासाठी...
Tuesday, June 30, 2020
कचरा आणि बातमी...
मग मात्र, त्याला घाम फुटला. एवढ्या लांबलचक भाषणातली बातमी आपल्याला शोधायची आहे, हे त्याला आठवलं. शिवाय, छानशी बातमी करा, असा आदेश होता, हेही आठवलं, आणि त्याच्या घशाला कोरड पडली. या भाषणात नेमकी बातमी काय, त्यात छानसं काय आणि ते कसं शोधायचं, हा प्रश्न त्याला पडला. क्षणभर मन भिरभिरलं... पुन्हा एकदा ते भाषण ऐकून पाहावं, असंही त्याला वाटलं, आणि त्याने मोबाईल काढला. सुरू केला, आणि इयरफोन कानाला लावला... पुन्हा तेच, नेहमीचेच, सवयीचे शब्द कानावर पडले. आता त्याला फक्त ते भाषण ऐकू येत होते. आसपास कुठेही त्याचे लक्ष नव्हते. रस्त्यावरून तुरळक वाहने येजा करत होती. एखाददुसरा माणूसही त्याच्याकडे विचित्रपणे पाहात पुढे जात होता. साध्या माणसांसाठी बसेस बंद असताना हा बसस्टॉपवर कशाला ताटकळतोय, असा भाव त्या नजरेत उमटायचा. पण त्याचे त्याकडे लक्ष नव्हते. त्याचे कान भाषणावर खिळले होते.
पुढची सदतीस मिनिटे गेली, आणि त्याने मोबाईल बंद केला. इयरफोन गुंडाळला, आणि खिशात ठेवून तो पुन्हा विचार करू लागला. यातून नेमकी छानशी बातमी कशी काढायची, हेच त्याला सुचत नव्हते. मुळात, या भाषणात बातमी तरी काय होती, असा प्रश्न त्याला पडला होता.
त्याने अस्वस्थपणे इकडेतिकडे पाहिले, आणि त्याची नजर समोरच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे वळली. फाटके कपडे घातलेला, पाठीवर गोणपाटाची पिशवी लटकावलेला, विझलेल्या डोळ्यांचा एक माणूस हातातल्या लोखंडी सळीने कचरा इकडेतिकडे करत होता. त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून काहीतरी शोधत होता.
आपणही कचरावेचकच आहोत, असा विचार त्या क्षणी मनात येऊन तो स्वतःशीच खिन्नपणे हसला. आता त्याचे संपूर्ण लक्ष त्या कचरा वेचणाऱ्या माणसावर खिळले होते. बातमीचा थोडासा विसरही पडला होता.
अचानक कचरा उपसणाऱ्या त्या माणसाच्या विझलेल्या डोळ्यात एक चमक उमटली. त्याला ती लांबूनही स्पष्ट दिसली. कचऱ्याच्या ढिगाऱ्यातल्या त्या माणसाने हातातली लोखंडी सळी बाजूला ठेवली, आणि तो खाली वाकला. त्या कचऱ्यातून त्याने काहीतरी वेचलेच होते. ती विकून काहीतरी किंमत मिळेल, याचा त्याला आनंद झाला होता. त्याने ती वस्तू हातात घेतली. उलटीसुलटी करून पाहिली. त्यावर हलकेच हात फिरविला, आणि अंगावरच्या मळक्या फाटक्या शर्टाच्या टोकाने पुसून ती साफ केली. त्याच्या डोळ्यात आनंद मावत नव्हता. कुणीतरी कचऱ्यात फेकलेल्या त्या वस्तूला त्याच्या दृष्टीने किमत होती. कचरा वेचण्याच्या आजच्या कष्टाचे चीज झाले, असा विचार त्याच्या मनात उमटला होता.
याला तो स्पष्ट वाचता आला होता.
तो स्वतःशीच हसला, आणि कचरा वेचणाऱ्या त्या माणसाचे त्याने मनोमन आभार मानले. कचऱ्यातूनही काहीतरी कामाचे हाती लागते, हा मोलाचा संदेश त्याला ऐन मोक्याच्या क्षणी मिळाला होता.
दुसऱ्याच क्षणाला त्याने मोबाईल काढला, आणि बातमी लिहायला घेतली. सदतीस मिनिटांच्या भाषणातील पंधरावीस वाक्ये रंगवून रंगवून लिहून काढली, आणि त्याला छानसा मथळा देऊन त्याने व्हॉटसअपवरूनच ती बॉसच्या नंबरवर धाडली.
कचऱ्यातून किंमती काहीतरी वेचण्याच्या शिक्षणाचे चीज झाले, असे त्याला वाटले, आणि त्याची पावले पुढे पडू लागली...
Sunday, June 28, 2020
कळ्या जपण्याचा काळ...
Thursday, June 25, 2020
डे-वन : मफलर ते मास्क
आज पुन्हा, ४५ वर्षांनंतर, याच दिवशी, त्याच दिवसाचा एक वेगळाच अंश अनुभवायला मिळतोय. सकाळी जाग आली, तेव्हा तो दिवस आठवला. योगायोगाने नव्हे. अगदी जाणीवपूर्वक. ४५ वर्षांपूर्वी, २६ जूनला... मी साखरप्याच्या घरी, सोप्यात, राजांगणातला पावसाचा धबधबा अनुभवत अंथरुणात लोळत होतो. नुकतं उजाडू लागलं होतं. मस्त, कुंद हवा होती. पावसाळ्याच्या दिवसात साखरप्याच्या घरात असणं हे त्या वेळी माझ्या सुखाच्या कल्पनांतलं परमोच्च सुख होतं. बाहेर कोसळणारा पाऊस, अगदी बसल्या जागी, आमच्या चौसौपी घराच्या मधल्या अंगणात- राजांगणात- एकवटून कोसळायचा, आणि छपराच्या चारही कोपऱ्यांच्या पन्हळीतून अक्षरशः धबाधबा ऊतू जायचा... त्याला एक मस्त लय असायची. अजूनही असते, पण ते दिवस वेगळे होते. कारण, ते अनुभवण्याची मजा त्या वयात अधिक होती. पुढे अनेक पावसाळे पाहिल्यावर, त्यातलं ते वेगळेपणही सवयीचं होतं. म्हणून, प्रत्येक पावसाळ्याचं नवेपण असलं, तरी काही वेगळे पावसाळे मनावर शिंपडतच राहातात. तर, त्या दिवशी तो असाच कोसळत होता, आणि मी अंथरुणावर, डोळे मिटून, त्याचा नाद कानात साठवत पडून होतो. तितक्यात ओटीवरून एक ओळखीच्या आवाजातली हाक आली. मी लाजून ताडकन अंथरुणातून उठलो. कारण, इतक्या उशिरापर्यंत कुणी लोळत पडतो का, असं विचारायचे आणि त्यावर उत्तर न देता, शरम वाटायचे ते दिवसच होते...
बाहेर रमाकांत पाटील होते. आमच्या तालुक्याचे प्रचारक. ठेवणीतल्या, कौटुंबिक आवाजात त्यांनी मला हाक मारली, आणि मी ताजातवाना असल्यासारखा चेहरा करून ओटीवर गेलो.
‘आवरा... आपल्याला निघायचंय. लगेच. वेळ काढू नको.’ उगीचच इकडेतिकडे पाहात दबक्या आवाजात ते म्हणाले, आणि मी बिचकलो.
कुठे निघायचंय, कशाला जायचंय, काहीच कळलं नव्हतं. तरीही कपडे पिशवीत भरले, आणि मागीलदारीच्या चुलीवरच्या कोनाड्यातली शेणीची राखुंडी दातावर खसाखसा घासून चारपाच चुळा भरून मी पुन्हा ओटीवर आलो. मामीने दिलेला चहा आम्ही दोघांनी घेतला. दरम्यान पाटील आणि मामाचं काहीतरी बोलणं झालं होतं.
मग मी पिशवी काखोटीला मारली, आणि पाटलांसोबत बाहेर पडलो. मामाने पाठीवर थोपटून निरोप दिला.
गावाबाहेर तिठ्यावर आलो, तेव्हाही पाऊस भरुभुरत होता. एक ट्रक देवरूख रोडकडे वळला. पाटलांनी हात दाखविला. कुणीतरी अनोळखी ड्रायव्हर होता. त्याने ट्रक थांबविला, आणि आम्ही केबिनमध्ये चढलो. ट्रक देवरूखच्या दिशेने निघाला. तासाभरानंतर मार्लेश्वर तिठ्यावर पाटलांनी ट्रकवाल्याला खूण केली, आणि आम्ही उतरलो. देवरूखहून चंदू तिठ्यावर येऊन थांबलेलाच होता. त्याच्या पाठीवर एक गोणपाटाची मोठी पिशवी, आणि कपडे बांधलेली एक लहान पिशवी होती. काही न बोलता आम्ही मार्लेश्वरच्या दिशेने चालू लागलो.
पाचसहा मैल चालल्यावर पाटलांनी तोंड उघडलं.
‘आणीबाणी लागू झालीय. आपल्यातल्या काही लोकांना पकडणारेत. वॉरंट निघालीयेत. जेलमध्ये सडण्यापेक्षा, लपून जाऊ. भूमिगत होऊ, आणि काहीतरी करू. जेलमध्ये किती दिवस राहावं लागेल, तिथे काय हाल होतील, काहीच कळत नाही. त्यापेक्षा भटकू. कुठेतरी लपून आसरा घेऊ. आपल्या माणसांनी तशी व्यवस्था केलीय’...
आम्ही मान डोलावली, आणि चालू लागलो. चंदूच्या पाठीवरचं गोणपाटाच्या पिशवीतलं ओझं आलटून पालटून पाठीवर घेत निघालो. मार्लेश्वरला पोहोचलो, तेव्हा दुपार वगैरे झाली होती. तेव्हा तिथे आजच्याएवढी वर्दळ नव्हती. संपूर्ण एकान्त. दाट जंगल, आणि आसपास माणसाचा वावरही नाही.
एका मोठ्या दगडाच्या मागे आम्ही सामान लपवलं, आणि एका लहानशा ओहोळाखाली बसून मनसोक्त आंघोळ केली. कपडे बदलले आणि चंदूने बांधून आणलेल्या भाजीभाकरीवर ताव मारला. थोड्या वेळाने गोणपाटाची पिशवी उघडली, आणि माझे डोळे विस्फारले. आत सायक्लोस्टायलिंग मशीनचे मॉडेल होते. हाताने बनविलेले. स्क्रीन प्रिंटिंगसाठी बनवतात, तसे. दोन लाकडी चौकटी बिजागराने जोडलेल्या. एकावर पाट, आणि एकावर जाळी... एक हाताने फिरवायचा रॉड... शाईच्या ट्यूब, कागदांचा गठ्ठा...
चंदू माझ्याकडे बघून नुसतंच हसला. शाळेतून या वस्तू गुपचूप उचलून आणल्या होत्या.
आणीबाणीविरोधातील पत्रके तयार करून गावोगाव त्याचे वितरण करायचे, असं काम आपल्याकडे असेल. पाटील म्हणाले. पण तोवर आणीबाणी म्हणजे काय, त्याचा आपल्याशी संबंध काय, वगैरे काहीच माहीत नव्हतं. तेव्हा आजच्यासारखं मोबाईल, इंटरनेट नव्हतं, आणि आम्ही तर, ‘तेव्हाच्या कव्हरेज एरिया’च्याही पुरते बाहेर...
मग, नुसतंच, ‘आणीबाणी मुर्दाबाद’ असा मजकूर मोठ्या अक्षरात स्टेन्सिल करून स्क्रीनवर चिकटवला, आणि भराभरा पाचपन्नास प्रती काढून झाल्या... पुन्हा सगळं सामान गोणपाटाच्या पिशवीत भरून, पिशवी काखोटीला मारून आम्ही तिथून निघालो.
जाम मजा वाटत होती. काहीतरी वेगळं, थ्रिलींग आहे, हे जाणवत होतं.
पायथ्याच्या गावात आलो, आणि आसपास कुणी नाही याची खात्री करून घेत दोनचार पत्रकं शाळेच्या खिडकीतून आत टाकली...
पुन्हा गुपचूप चालू लागलो. देवरूखच्या दिशेने... पण गावात थांबायचं नव्हतं. एखादा ट्रक पकडायचा, आणि गावाला वळसा घालून पुढे जायचं, हे ठरलं होतं. पाटलांनी सगळा कार्यक्रम व्यवस्थित आखला होता.
रात्र झाली तेव्हा आम्ही धामणीच्या पुढे कुठेतरी उतरलो होतो. पुन्हा पिशव्या पाठीवर घेतल्या, आणि पलीकडे दिसणाऱ्या दाट डोंगराच्या दिशेने चालू लागलो.
दोन घाट्या ओलांडल्यावर झाडीत लपलेलं एक मोठं कौलारू घर दिसू लागलं. आम्हाला तिथेच जायचं होतं. पाटलांनी आमच्यासाठी त्या घराची निवड केली होती. गुप्त जागा. इथे आम्ही आमचं काम सुरू करणार होतो. कुणालाच आमचा सुगावा लागणार नव्हता.
घरात पोहोचलो, तेव्हा ते वयोवृद्ध गृहस्थ आमची वाटच पाहात झोपाळ्यावर बसले होते. पिशव्या पडवीच्या रेज्याला रेलून ठेवून आम्ही समोर खुर्च्यांवर बसलो. जुजबी चौकशा झाल्या, आणि थोड्या वेळाने जेवण तयार असल्याचा निरोप आला. मागीलदारी विहीरीजवळ त्यांनी आपल्या हाताने आमच्या हातापायावर पाणी घातले, ताजेतवाने होऊन आम्ही केळीच्या पानावर जेवायला बसलो. कुळथाचं खमंग पिठलं, आणि वाफाळलेला भात... डावीकडे झणझणीत लसणाची चटणी... अक्षरशः ताव मारला. तोवर नावं वगैरे सांगून झाली होती. माझं नाव ऐकताच त्यांनी- त्यांना आप्पा असे म्हणत- डोळे किंचित बारीक केले, आणि विचारलं, ‘म्हणजे तुमची जात कोणती?’
मी सटपटलो. आपण सांगितलेल्या आडनावाची जात कोणती हे मलाही माहीत नव्हतं...
‘ नाही, तीच.. आम्ही गुजर’... आप्पांनी मान हलविली, आणि जेवण आटोपल्यावर खुणेनंच मला माझं पान उचलायला सांगितलं. मागोमाग मागीलदारी आले.
‘टाका तुमचं पान म्हशीच्या पुढ्यात’... ते म्हणाले. मी ओळखलं.
आपल्या आडनावामुळे आता इथलं वास्तव्य असंच असणार, मला जाणवलं. मी पान लांबूनच म्हशीच्या पुढ्यात टाकलं, आणि पाथरीजवळ आलो. आप्पांनी त्यांच्या हाताने माझ्या हातावर पाणी घातलं. हातपाय धुवून पुन्हा आम्ही आत आलो, आणि त्यांनी मागच्या पडवीजवळची एक खोली उघडून आम्हाला दिली. ‘इथे तुम्ही राहायचं. बाहेर पडायचं नाही. दिवसा कुणालाही कळता नये’... त्यांनी कडक आवाजात सूचना केल्या, आणि आम्ही तिघे मान हलवून खोलीत गेलो. आतून कडी लावली, आणि गोणपाटाची पिशवी उघडून पुन्हा मशीन जोडलं.
येतायेता पाटलांनी झोपाळ्यावरचं वर्तमानपत्र काखोटीला मारलं होतं. खोलीत गुपचूप वाचन झालं, आणि आणीबाणीचा अर्थ उलगडू लागला... लपून काम करणंच गरजेचं होतं, हे लक्षात आलं. आमचा निर्धार झालाच होता.
‘उद्यापासून आपलं काम सुरू झालं पाहिजे.’ पाटील म्हणाले...
... दुसरा दिवस उजाडण्याआधी आम्ही कामाला लागलो होतो. आणीबाणीच्या विरोधातील घोषणा तयार झाल्या होत्या. मी वेगळ्या अक्षरात त्या स्टेन्सिलवर उतरविल्या, आणि प्रती काढण्यास सुरुवात झाली. शंभर प्रतींचा एक गठ्ठा... तीनचार गठ्ठे दुपारी जेवणाआधी तयार झाले होते.
मग दुपारी पुन्हा आप्पांसोबत, जेवण आटोपलं. या पंक्तीत माझं आणि पाटलांचं पान थोडं बाजूलाच होतं. पण पानात पडणारं अन्न मात्र, सारखंच होतं. त्या काळातल्या वयोवृद्धांची मानसिकता आम्हाला ओळखीची होती. काहीच वाटलं नाही. तो काळच तसा होता.
जेवणं आटोपल्यावर पुन्हा खोलीत जाऊन आम्ही आडवे झालो. काही वेळातच डाराडूर...
चार साडेचार वाजले असतील. बाहेरून आप्पा कडी वाजवत होते. ‘आहो जोग, गुजर, उठा’... आम्हाला ऐकू येत होतं. पण ते आपल्याला कुठे उठवतायत, असं वाटून आम्ही उठलोच नाही.
आडनावं आम्हालाही नवीनच होती ना...
अखेर आप्पा वैतागले... ‘आणि म्हणे, कामं करणार’... असं काहीतरी बडबडले, आणि आम्ही ताडकन उठलो. बाहेर आलो. झोपाळ्यावर आप्पा बसले, आणि आम्ही समोरच्या खुर्च्यांत बसलो.
चहा झाला. मी माझा कप विसळून मागच्या पडवीत एका बाजूला उलटा घालून ठेवला. चंदूचा कप आपल्यासोबत घेऊन आप्पांनी झोपाळ्याजवळ ठेवला.
संध्याकाळ उलटू लागली, आणि पाटलांनी खुणावलं. आम्ही बाहेर पडलो. एका पिशवीत ते गठ्ठे होते.
गोवा रोडवर येईपर्यंत काळोख झाला होता. आम्ही चालू लागलो. तोंडाला मफलर गुंडाळून संगमेश्वर स्टँडवर आलो, आणि मुंबईकडे जाणाऱ्या दोनचार गाड्यांमध्ये गुपचूप कंडक्टरच्या डोक्यावरल्या कॅरियरमध्ये एकएक गठ्ठा टाकून पसार झालो.
आपण काय केलंय हे दुसऱ्या दिवशी आम्हाला समजलं.
चिपळुणात गदारोळ झाला होता. एस्टी गाड्यांमध्ये कुणीतरी आणीबाणीविरोधी पत्रकं टाकल्याची वार्ता तोवर सगळीकडे पसरली होती. आता काय होणार, याची कुजबूज सुरू झाली होती.
आम्हाला हे कळलं, आणि मजा वाटली.
अज्ञातवासातले दिवस सुरू झाले होते. घरी बहुधा निरोप पोहोचला होता. आता दिवसभर आप्पांच्या घरात मागल्या पडवीशेजारच्या बंद खोलीत पत्रकं सायक्लोस्टाईल करायची, गठ्ठे बांधायचे, आणि रात्री संगमेश्वर, कधी चिपळूण गाठून एस्टीत टाकून यायचं, एवढंच काम आम्हाला होतं. आम्हाला ते आवडलंही होतं.
काही दिवस आप्पांच्या घरी राहिल्यावर बाहेरची कुजबूज वाढली होती. कुणीतरी आसपासचीच माणसं हे करतायत, असा संशय पसरू लागला होता. अशातच, आम्ही त्या भागात नवखे असल्याने, स्टँडवरच्या काही नजरा उगीचच संशयाने पाहातायत असा भास आम्हालाही होऊ लागला होता. तोंडाला मफलर वगैरे बांधला तर आणखीनच संशय वाढणार होता.
मग मुक्काम हलवावा असं ठरलं, आणि आम्ही एका भल्या पहाटे, उजाडण्याआधी बाहेर पडलो. आप्पांच्या पायाला हात लावून नमस्कार केला, आणि मी म्हणालो, ‘आप्पा, माझं नाव गुजर नाही... मी गुणे’...
आप्पा एकदम गहिवरले. माझ्या पाठीवर मायेनं हात फिरवला, आणि त्यांनी तोंड भरून आशीर्वाद दिला.
‘यशस्वी भव!’
… आम्ही पुढच्या मुक्कामासाठी त्या जंगलातल्या एकांतातून बाहेर पडलो.
(चित्र सौजन्य- लोकसत्ता)
भाषेचे जगणे-मरणे...
त्या नोंदीमुळे मग एक स्वगत -चिंतन- होऊन गेले. सहज वाटलं, हा तर अपरिहार्य बदलाचा प्रभाव आहे.
बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. हे एकदा मान्य केले की आपोआपच बदल स्वीकारायची मानसिकता तयार होते. आणि आपण कसे बदलत गेलो तेही लक्षातदेखील येत नाही. फार पूर्वी, सातआठ पिढ्यांपूर्वी आपल्या घरातील पुरुष मंडळीचा पंचा उपरणं पागोटं असा वेश असायचा, बायका लुगडं नेसायच्या. काळाबरोबर बदल होत गेला, आणि पंचाउपरण्याची जागा धोतर सदऱ्याने घेतली. कालांतराने समाजातच सुधारणा होऊ लागली, विकास होऊ लागला, पायी चालण्याऐवजी मोटारी दिसू लागल्या, आणि सदऱ्यावर कोट आला. वहाणांची जागा चप्पल ने घेतली. काळ आणखी बदलला. धोतर कोट सदऱ्याची जागा ‘पॅंट शर्ट’ने घेतली, चप्पलऐवजी ‘बूट’ आले. पुढे ‘सूट’ आला, पायात ‘शूज’ आले, गळ्यात ‘टाय’ आला, डोक्यावर ‘कॅप’ आली. आता ‘ब्लेझर्स’ वगैरे वापरतो...
हा केवळ वेषातला बदल आहे असे वरवर वाटत असले तरी ते तेवढेच नाही.
मराठी भाषा या वेषाबरोबरच कशी बदलत गेली, त्याचं प्रतिबिंबही या बदलातून दिसतं.
भाषेच्या विकासाची प्रक्रिया सुमारे ७० हजार वर्षांपूर्वी सुरु झाली. तेव्हा फक्त वर्तमानकाळाची भाषा होती. पुढे तीस हजार वर्षांनंतर भूतकाळाची भाषा आली. आता आपण भविष्यकाळाच्याही पुढची भाषा बोलत आहोत, म्हणून मराठीचं काय होणार याची कधीकधी चिंता व्यक्त होते.
काही महिन्यांपूर्वी कधीतरी, *पुण्याच्या* एका एफ्. एम्. स्टेशनवर ‘सलग ३० सेकंद मराठीत बोलून दाखवा’ अशी स्पर्धा घेत होते. *पुण्यात*!
कुणीही बोलू शकले नाही, असं मला कळलं!
मराठीत इंग्रजीची मोठी घुसखोरी झाली आहे.
मागे एकदा, १४ सप्टेंबर २०१५ या दिवशी दुपारी बारा-साडेबारा वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर एक भाषण ऐकलं. मराठीतून होतं. ते मी ऐकता ऐकता लिहून घेतलं.
“बाॅडी आणि माईंड यांच्यावर नाॅईज पोल्यूशनचा डायरेक्ट ॲडवर्स इफेक्ट होत असतो. म्हणून लहान मुलांच्या एरियातील नाॅईज पोल्यूशनचे नाॅर्म्स स्ट्रिक्ट असायला हवेत. या सगळ्याचा विचार करून सायन्स रिलेटेड काही गाईडलाईन्स आहेत, ज्या ॲक्ट्व्हिस्टसनी थरो रिसर्च करून चाॅकआऊट केल्या आहेत. रेसिडेन्शियल एरियाला किती नाॅईज एक्स्पोजर असायला हवेत त्याचा सीरियसली विचार करायला हवा. इन शाॅर्ट, नाॅईज पोल्यूशनला लाईटली घेऊन चालणार नाही. कारण ते हेल्थ हजार्ड आहे. इररिव्हर्सिबल हियरिंग लाॅस झाला नाही तरी बरेचसे ॲडव्हर्स इफेक्टस होऊ शकतात हे सायन्सने सिद्ध केले आहे.”
...नंतर हे मी एका मित्राला ऐकवलं. त्याने खांदे उडवले. तो म्हणाला, इट हॅपन्स! ॲट टाईम्स मराठी वर्ड रिमेम्बर करायला डिफिकल्ट जातं!
भाषाप्रदूषण. मराठी मरणार नाही, पण प्रदूषित होणार.
या पार्श्भूमीवर मला भाषातज्ञ गणेश देवींचं एक वाक्य कायम आठवतं-
“भाषा कधी मरत नसते. ती मारली जाते- भाषा टिकवणे आपल्या हातात नसेल पण ती मारून टाकू नये. कारण भाषा आपण निर्माण केलेल्या नाहीत. त्यामुळे त्या मारण्याचा अधिकार आपल्याला नाही.”
भाषा जगविणे म्हणजे ती भाषा बोलणारे लोक जगविणे. आपण स्वत:ला तसे जगविले तर भाषा मरणार नाही.
फक्त सध्या आपण भाषा मारतो आहोत की समृद्ध करत आहोत याचा विचार करायला हवा. अर्थात आज एकाच भाषेवाचून काही अडत नाही अशी स्थिती असल्याने आपण भाषेच्या अस्मितेची फार चिंता करत नाही.
















